नाशिक मध्ये २५ हजार स्वेअर फुटांची महारांगोळी : २५०० किलो रंग, २ हजार किलो रांगोळी

व्हिडीओ पहा 

0

नाशिक,२० मार्च २०२३ – नाशिक महानगर पालिका व नववर्ष स्वागत यात्रा समिती नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांच्या तिसऱ्या दिवशी आज २० मार्च रोजी भव्य महारांगोळी साकारण्यात आली. गोदा घाटावर पाडवा पटांगणावर पर्यावरण रक्षण या अंतर्गत ‘पंचमहाभुते’ या विषयाला अनुसरुन तब्बल २५ हजार स्क्वेअर फुटांची (२५० फूट बाय १०० फूट) भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे.

‘पंचमहाभूते व त्याचे महत्व  प्रत्येकाला समजावे या उद्देशाने आणि त्याचबरोबर सकारात्मक ऊर्जेने ‘मी’ चे ‘आम्ही’ मध्ये परीवर्तन करणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. आपले शरीर, पृथ्वी तसेच संपूर्ण ब्रह्मांड हे पंचमहाभूतांनी बनलेले आहे अशी आपली धारणा आहे. त्यामुळे पंचमहाभूतांचा समतोल बिघडला की पर्यावरणाचाही समतोल बिघडतो. पर्यावरण आणि पंचमहाभूतांचा परस्पर संबंध दाखवणारी ही महारांगोळी आहे. रांगोळी मध्ये मधोमध पंचमहाभूतांचे बोधचिन्ह रांगोळीतून साकारण्यात आले आहे. तसेच सूर्य आणि पृथ्वी देखील साकारण्यात आली आहे. वृक्षतोड, वायूप्रदूषण, ध्वनीप्रदूषण, रासायनिक खतांचा अती वापर, जलप्रदूषण या गोष्टींचा अंतर्भाव असलेले रांगोळीचित्र रेखाटण्यात आले आहेत.

या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून वितळणारे बर्फ, पूर परिस्थिती, दुष्काळ, पृथ्वीचे वाढलेले तापमान हे नाविन्यपूर्ण पद्धतीने रेखाटले आहेत. या सर्व समस्यांवर उपाय म्हणून वृक्षारोपण, हरित उर्जेचा वापर या विषयांची मांडणी करण्यात आली आहे. पर्यावरणाचा बिघडलेला समतोल राखण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे आवश्यक आहे म्हणून ‘वसुधैव कुटुंबकम्’ असे मोठ्या अक्षरात रेखाटले आहे. पृथ्वी, पाणी, अग्नि, वायु, आकाश या पंचमहाभूतांना साकारत पर्यावरण समतोलासाठी उपयुक्त बाबींचा उहापोह करणारी ही महारांगोळी आहे.

२०० महिलांनी साकारली रांगोळी 
या महारांगोळीसाठी एकूण २५०० किलो रंग आणि २००० किलो रांगोळीचा वापर करण्यात आला आहे. २०० महिलांनी अवघ्या तीन तासांत एकत्रितपणे येऊन महारांगोळी साकारली आहे. या महारांगोळीची संकल्पना पूर्णत्वास उतरवण्यासाठी निलेश देशपांडे यांचे मोलाचे मार्गदर्शन होते. यावेळी भारती सोनवणे यांनी महारांगोळी प्रमुख म्हणून काम पहिले तर मंजुषा नेरकर व सरोजिनी धानोरकर यांनी सहप्रमुख म्हणून काम पहिले. सकाळी ६ वाजता या महारांगोळीचा पहिला बिंदू हा काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम केलेल्या मेघवाल समाजाचे समाजसेवक रामजी पाळजी मारू यांच्या सूनबाई हिरुबेन धुडा मारू व राम पला मारू, दिपाली गीते यांच्या हस्ते ठेवण्यात आला. यावेळी नववर्ष स्वागत यात्रा समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, समितीचे सचिव योगेश गर्गे, संघटक जयंत गायधनी, उपाध्यक्ष राजेश दरगोडे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी शिवाजी बोंदार्डे, जयेश क्षेमकल्याणी, विनायक चंद्रात्रे, महेश महांकाळे, रोहित गायधनी, प्रसाद गर्भे, दिपक भगत यांनी विशेष मेहनत घेतली.

ही महारांगोळी पाडवा पटांगणावर दोन दिवसाकरिता ठेवण्यात येणार आहे. जास्तीत जास्त नाशिककरांनी ती बघण्यासाठी पाडवा पटांगणावर यावे आणि कार्यक्रमांचाही आनंद घ्यावा असे आवाहन मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि नववर्ष स्वागत यात्रा समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, उपाध्यक्ष राजेश दरगोडे, सचिव योगेश गर्गे, संघटक जयंत गायधनी यांनी केले आहे.

मंगळवारी शस्त्रात्रांचे प्रदर्शन 
उद्या मंगळवार दि. २१ मार्च रोजी ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन’ म्हणजेच ‘मृत्यंजय दिनानिमित्त’ तरुणांमध्ये स्वत्व जागरण करण्याच्या हेतूने ‘शिवकालीन शस्त्रविदया व त्याच बरोबर भारतीय व्यायाम पद्धती’ ज्यामध्ये सूर्यनमस्कार, चंद्र नमस्कार, भूमिवंदन असे विविध ‘भारतीय व्यायाम आणि प्रात्याक्षिके’ सायंकाळी ६ वा. सादर केली जाणार आहे.  तसेच ‘शिवकालीन विविध प्रकारचे शस्त्रे’ आबालवृद्धांना जवळून बघता यावी व हाताळता यावी या उद्देशाने ‘शस्त्रात्रांचे प्रदर्शन’ (सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत) मांडणार आहोत. हे प्रात्यक्षिक सव्यसाची गुरुकुलाचे लखन जाधव गुरुजी आणि त्यांचे विद्यार्थी दाखवणार आहेत. नागरिकांनी मोठया प्रमाणात उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन मनपा आणि नववर्ष स्वागत यात्रा समितीने केले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.