मुंबई,दि.७ मे २०२३ – येत्या ९ मे दरम्यान बंगालच्या उपसागरातून मोचा चक्रीवादळ सक्रिय होणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलीय.त्यामुळे पुढील आठवडाभर मध्य महाराष्ट्र, कोकण या भागात आठवडाभर पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मोचा चक्रीवादळ सक्रिय झाल्यानंतर देशातील पूर्वभागासह मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, बिहार, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशातही हवामानात बदल होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय. त्यामुळे मच्छीमारांना पुढील चार दिवस समुद्रापासून दूर राहण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. तर हवामान खात्याच्या अंदाजानुसार, या तीन राज्यांत गारपीट होण्याची शक्यता आहे. केरळ, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.
दरम्यान अंदमान , निकोबार, केरळ, तामिळनाडू या भागात १२ मेपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या बहुतांश भागात गेल्या १५ ते २० दिवसांपासून पावसाने हजेरी लावलीय. दरम्यान पावसाचा जोर कमी झाला असला तरी थांबलेला नाही. त्यातच आता बंगालच्या उपसागरात ९ मेपासून कमी दाबाचा पट्टा आहे. त्याचा परिणाम राज्यावर होणार आहे.
हवामान विभागाने देशातील अनेक भागांना वादळाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली असून अनेक भागांसाठी अलर्ट जारी केला आहे. IMD नुसार, बंगालच्या उपसागराच्या लगतच्या भागात ८ मे ते १२ मे दरम्यान बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. त्याचवेळी, ८ ते ११ मे दरम्यान किनारपट्टी आणि सीमावर्ती भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकतो.