जिल्हा बँकेने सुरू केलेली सक्तीची कर्ज वसूली तातडीने थांबवावी
खा. गोडसे यांचे सहकार मंत्र्यांना साकडे
नाशिक – गेल्या तीन वर्षांपासून सतत पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे जिल्हयातील शेतकरी वर्ग आर्थिक विवंचनेत सापडला आहे.अशातच गेल्या माहिन्याभरापासून सर्वत्र वरूण राजाचा प्रकोप झाल्यामुळे तर शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेली पिके उध्वस्त झाल्याने आता शेतकरी वर्ग कर्जाच्या खाईत लोटला गेला आहे. बळीराजावर आलेले संकट खूपच मोठे असल्याने जिल्हा बँकेच्या प्रशासनाने शेतकऱ्यांना थकीत कर्ज भरण्यासाठी मुदत द्यावी तसेच सक्तीची कर्जवसुली करू नये वा त्यांच्या शेती अवजारांची लिलाव करू नयेत असे साकडे खा. गोडसे यांनी सहकार मंत्री अतुल सावे यांच्याकडे घातले आहे.
अवकाळी पाऊस आणि अनेकदा अतिवृष्टी यामुळे गेल्या काही वर्षांपासून शेतकरी हा कर्जाच्या खाईत लोटला गेलेला आहे.यामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे .मनात असूनही शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करणे शक्य होत नसल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे थकबाकीदार झाले आहेत. परिणामी आता बँक प्रशासनाने सक्तीने कर्ज वसुली सुरू केली असून शेतकऱ्यांच्या साधनसामुग्रीचा लिलाव करणे सुरू केले आहे.यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाले आहे .
शेतकऱ्यांकडून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रशासनाच्या विरोधात आलेल्या तक्रारींची दखल घेऊन आज खा.गोडसे यांनी सहकार मंत्री अतुल सावे यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली. सततच्या नैसर्गीक संकटामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला गेल्याने बळीराजा कर्जबाजारी झालेला आहे.कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देणे अत्यंत गरजेचे असून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रशासनाने सुरू केलेली सक्तीची कर्ज वसुली आणि शेतकऱ्यांच्या साधनसामुग्रीच्या लिलाव प्रक्रिया तातडीने थांबविण्यात यावी असे साकडे खा.गोडसे यांनी नामदार सावे यांना घातले आहे. आपली मागणी वस्तुस्थितीला धरून असल्याने सरकार यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेईल अशी ग्वाही यावेळी नामदार सावे यांनी खासदार गोडसे यांना दिली आहे.