नाशिक दि.२७ ऑक्टोबर २०२४ – नियमबाह्य आणि बेकायदेशीर कामे रोखण्याच्या दृष्टीने मंत्री छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ आमदार पंकज भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार संजय पवार यांना सोबत घेऊन एकदिलाने निवडणूक लढविली. सोबत असताना आमच्यावर कुठलेही आरोप झाले नाही मात्र ते आमच्यातून बाहेर गेल्यावर जे आरोप करत आहे हे राजकीय षडयंत्र आहे. बाजार समिती निवडणुकीत आमदार संजय पवार यांनी जे भाषण केले होते. त्या भाषणाचा पूर्णपणे विसर पडला असल्याची टीका बाजार समितीचे सभापती दिपक गोगड यांनी केले.
माजी आमदार संजय पवार आणि माजी नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी केलेल्या आरोपाचे खंडन करण्यासाठी आज भयमुक्त नांदगाव – प्रगत नांदगाव समन्वय समितीचे विनोद शेलार, बाजार समिती सभापती दीपक गोगड, विजय पाटील, रतन हलवार, नगरसेवक संजय निकम, नगरसेवक संतोष अहिरे, बाजार समिती सदस्य योगेश कदम,हबीब शेख, योगेश जाधव, बबन आव्हाड यांनी मनमाड शहरात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
नियमबाह्य बेकायदेशीर कामांना छेद देण्यासाठी आम्ही एकत्र निवडणूक लढविली. मराठा समाजाला प्रतिनिधित्व मिळावे यासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी बाजार समिती सभापती पदाची संधी माजी आमदार संजय पवार यांना दिली. त्याच संजय पवार यांना षडयंत्र करून अपात्र केलं. ते कुणी केलं याचा अभ्यास संजय पवारांनी करावा. उगाच बिनबुडाचे आरोप करू नये. विरोध तात्विक असेल तर आम्ही त्याला उत्तर देऊ मात्र राजकीय षडयंत्र केले जात असेल तर आम्ही त्याला उत्तर देणार नाही. त्यांच्याच कार्यकाळात बोगस परवाने दिले गेले. एका महिलेला परवाना दिल्यानंतर तिने पावणे तीनशे शेतकऱ्यांची फसवणूक केली. त्या सर्व शेतकऱ्यांना आम्ही तातडीने पैसे मिळवून दिले असल्याचे दिपक गोगड यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी विनोद शेलार म्हणाले की, माजी आमदार संजय पवारच का अपात्र ठरले यांच्या मागे कुणाचं षडयंत्र आहे याचं विचार त्यांनी करावा. तसेच त्यांनी जे आरोप केले ते करण्यासाठी त्यांच्यावर कुठल्या शक्तीच्या सांगण्यावरून करताय असा सवाल करत आपण आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा खरोकर किती विकास केला हे विरोधकांना सांगावे अशी टीका त्यांनी केली.
यावेळी संचालक योगेश कदम म्हणाले की, मराठा समाजाचे सर्वाधिक पाच सदस्य निवडून आणण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी महत्वाचे योगदान दिले. जे आज मराठा समाजाची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. जे आज मराठा समाजावर अन्याय झाला असा सांगत त्यांनी मराठा समाजाचे संचालक अपात्र होण्यासाठी याचिका दाखल केली असा आरोप कदम यांनी यावेळी केला.