दशक चौथे,समास पाचवा,अर्चन भक्ती
नाना प्रकारच्या देवळांना अलंकार आणि अलंकारपात्रे द्रव्य आणि द्रव्यपात्रे अन्नोदक अन्नोदकपात्रे अर्पण करावी, वने उपवने, पुष्प वाटिका तपस्वींच्या पर्णकुटीका अशा प्रकारची पूजा यथासांगपणे करून जगन्नायकास समर्पण करावी.पोपट,मैना,मयूर,बदक,चक्रवाक पक्षी,चकोर पक्षी,कोकिळा,चितळ,साबर देवळांना समर्पण करावे.सुगंधित मृग आणि मांजरे,काही म्हशी,बैल,वानरे नाना पदार्थ आणि लेकरे देवळाला समर्पण करावी.
काया वाचा आणि मनाने चित्त, वित्त, जीव, प्राणाने भगवंताची पूजा करावी,याचे नाव अर्चन भक्ती.त्याप्रमाणेच सद्गुरुचे भजन करून त्याला अनन्यभावे शरण जावे यालाच भगवदभजन असे म्हणतात. अशा प्रकारची पूजा न घडल्यास मानसपूजा करावी ती देखील परमेश्वराला आवडते. मनाने भगवंताची पूजा करून कल्पनेद्वारे सर्व समर्पण करावे हे मानस पूजेचे लक्षण आहे.आपणास वाटेल ते कल्पना करून देवाला वाहावे. अशाप्रकारे मानसपूजा करावी.इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अर्चन भक्ती नाम पंचम समाप्त
दशक चौथे समास सहावा वंदन भक्ती
मागे पाचव्या भक्तीचे लक्षण सांगितले.आता सावधानतेने सहावी भक्ती ऐकावी. वंदन ही सहावी भक्ती असून देव, संत, साधू आणि सज्जन यांना नमस्कार करीत जावा.सूर्याला नमस्कार करावा, देवाला नमस्कार करावा,सद्गुरुला साष्टांग नमस्कार करावा,अधिकार पाहून नाना प्रतिमा,देव,गुरु यांना साष्टांग नमस्कार करावा.पृथ्वीवर कोटी देव आहेत,त्यात विष्णू मूर्ती आहेत त्यांना प्रेमाने साष्टांग नमस्कार करावा.पशुपती,श्रीपती आणि गभस्ती यांच्या दर्शनाने दोष निघून जातात.त्याप्रमाणेच नित्यनेमाने मारुतीला नमस्कार करावा. शंकरः शेशाशायीच मार्तंडो मारुतिस्तथा एतेषा दर्शनं पुण्यं नित्यनेमे विशेषतः ..! भक्त ज्ञानी आणि वीतरागी,साक्षात्कारी,तापसी,योगी सत्पात्र व्यक्ती पाहून लगेच नमस्कार घालावे. वेदांचे जाणकार,शास्त्रांचे जाणकार, सर्व जाणणारे पंडित, पुराणिक, विद्वान, याज्ञिक, वैदिक, पवित्र जन यांना सद्गुरुचे अधिष्ठान आहे असं समजून आदरपूर्वक नमस्कार करावा. गणेश, शारदा नाना शक्ती, हरिहराच्या अवतार मूर्ती, नाना देव किती वेगवेगळे सांगू? त्यांना नमस्कार केला की तो एका परमेश्वरासच प्राप्त होतो.
यावर एक वचन आहे ते ऐका
आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरम
सर्व देव नमस्कार केशवम प्रति गच्छति!
अशाप्रकारे सर्व देवांना आदरपूर्वक नमस्कार करावा. त्यामुळे देवांना परमसुख वाटते. देवदेवतांची अधिष्ठाने, सद्गुरूंची स्थाने या दोन्हींना नमस्कार करावा. नमस्कारामुळे विनम्रता येते, नमस्कारामुळे संशय नाहीसा होतो, नमस्कारामुळे नाना सत्पात्र लोकांशी मैत्री होते. नमस्कारामुळे दोष जातात, नमस्कारामुळे अन्याय दूर होतात, नमस्कारामुळे नाहीसे झालेले समाधान पुन्हा प्राप्त होते. माथा टेकवणे यासारखा उपाय नाही. त्यामुळे नेहमी देव, भक्त यांना वंदन करावे.
नमस्कारामुळे कृपा उचंबळते, नमस्कारामुळे प्रसन्नता निर्माण होते, नमस्कारामुळे गुरुदेवाची साधकांवर कृपा होते.कोणतीही अपेक्षा न करता नमस्कार केल्यास दोषांचे पर्वत नाहीसे होतात आणि परमेश्वराची कृपा होते. नमस्कारामुळे पतीत असलेले पावन होतात, नमस्कारामुळे जन्म मरणापासून दूर राहता येते. भरपूर चुका केल्या आणि साष्टांग नमस्कार घातला तरी श्रेष्टींनी क्षमा केली करावी. याप्रमाणे नमस्कारासारखे अनुसरण्यास योग्य दुसरे काही नाही. नमस्कार करण्यासाठी खर्च येत नाही, नमस्कारासाठी कष्ट पडत नाहीत, नमस्कारासाठी कोणतीही वेगळी उपकरणे किंवा सामग्री लागत नाही. नमस्कारसारखे सोपं दुसरे काही नाही. अनन्यभावाने नमस्कार करावा. त्यासाठी इतर साधने कशासाठी शीणवायची? साधकाने भावपूर्वक नमस्कार घातला तर त्याची काळजी गुरूला लागली, तो योग्य मार्गाला लावेल म्हणून नमस्कार हा श्रेष्ठ असतो. त्यामुळे वरिष्ठ लोकांची कृपा प्राप्त होते. अशीही सहावी नमस्कार भक्ती स्पष्ट केली आहे.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे वंदन भक्ती नाम समास षष्ठ समाप्त.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे

मोबाइल- ९४२०६९५१२७