दृष्टी बदला,सृष्टी बदलेल!

बालक पालक नात्यावर आधारित लेखमाला : ४४ : लेखिका -आदिती मोराणकर

0

पाण्याच्या अर्ध्या भरलेल्या ग्लासकडे बघून त्याला अर्धा रिकामा म्हणणाऱ्या लोकांना आपण ‘निगेटिव्ह’ म्हणतो तर ग्लास अर्धा भरलेला आहे हा दृष्टिकोन बाळगणाऱ्यांना आपण ‘पॉझिटिव्ह’ म्हणतो. मी म्हणते ‘तो ग्लास अर्धा भरलेला असून, अजूनही काही जागा आपण आपल्या प्रयत्नांनी भरण्यासाठी शिल्लक आहे.’ ग्लास तोच, पाणी तेवढेच, पण बघणाऱ्यांचा दृष्टिकोन वेगवेगळा!

एकदा साने गुरुजी आणि त्यांचे सहशिक्षक पारोळ्याला फिरायला म्हणून गेले. तिथे ज्यांच्या घरी मुक्काम पडला त्यांना एक लहान मूल होते. सहाजिक घरात गेल्यानंतर जवळपास सगळ्या शिक्षकांनी शैक्षणिक अविर्भावात “ए मुला, तुझे नाव काय? इकडे ये, कितवीत शिकतोस? किती गुण मिळवतोस? मोठा होऊन काय करणार?” असे प्रश्न विचारले. त्या मुलाने एकाही शिक्षकाला उत्तर देण्याची तसदी घेतली नाही, मग सगळ्या शिक्षकांनी ‘हा मुलगा घुम्याच दिसतो’ अशा टिप्पणीवर त्या मुलाचा नाद सोडला आणि ते आपापल्या कामासाठी रवाना झाले. साने गुरुजी मात्र हे सगळं शांतपणे बघत होते. त्या मुलाला स्वतःकडे न बोलवता, ते स्वतः उठून त्या मुलाजवळ गेले. त्यांच्या हातात एक फुल होतं. ते फुल त्यांनी त्या लहान मुलाला दिलं आणि अगदी प्रेमळ आवाजात म्हणाले,”तुला फुल आवडतं?” त्यांच्या हातातून फुल घेताना मुलानी एक हलका कटाक्ष साने गुरुजींकडे टाकला. त्यांच्या चेहऱ्यावरचे स्मितहास्य बघून तो मुलगा पटकन म्हणाला, “हो ! फुल आवडतं मला.”

“आणि तुला गोष्ट आवडते?” “हो….” “मग मी सांगू तुला गोष्ट?”“चालेल, पण मोठी सांगा”

साने गुरुजी त्या मुलाला गोष्ट सांगण्यामध्ये रंगून गेले. त्यांचे सहशिक्षक परत आले तेव्हा त्यांना या मुलाला मनमोकळ्या गप्पा मारताना बघून आश्चर्य वाटलं. बाकी शिक्षक परत आल्यानंतर तो मुलगा आपल्या खोलीत पळून गेला. त्यावर एका शिक्षकांनी साने गुरुजींना विचारलंच, “बोलले वाटतं घुम्या देव आपल्याशी…” साने गुरुजींनी उत्तर दिलं “हा घुम्या देव नव्हताच मुळी! तुम्ही तुमच्या नेहमीच्या दृष्टीतून त्याच्याकडे बघितलं म्हणून तो घुम्या वाटला. जरा तुमची दृष्टी बदलून बघा, सृष्टी ही बदलेल!”काय वाटले ही गोष्ट वाचून? कधी कधी आपणही आपल्या मुलांकडे त्याच त्याच दृष्टिकोनातून बघतो याची जाणीव झाली का?

खरंतर मुलांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बरोबर आहे का? हे सगळ्यात पहिले तपासून बघायला हवं. “आपल्या आजूबाजूला जे घडत असतं त्याच परिस्थितीचा भाग म्हणून आपल्याही मुलांनी तसेच वागले पाहिजे” हा आपला अट्टाहास असतो, कारण या परिस्थितीत ‘आपलं मुल इतरांपेक्षा वेगळं वागलं तर ते समाजमान्य होणार नाही’ याची आपल्याला भीती वाटते. प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्याची पद्धत ही प्रत्येकाची वेगळी असू शकते. आपण मात्र या वेगळेपणाला घाबरतो. आपलं ‘मूल नर्सरीत गेल्यापासून ट्युशन लावून त्याला परफेक्ट बनवण्याचा आपला अट्टाहास’ हा या भीतीचा एक भाग आहे.

‘वर्तनात अपेक्षित बदल करणे म्हणजे शिक्षण’ ही व्याख्या आपण निमूटपणे स्वीकारली आणि औपचारिक शिक्षणाचे धडे अगदी पहिल्या इयत्तेपासून मुलांना गिरवायला लावले. मुलांनी सगळ्यांच्या बरोबर प्रगती करावी, मागे राहू नये, यश मिळवावे हा आपला दृष्टिकोन, मात्र याच दृष्टिकोनाकडे सजगतेने बघण्याची गरज आहे.

वयाचे दोन टप्पे जीन पियाजे नावाच्या मानसशास्त्रज्ञाने सांगितले आहेत. पहिला टप्पा असतो तो जन्मापासून दोन वर्षापर्यंतचा आणि दुसरा टप्पा आहे ते दोन वर्षापासून आठ वर्षांपर्यंतचा! पहिली दोन वर्ष बालक त्याच्या शरीराच्या हालचाली नियंत्रित करण्याकरिता धडपडत असते. त्याच वेळेला त्याची त्या अनुभवांमधून बौद्धिक जडणघडण देखील होत असते. मुलाचं पहिलं हसणं, रांगणं, पालथ पडणं, पहिल्यांदा आई-बाबा म्हणणं, उभा राहणं, पहिल पाऊल टाकणं या सगळ्या क्रियांवर आपलं बारीक लक्ष असतं. मात्र याच वेळेला मुलाचा बौद्धिक विकास कसा घडतो आहे याबाबत आपण फारसे सतर्क नसतो. वर्तनात अपेक्षित बदल करण्यामागे म्हणजेच ‘हे करू नको, ते करू नको, इकडे जाऊ नको, तिकडे बसू नको, इथे हात लावू नको’ अशा सूचना देण्यामध्ये आपण गर्क असतो, पण ती सूचना न देता मूल नक्की काय करते आहे? याचे निरीक्षण करण्यामध्ये आपल्याला अजिबात स्वारस्य नसते आणि हाच दृष्टीकोन मुलांसाठी मारक ठरतो आहे.

दोन ते आठ वर्षांपर्यंत मुलांचा सर्वांगीण विकास अतिशय वेगाने होत असतो. त्याच्या जाणिवा, अनुभव विकसित होत असतात. येणाऱ्या अनुभवांवर आधारित विचारशक्ती आणि निर्णय क्षमता मुलांमध्ये येत असते. हीच तार्किक विचारशक्ती आणि निर्णय क्षमता वाढवण्यासाठी मुलांनी अनुभव घेणे महत्त्वाचे असते. नुसते लिहून, वाचून, पाठ करून किंवा पालक म्हणून, शिक्षक म्हणून, नातेवाईक म्हणून, घरातल्या मोठ्या व्यक्ती म्हणून आपण दिलेल्या सूचना ऐकून मुलांचा सर्वांगीण विकास होत नसतो.

“म्हणजे आता आम्ही काय मुलांकडे फक्त बघत बसायचं का? त्यांनी काहीही केलं तरी त्यांना काही सांगायचंच नाही का?” हा आपला दुसरा आतातायी दृष्टिकोन….“घार हिंडते आकाशी, लक्ष तिचे पिल्लांपाशी”… आणि कासवाची गोष्ट तुम्हाला माहीतच असेल ना? ससा आणि कासवाची नाही! ती गोष्ट तर दुर्दैवाने प्रत्येक पालकाला माहिती असते आणि म्हणूनच पालक आपल्याही मुलांना शर्यतीत उतरवत असतात. कासवाबद्दलची एक अलौकिक गोष्ट अशी आहे की कासवाची पिल्लं अंड्यातून बाहेर आली तरी त्यांची आई त्यांना भेटत नाही. कासव कधीही अंड्यांवर बसून अंडी उबवत नाहीत, लांबूनच फक्त नजरेने अंड्यांची देखभाल करत असतात. जर घारीला आणि कासवाला हे जमतं तर आपणही पालक म्हणून मुलांना थोडीशी अनुभव घेण्याची मोकळीक देऊ शकतो ना? आपण दिलेल्या सूचनांनी आपण मुलांची विचारक्षमता कमी करतो. त्यांच्या डोक्यात एका विशिष्ट पद्धतीने सुरू झालेल्या विचारांचे खंडन करतो. आपण जे सांगतो आहे, जसं सांगतो आहे, जेवढं सांगतो आहे, तेवढेच केलं की 100% यश मिळणार याची “गॅरंटी” आपण मुलांना देतो. थोडक्यात काय तर आपण मुलांसाठी ‘21 अपेक्षित संचाचे’ काम करतो. त्यापलीकडे ‘फक्त उत्सुकता, कुतूहल म्हणून काही नवीन गोष्टींचे अनुभव मुलांनी घ्यावेत’ असे आपल्याला वाटत नाही. ‘इतर गोष्टींचे अनुभव घेण्यात वेळ वाया जातो’ हा आपला दृष्टिकोनही घातकच आहे

अनुभवांमधून मुल कसे शिकते? तर एखाद्या प्रसंगाला समोर गेल्यानंतर त्या प्रसंगातून निर्माण झालेला तिढा कसा सोडवावा याबद्दल विचार सुरू होतात. असा प्रसंग याआधी आपल्या आयुष्यात कधी आला होता का हे आठवून बघितले जाते. ‘हा प्रसंग पहिल्यांदाच आयुष्यात घडतो आहे मग आता यावर आपण काय प्रतिक्रिया द्यावी?’ याचा अजून एक विचार डोक्यात येतो आणि त्या परिस्थितीत ती प्रतिक्रिया किती योग्य होती हे अनुभवातून मुलं शिकु शकतात. जर आपण त्याला परिस्थितीचा आणि प्रतिक्रियेचा ठोकताळा रेडिमेड दिला तर मुलगा शिकणार कसा? अनुभव घेतल्यानंतर ती प्रतिक्रिया, तो अनुभव मुलांच्या मेंदूत कायमस्वरूपी कोरला जातो, जो आयुष्यात नंतर कुठेतरी नक्कीच कामात येतो. तीच प्रतिक्रिया जर तुम्ही 21 अपेक्षित संचामधून दिलेली असेल तर मात्र परत त्याच परिस्थितीत गेल्यानंतर मूल त्या परिस्थितीचं उत्तर न शोधता 21 अपेक्षितच शोधायला सुरुवात करेल. मग मात्र आपणच “इतका मोठा घोडा झाला तरी स्वतःचे प्रश्न सोडवता येत नाहीत का?” अशा भाषेत त्याचा पाणउतारा करु पण “तुम्हीच मला सतत सूचना देऊन माझी विचारशक्ती कमकुवत केली आहे” हे सुचण्याची मुभा तुम्ही मुलांना ठेवलेली नसेल.

आपल्या मुलाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची योग्य वेळ अशी नसते. ज्या क्षणी आपल्याला जाणीव होईल तीच योग्य वेळ समजा. मुलांना एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून मान्य करा. त्यांच्या अनुभवातून ते शिकतील यावर विश्वास ठेवा. मुलांच्याबाबतीतला तुमचा अट्टाहास थोडासा आवरता घ्या. तुमची मुलांकडे बघण्याची दृष्टी बदला, मग तुमच्या मुलांची सृष्टी बदलणार आहे यावर विश्वास ठेवा.पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी एका नवीन विषयासह धन्यवाद!

आदिती मोराणकर (स्पेशल एज्युकेटर  व शिक्षण विश्लेषक)
संचालिका : ईस्कुलिंग डिजीस्मार्ट किंडरगार्टन व डे केअर सेंटर.
eskooling2020@gmail.com | 8329932017 / 9326536524
Aditi Morankar
आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!