मुंबई, दि. २७ सप्टेंबर २०२५ – Maharashtra Weather Update हवामान विभागाकडून महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. विशेषतः मुंबई (Mumbai), नाशिक (Nashik), ठाणे (Thane), रायगड (Raigad), पालघर (Palghar) या जिल्ह्यांमध्ये २८ सप्टेंबर रोजी अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
🌧️ कोकणात अतिवृष्टीचा इशारा(Maharashtra Weather Update)
कोकण किनारपट्टीवरील भागांमध्ये देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सरकारकडून भरपाईची मागणी होत आहे.
🚨 विदर्भ आणि मराठवाडा धोक्याच्या सावटाखाली
वाशिम जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला. मानोरा तालुक्यातील आसोला गावालगतचा पूल पाण्याखाली गेला, त्यामुळे तीन तास वाहतूक ठप्प होती. गावकऱ्यांनी धोकादायक पद्धतीने वाहत्या पाण्यातून प्रवास केला.
हिंगोली जिल्ह्यातील कयाधू नदीला पूर आल्याने शेवाळा गावात अनेक घरांमध्ये २ ते ३ फूट पाणी शिरले. त्यामुळे संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.
जालना जिल्ह्यासाठी पुढील चार तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाची शक्यता असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील लासोना गावात जिल्हा परिषदेच्या शाळेची भिंत कोसळली. शाळेला सुट्टी असल्याने अनर्थ टळला.
🌊 नाशिक जिल्ह्यात धरणांचा विसर्ग वाढला
मुंबई वेधशाळेनं दिलेल्या अंदाजानुसार, २७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२५ या काळात नाशिक जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस होणार आहे. मात्र, २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान तीव्र पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गंगापूर धरणातून सध्या १६५९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
दारणा – ४०० क्युसेक, वाघाड – ६५० क्युसेक, पालखेड – ८६६ क्युसेक, नांदूरमध्यमेश्वर – तब्बल ३१५५ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे.
जिल्ह्यातील २४ धरणांमधील पाणीसाठा ८५% पर्यंत पोहोचला आहे.
या पावसामुळे शहरातील पाणी निचरा समस्या वाढू शकते, तर ग्रामीण भागात शेती पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. गोदावरी व उपनद्यांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.
अनावश्यक कामासाठी बाहेर पडू नये.
नदीकाठ व धरण परिसरातील नागरिकांनी उंच स्थळी स्थलांतर करावे.
शेतीमाल, जनावरे व वाहने सुरक्षित ठिकाणी हलवावीत.
प्रशासन व हवामान खात्याच्या सुचनांचे काटेकोर पालन करावे.
[…] आवाजासोबतच ढगांचा गडगडाटही दिवाळीच्या रात्री ऐकू येण्याची शक्यता आहे.मे […]