भावार्थ दासबोध -भाग ७५

निरुपण : पद्माकर देशपांडे

0

दशक सहावे समास दुसरा 

जय जय रघुवीर समर्थ.जे शस्त्राने तोडले तरीही तुटत नाही, अग्नीने जाळले तरी जळत नाही, पाण्यामध्ये कालवले तरी कालवले जात नाही. वाऱ्यामुळे उडत नाही, पडत नाही झडत नाही, घडत नाही, दडत नाही. जे परब्रम्ह असते त्याला कोणताही रंग नसतो तो सगळ्यांपेक्षा विलक्षण असते, परंतु सदासर्वकाळ वसते. दिसलं नाही तरी काय झालं? पण ते सगळीकडे असते! सूक्ष्मपणे सगळीकडे भरलेले असते. आपल्या डोळ्यांना दिसेल तेच पाहण्याची आपल्याला सवय असते पण जे गुप्त आहे ते जाणावे. दिसते ते असार आहे, गुप्त आहे ते हे सार आहे, गुरूच्या मुखाद्वारे हा विचार समजू शकतो. उमजत नाही नाही ते समजावे, दिसत नाही नाही ते पहावे, जे कळत नाही ते जाणावे. विवेकाच्या योगाने गुप्त तेच प्रकट करावे, असाध्य ते साध्य करावे, अवघड आहे ते सावकाश अभ्यासावे. वेद, ब्रह्मदेव आणि शेष हे देखील शिणले तेच परब्रह्म साधावे.

कोणत्या उपायाने ते जाणावे तीच माहिती देत आहे. अध्यात्म श्रवण करून परब्रह्म व्हावे. पृथ्वी नाही, आप नाही, तेज नाही, वायू नाही, व्यक्त होणारे वर्ण नाही असे ते अव्यक्त आहे. त्याला म्हणावे देव! सामान्य लोकांच्या स्वभावानुसार गाव तितके देव. मात्र ते लोकांसाठी असतात. देव हा निर्गुण आहे. असा प्रत्यय आल्यावर आपणच आपला शोध घ्यावा. देवाची खरी ओळख पटते आणि आपणच देव होतो. माझे शरीर असे म्हणतो तरी तो देहापेक्षा वेगळाच असतो.

मन माझे असे जाणतो तरी मन म्हणजे आपण नाही.देहाचा विचार केला तर हा पाच तत्वांचा विस्तार आहे. ती नाहीशी झाल्यास आत्माच उरतो. आपल्याला ठाव नाही. इथे काहीही पाहावे लागत नाही. तत्व तत्त्वाच्या ठायी विभागली जातात. देह म्हणजे बांधलेले गाठोडे आहे ते जो कोणी विचार पूर्वक सोडवतो, तेव्हा ते आढळत नाही. शरीर म्हणजे तत्त्वांचे गाठोडे, याचा विचार पाहता एक आत्माच निरंतर आहे, आपण नाही. आपल्याला ठाव नाही, जन्म-मृत्यू कसे असतील? आत्म्याच्या ठायी पापपुण्य नसते. पाप-पुण्य, यमयातना हे निर्गुणी असताना नसतात. आपण ब्रम्हरूप झाल्यास जन्म मरण देखील नसत. देहबुद्धीने बांधला गेला तो विवेकामुळे मोकळा झाला.

देहातीत झाल्यावर मोक्षपद मिळाले. त्यामुळे जन्माचे सार्थक झाले.आपण निर्गुण आत्मा परंतु हा विवेक पाहणाऱ्यालाच दिसतो. जागे झाल्यावर स्वप्न नाहीसे होते, विवेक जागृत झाल्यावर दृश्य नाहीसे होते, स्वरूपानुसंधानामुळे प्राणीमात्र वाचतात. आपल्याला आपण निवेदन करावे, विवेकाने आपण न रहावे याचे नाव आत्मनिवेदन. आधी अध्यात्मश्रवण, मग सद्गुरू पादसेवन, पुढे सद्गुरूच्या प्रसादामुळे आत्मनिवेदन. आत्म निवेदनानंतर परिपूर्ण वस्तू निरंतर आत्मा हा बोध होतो. या ब्रह्मबोधामुळे आपण ब्रह्म होतो.

संसाराचा खेद नाहीसा होतो. देह प्रारब्ध भोगत राहतो. यालाच  म्हणतात आत्मज्ञान. याला म्हणतात समाधान.परब्रह्माशी अभिन्न भक्त झाला.आता व्हायचे ते होईना का!जायचे ते जाईना का! मनातील जन्ममृत्यूची शंका तुटली.संसारातील कष्ट,येरझारा चुकले. देव आणि भक्ताचे ऐक्य झाले. सत्संग केल्याने मुख्य देव कोणता ते ओळखले. इतिश्री दासबोध्ये गुरुशिष्यसंवादे, ब्रह्मपावन नाम समास द्वितीय समाप्त.जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः) 
निरुपण : पद्माकर देशपांडे

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!