अष्टौप्रहर स्वरहोत्र :नाशिक नगरीत प्रथमच झाला आगळावेगळा सोहळा…
श्रीराम दरबारी नाशिकच्या शास्त्रीय गायक, वादक नृत्य कलावंतांनी बजावली आपली सेवा....
नाशिक दि. २८,जानेवारी २०२३ –संपूर्ण नाशिक शहर नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाले असतानाच पहाटेच्या समयी पंचवटीतील श्री काळाराम मंदिराचा परिसर मात्र सुमधुर सुरांनी हरखून गेला, आगळेवेगळ्या स्वरांच्या या मैफिलीत रसिक तल्लीन झाले होते. केवळ पहाटेचा समयच नव्हे तर अगदी सकाळ, दुपार, सायंकाळ आणि रात्री उशिरापर्यंत नाशिक शहरातील शास्त्रीय संगीत, गायन, वादन क्षेत्रातील मान्यवर कलावंत तसेच नवोदित कलावंतांच्या एका मागोमाग एक रंगलेल्या स्वर मफिलीने संपूर्ण पंचवटीसह गोदाकाठचा परिसर निनादून गेला होता.
याला कारण म्हणजे श्री काळाराम संस्थान, आणि मैत्र जीवाचे फाउंडेशन नाशिक यांच्या वतीने नववर्षाच्या प्रथम दिनी भारतीय शास्त्रीय संगीत परंपरेनुसार संपूर्ण दिवसाच्या २४ तासातील ८ प्रहरात विविध थाटावर आधारित रागांची स्वरसाधना करण्यासाठी अष्टौप्रहर स्वरहोत्र या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शास्त्रीय गायन, वादन आणि कृथ्थक नृत्यक्षेत्रातील नामवंत कलाकारांनी श्री प्रभू रामचंद्राच्या चरणी आपली कलेचे सेवा बजावली. नववर्षाच्या मंगलमयदिनी श्री काळाराम मंदिराला जणू काही श्रीराम जन्मोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते.
नववर्षाच्या मंगल दिनी श्री काळाराम मंदिरात गुंजले, दिवसभर अन् रात्रीही सुमधुर स्वर आसमंतात निनाद होते. या अष्टौप्रहर स्वरहोत्र कार्यक्रमाला रसिकांचा लाभला उस्फुर्त प्रतिसाद लाभला. नाशिक नगरीत प्रथमच असा आगळावेगळा सोहळा झाला. किंबहुना शास्त्रीय गायनाच्या क्षेत्रात अशा प्रकारे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात प्रथमच असा उपक्रम राबविल्या गेल्याचे संयोजकांनी सांगितले.
पंचवटीतील प्राचीन काळापासून अत्यंत पूजनीय असलेल्या श्री काळाराम मंदिर मंदिरात रविवार दि. १ जानेवारी २०२३ रोजी पहाटे ५.३० वाजेपासून ते मध्यरात्री उशिरापर्यंतच नव्हे तर दुसऱ्या दिवशी म्हणजे दि. २ जानेवारीपर्यंत अगदी प्रभात पहाटेच्या समयीपर्यंत हा कार्यक्रम संपन्न झाला. भारतीय कालगणनेत संपूर्ण दिवसाचे म्हणजेच २४ तासांचे एकूण ८ प्रहर असून या आठही प्रहरात विविध रागांची स्वरसाधना करण्यात येते.
भारतीय शास्त्रीय संगीताच्या परंपरानुसार या अष्टौप्रहर स्वरहोत्र विविध थाटांवर आधारित रागांची स्वरसाधना या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमाचे आयोजक श्री काळाराम संस्थान, पंचवटी, ( नाशिक ) यांनी केले होते.
या कार्यक्रमाची संकल्पना ग्रंथ तुमच्या दारी या उपक्रमाचे प्रवर्तक विनायक रानडे यांची असून संयोजन श्री काळाराम संस्थानचे विश्वस्त अॅड. दत्तप्रसाद (अजय) निकम यांनी केले. तर श्री काळाराम संस्थानचे अध्यक्ष व जिल्हा सत्र न्यायाधीश डॉ. उमेशचंद्र मोरे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे शुभारंभ झाला. यावेळी विश्वस्त धनंजय पुजारी, मंदार जानोरकर व शुभम मंत्री, मैत्र जीवाचे फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश भोरे, अविनाश बोडके, महेश महंकाळे, सुनिल बोरसे, सचिन कोळपकर,अविनाश बोडके ,सुनील परदेशी, सुनील ठक्कर व अन्य विश्वस्त यांचे सहकार्य लाभले. त्याचप्रमाणे विनायक रानडे, एनसी देशपांडे, आर्की. समीर देशपांडे, अॅड.अजय निकम, सी.एल. कुलकर्णी आदिंनी प्रयोजन, संकल्पन, आरेखन, नियोजन केले होते.
प्रभू श्रीरामच्या पदस्पर्शाने पावन झालेली नाशिकनगरी, पौराणिक आणि ऐतिहासिक महात्म्य लाभलेली श्री काळाराम मंदिराच्या पवित्र वास्तूत, रविवार, पौष शुद्ध दशमी शके १९४४ तथा दि. १ जानेवारी २०२३ रोजी पहाटे ५:३० वाजताच्या काकड आरतीत मंगलमय वातावरणात अभिजात संगीताचे सूर गुंजले. त्यानंतर दिवसभर हे स्वर घुमत राहीले, रात्री उशिरापर्यंत ही मैफिल उत्तरोत्तर रंगत गेली. याप्रसंगी उद्योजक हेमंत राठी, कवी प्रकाश होळकर, लेखक शंकर बोऱ्हाडे, निरंजन शहा आदींसह मान्यवर उपस्थित होते.
भारतीय शास्त्रीय संगीत ‘गायन, वादन, नृत्य, आणि चित्रकला’ या अभिजात कलांचे ‘सेवा-समर्पण’. दिवसाच्या आठ प्रहराशी निगडीत विविध ‘थाट, राग, घराणी, पद्धती, वैशिष्ठ्य आणि गायकी’ सोबतीला विविध वाद्ये, वादन कौशल्य, नृत्य आणि विविध कलांचा संगम अनुभवयास मिळाला.
एकीकडे ‘स्वर-होत्र’ सुरु होतांना, उदबत्यांचा घमघमाट, विविधरंगी रांगोळ्यांनी सजलेली वास्तू, प्रहराशी रंगसंगती साधत पैठणी-नऊवारी ल्यालेल्या महिला यांनी ‘श्रीराम चरणी’ पुष्पांजली वाहून प्रसन्न पहाटे वातावरणाची निर्मिती केली होती.
इतकेच नव्हे तर दिवसभर चाललेल्या कार्यक्रमात प्रत्येक प्रहरात वेगवेगळ्या म्हणजे भगवा, पिवळा, राखाडी, हिरवा, आकाशी, गुलाबी, जांभळा आणि चिंतामणी या रंगांच्या साड्या परिधान करून शहरातील विविध प्रसिद्ध संस्था – संघटनांच्या मान्यवर महिलांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री प्रभू रामचंद्र चरणी पुष्पमाला अर्पण करून प्रार्थना केली.
भारतीय शास्त्रीय संगीताच्या परंपरानुसार या अष्टौप्रहर स्वरहोत्र विविध थाटांवर आधारित रागांची स्वरसाधना
या उपक्रमांतर्गत प्रथम प्रहरात वेळ पहाटे ५ते ६कावड आरती झाली. त्यानंतर ६ ते ८.३० वाजेपर्यंत त्यानंतर सचिन चंद्रात्रे यांचे ध्रुपद गायन झाले. त्यांना दिगंबर सोनवणे (पखवाज ), रुद्राक्ष साक्रीकर (सारंगी ) यांनी साथसंगत केली. तर असावरी खांडेकर राम नाम आणि राम रक्षा सादर केली, सहगायक स्नेह चिमलगी, उदय कुलकर्णी, चिन्मय भार्गवे, सुर गोखले, श्रावणी गीते होते. तर तंत्रनिर्मिती सहाय्य तृप्ती तिजोरे केली. त्यानंतर प्रसिद्ध नृत्यागंणा डॉ. सुमुखी अथणी द्रुपद गायनावर आधारित कथक पुष्पांजली सादर केली. या कार्यक्रमाचे निवेदन स्वानंद बेदरकर यांनी केले.
दुसऱ्या प्रहरात सकाळी ८.३० ते ११ या दरम्यान गायन सतारवादन आणि कार्यक्रम झाला. यात अस्मिता सेवेकरी यांनी गायन सादर केले असून साथसंगत संस्कार जाणोरकर (संवादिनी ) रसिक कुलकर्णी (तबला ) यांची होती. त्यानंतर उद्धव अष्टुरकर सतार वादन यांनी केले असून त्यांना साथसंगत गौरव तांबे (तबला ) यांची लाभली आहे. तसेच देवश्री नवघरे यांनी गायन केले असून त्यांना साथसंगत संस्कार जानोरकर (संवादिनी ) रसिका कुलकर्णी (तबला ) यांची लाभली . निवेदन पियुष आरोळे शिरवाडकर यांनी केले.
त्यानंतर तिसरा प्रहरात सकाळी ११ ते १.३० या दरम्यान गायन, वादन, संवादिनी व व्हायोलिन वादन झाले असून यात केतन इनामदार गायन सादर केली. तर साथसंगत संस्कार जानोरकर (संवादिनी ) अथर्व वारे (तबला ) यांनी केली. त्यानंतर अनिल देठणकर व्हायोलिन वादन झाले असून त्यांना अथर्व वारे तबल्याची साथसंगत केली आहे. तसेच राजश्री वैरागकर यांचे गायन झाले असून त्यांना साथसंगत जयदेव वैरागकर (तबला ), संस्कार जानोरकर (संवादिनी ) यांनी केली. त्यानंतर जयदेव वैरागकर संवादिनी वादन केले असून साथसंगत रसिक कुलकर्णी (तबला ) यांनी केले. निवेदन स्मिता मालपुरे यांनी केले.
चौथ्या प्रहरी दुपारी १.३० ते ४ वाजता शास्त्रीय गायनात विविध कलाकार आपली कला सादर केली . यात ज्ञानेश्वर कासार यांनी गायन केले असून साथसंगत संस्कार जानोरकर (संवादिनी ), आदित्य कुलकर्णी (तबला ) केले. तसेच अमृता खटी गायन झाले असून साथसंगत जगदीश सोनवणे (तबला ), अनुराधा जोशी (संवादिनी ), यांनी केले आहे. त्यानंतर क्षितिजा शेवतेकर आणि लितीश जेठावा यांनी अनुक्रमे सतार व बासरी वादन केले असून त्यांना साथसंगत दिगंबर सोनवणे (तबला ) यांची लाभली होती. तसेच मधुरा बेळे यांचे गायन झाले असून साथसंगात संस्कार जानोरकर (संवादीनी ) व आदित्य कुलकर्णी (तबला ) यांनी मिळाली. निवेदन सुनेत्रा महाजन यांनी केले .
पाचवा प्रहर सकाळी सायंकाळी ४ ते ६.३० या दरम्यान होता, यात गायन, भरतनाट्यम नृत्य अविष्कार, बासरी वादन असे कार्यक्रम झाले आहेत. यात प्रितमा नाकील यांनी गायन सादर केले असून साथसंगत दिव्या रानडे (संवादीनी ), दिगंबर सोनवणे (तबला ), यांची होती. शिल्पा नाकील यांनी भरतनाट्यम नृत्याविष्कार सादर केला असून मोहिनी उपासनी यांनी बासरी वादन केले, त्यांना साथसंगत गौरव तांबे (तबला ), ईश्वरी दसककर (की-बोर्ड ) यांनी केले. त्याचप्रमाणे डॉ. आशिष रानडे गायन सादर केले असून दिव्या रानडे ( संवादीनी ), सौरभ क्षीरसागर (तबला ) यांची साथसंगत लाभली आहे. निवेदन स्नेहा रत्नपारखी यांनी केले आहेत.
सहावा प्रहर सायंकाळी ६.३० ते रात्री ९ होता, या प्रहरात गायन, वादन आदि कार्यक्रम संपन्न झाले आहेत. यात गायन शंतनु गुणे यांनी सादर केले असून त्यांना नितीन वारे (तबला ) तर संस्कार जानवरकर (संवादिनी ) साथसंगत केली आहे. तसेच पंडित सुभाष दसककर संवादिनी वादन, सुरश्री दसककर संवादिनी सहवादन तर ईश्वरी दसककर कीबोर्ड सहवादन केले आहे. त्यांना साथसंगत सुजित काळे (तबला ) यांनी केली आहे. त्याचप्रमाणे सोनाली भुसारे मोजाड यांचे गायन झाले असून त्यांना साथसंगत गौरव तांबे (तबला ), ईश्वरी दसककर ( संवादीनी ) केली आहे. त्याचप्रमाणे पंडित प्रसाद खापर्डे (गायन ), केले असून साथसंगत गौरव तांबे व सुजित काळे ( तबला ) तर संस्कार जानोरकर (संवादिनी ) यांनी केली आहे. या कार्यक्रमाचे निवेदन वंदना अत्रे यांनी केले .
सातवा प्रहर रात्री ९ ते ११.३० या सीनेगीत, सुगमगीत, भावगीत, नाट्य व रागाधिष्टीत गीतांच्या सादरीकरणाद्वारे रागमाला सादरीकरण झाले. त्यात सादरकर्ते विवेक केळकर, श्रेयसी राव, मिलिंद धटिंगण, प्रांजली बिरारी, मीना निकम, सदानंद जोशी यांचा सहभाग होता . त्यांना साथसंगत सुवर्णा क्षीरसागर (संवादिनी ), राजू भालेराव (तबला ), जितेंद्र सोनवणे ( की- बोर्ड ) यांची लाभली. त्यानंतर समृद्ध कुटे यांचे बासरी वादन झाले असून त्यांना साथसंगत अद्वय पवार ( तबला ) केली. तसेच कल्याणी दसकर – तत्त्ववादी यांचे गायन झाले असून त्यांना साथसंगत सारंग तत्त्ववादी (तबला ), ईश्वरी दशकर (संवादिनी ) यांनी केली. आर्या गायकवाड व डॉ.अविराज तायडे यांचे (गायन ) झाले असून साथसंगत संस्कार जानोरकर (संवादीनी ), नितीन वारे (तबला ) यांनी . या कार्यक्रमाचे निवेदन सदानंद जोशी यांनी केले होते.
विशेष म्हणजे शेवटच्या आठव्या प्रहरी रात्री ११.३० ते रात्री उशिरापर्यंत गायन, वादन आदि कार्यक्रम रंगला होता. या श्रीराम तत्त्ववादी यांचे गायन झाले असून साथसंगत सारंग तत्ववादी (तबला ), ईश्वरीत दसककर (संवादिनी ) यांनी केली आहे, त्यानंतर प्रतीक पंडित सतार वादन केले असून साथसंगत अद्वय पवार (तबला ), केली, तसेच पंडित शंकरराव वैरागकर गायन केले असून साथसंगत सागर कुलकर्णी (संवादिनी ), ओंकार वैरागकर (तबला ) व्यंकटेश धवन (पखवाज ), ईश्वरी व सरिता वैरागकर (तानपुरा ) साथसंगत केली होती. तर निवेदन धनेश जोशी यांनी केले होते.
या कार्यक्रमाचे समन्वयक सी. एल. कुलकर्णी, समीर देशपांडे, गणेश गोरे होते तर या कार्यक्रमासाठी विविध संस्था संघटनांचे सहकार्य लाभले होते. तसेच यात प्रामुख्याने टकले बंधू सराफ, आदित्य गोल्ड अन ज्वेलर्स, मॅग्नम ग्रुप ऑफ हॉस्पिटल, पितांबरी, रामबंधू , विश्वास ग्रुप आदींचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमास केवळ नाशिक शहरातील रसिक नव्हे तर श्रीकाळारामाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविक आणि पर्यटकांनी देखील हजेरी लावली होती.