नवी दिल्ली – हळदीच्या पेटंटबाबतचा अमेरिकेशी २३ ऑगस्ट १९९७ पासून सुरु असलेला कायदेशीर लढा भारताने जिंकला आहे.एखाद्या विकसनशील देशाने अमेरिकन पेटंटला आव्हान देऊन तो जिंकण्याची जगातील ही पहिलीच घटना आहे.
१९९५ मध्ये अमेरिकेतील मिसिसिपी विद्यापीठामधील दोन संशोधकांना हळदीच्या जखम बरी करण्याच्या गुणधर्मावर अमेरिकेत पेटंट मिळाल होतं. त्यानंतर हळदीसाठी भारत आणि अमेरिका समोरा समोर उभे राहिले. भारताने आपली बाजू भक्कम मांडली अनेक संदर्भ दिले आणि अखेर हा लढा जिंकत हळद ही भारताचीच असल्याचे संपूर्ण जगाला दाखवून दिले.
हळदीच्या पेटंटबाबत डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी वृत्तपत्रात याबाबतचं वृत्त वाचलं आणि त्यांना धक्काच बसला. माशेलकर त्यावेळी दिल्लीमध्ये सीएसआयआरचे संचालक म्हणून रुजू झाले होते. त्यांनी हळदीच्या या पेटंटच्या विरोधात लढा द्यायचं ठरवलं.आणि सीएसआयआर मधील अनेक शास्त्रज्ञ कामाला लागले. त्यासाठी हळदीचा हा गुणधर्म भारतातील लोकांना हे पेटंट फाईल होण्याआधीपासून माहित होता हे सिद्ध करणं गरजेचं होतं.
सीएसआयआरने त्यासाठी तब्बल ३२ संदर्भ शोधून काढले. हे सर्व संदर्भ संस्कृत, उर्दू आणि हिंदीमधील होते. यातील काही संदर्भ तर शंभर वर्षांपेक्षा जुने होते. त्यामुळे हे पेटंट अमेरिकन पेटंट ऑफिसने नाकारलं. एखाद्या विकसनशील देशाच्या पारंपरिक ज्ञानाला मान्यता देण्याच्या बाबतीत हळदीवरील पेटंटची केस हा एक मैलाचा दगड ठरला. असे सांगितले जाते की, हा खटला लढण्यासाठी सीएसआयआरने त्यावेळी अमेरिकन वकिलाची नेमणूक केली होती. या केससाठी तब्बल १५ हजार डॉलर्स खर्च केले होते. सीएसआयआरने बरीच कागदपत्रे सादर केली होती जी अनेक सायन्स जर्नल आणि पुस्तकांमध्ये प्रकाशित झाली होती. याच कागपत्रांमुळे भारताची बाजू भक्कम झाली आणि हा लढा जिंकण्यास भारताला बळ मिळालं.