नाशिक,१२ ऑक्टोबर २०२२ – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या यंदाच्या केंद्रीय युवक महोत्सवाचे सर्वसाधारण विजतेपद प्रथम क्रमांकाच्या दहा पारितोषिकांसह कोल्हापूर विभागाने पटकावले. येथील मुक्त विद्यापीठाच्या आवारातील दृक्श्राव्य इमारतीत व शैक्षणिक सभागृहात संपन्न झालेल्या या महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अभिनेते मिलिंद गुणाजी उपस्थित होते. कुलसचिव डॉ प्रकाश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्घाटन व पारितोषिक वितरण सोहळ्याला परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील, वित्त अधिकारी गोविंद कतलाकुटे,विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण संचालिका प्रा. डॉ. विजया पाटील उपस्थित होते.
मुक्त विद्यापीठाच्या आवारात अतीशय चैतन्यदायी वातावरणात झालेल्या या केंद्रीय युवक महोत्सवातून निवडलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठ आयोजित ‘इंद्रधनुष्य २०२२’ मध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. राहुरीचा इंद्रधनुष्य महोत्सव नोव्हेंबरमध्ये होत आहे. विद्यापीठाच्या नाशिक, मुंबई, नागपूर, पुणे, अमरावती, नांदेड, कोल्हापूर, औरंगाबाद या आठ विभागीय केंद्रातून १५० विद्यार्थी सहभागी झाले. एकांकिका, मुकाभिनय, मिमिक्री, प्रहसन, शास्त्रीय गायन, समूह गायन, सुगम संगीत, वाद्यवादन, समूह नृत्य, शास्त्रीय नृत्य, वक्तृत्व, वादविवाद, चित्र, पोस्टरमेकींग, रांगोळी, स्पॉट फोटोग्राफी, क्ले मॉडेलिंग, प्रश्नमंजुषा, शिल्पकला इत्यादी स्पर्धेत कोल्हापूर विभागीय केंद्राच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली.
आपल्या आवडीच्या क्षेत्रातच शिखर गाठण्याची संधी – मिलींद गुणाजी
आपल्या आवडीच्या क्षेत्रात मनापासून झोकून देऊन काम केलं तर मिळणाऱ्या यशाचा आनंद वेगळा असतो, म्हणून चिकाटी सोडू नका, असे आवाहन मिलींद गुणाची यांनी विद्यार्थ्यांना केले. यावेळी मिलिंद गुणाजी यांना विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम रंगला. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नाला गुणाजी यांनी दिलखुलास उत्तरे दिली. खलनायकाची भूमिका करतानाही आपल्यातला माणूस जागा ठेवावा लागतो. तेव्हा तो अभिनय रंगतो, असे सांगत त्यांनी त्यांच्या भटकंतीमधील रंजक गोष्टींचे कथन केले. सांस्कृतिक प्रगतीतूनच विदयार्थी माणूस म्हणून घडत जातो, असे प्रतिपादन डॉ. देशमुख यांनी केले. प्रा. डॉ. विजया पाटील यांनी सदर स्पर्धेतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आगामी इंद्रधनुष्य स्पर्धेसाठी प्रशिक्षण दिले जाईल अशी घोषणा केली. सूत्रसंचालन दृक श्राव्य विभागाचे प्रशांत कुलकर्णी व नाट्यशास्त्र विभागाचे सहयोगी सल्लागार सचिन शिंदे यांनी केले. यावेळी विद्यापीठाच्या विविध विभागीय केंद्राचे अधिकारी – पदाधिकारी, विविध कलांचे तज्ञ परिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी आदी उपस्थित होते.परीक्षक म्हणून श्रीराम वाघमारे, सई मोने पाटील, आनंद अत्रे, भूपाली देवरे, आदिती नाडगौडा पानसे, अमीत घरत, प्रशांत भरवीरकर, संजय वाघ, केशव कासार, विजया येवलेकर यांनी काम पाहिले.
कोल्हापूर केंद्राला सर्वसाधारण विजेतेपद
स्पर्धानिहाय निकाल पुढीलप्रमाणे – शास्त्रीय नृत्य -प्रथम – प्रशांत काजरेकर (पुणे), शास्त्रीय वाद्य संगीत (तालवाद्य) – प्रथम सुजीत तांबे (कोल्हापूर), द्वितीय – श्वेता पाटील (मुंबई), समूहगीत – (भारतीय) प्रथम – साबजी वारंग (कोल्हापूर), द्वितीय – पायल वाघमारे (नाशिक), समूहनृत्य – (लोकनृत्य) विजेते – तारपानृत्य – मुंबई, शास्त्रीय नृत्य – प्रथम आस्था दहेकर, द्वितीय कल्याणी शिंगडे, मिमिक्री – प्रथम श्रवण अडोडे. व्यंगचित्रे – प्रथम वाणीश्री लोहार (कोल्हापूर), मातीकला प्रथम – गोपाळ वडवाळे (नांदेड) द्वितीय विशाल मूतनाले (कोल्हापूर), पोस्टरमेकिंग – सिद्धांत तलवडेकर (कोल्हापूर) , स्पॉटफोटोग्राफी – प्रथम ओमजीत शिवणे, प्रश्नमंजुषा प्रथम संघ – नाशिक व अमरावती विभागून, द्वितीय क्रमांक नांदेड विभागीय केंद्र, वक्तृत्व – प्रथम अनुराज कटला (नांदेड), द्वितीय साक्षी गवळी (नांदेड), वादविवाद प्रथम उद्धव दशरथे, द्वितीय सार्थक बधान, एकांकिका प्रथम हा वास कुठुन येतोय (कोल्हापूर) , द्वितीय – सुरू(मुंबई), प्रहसन – प्रथम – वय वर्ष ७५ (कोल्हापूर), मुकाभिनय – प्रथम – इंडियन सोल्जर (नांदेड), द्वितीय मोबाईलचे दुषपरिणाम (नाशिक), स्थळचित्रण प्रथम कुंजल पोटे (अमरावती), द्वितीय प्राची शिवणे (कोल्हापूर), रांगोळी प्रथम संकेत शिनगारे (नांदेड), द्वितीय स्नेहा रताळे (अमरावती)