बडगुजर,शिंदे यांच्या अनुभवाचा जोरावर नाशिक लोकसभेची जागा कायम राखणार:सुनील बागूल

जिल्ह्यात'मविआ'बाजी मारणार:शिवसेना ठाकरे गटाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचे पदग्रहण

0

नाशिक,दि,२८ फेब्रुवारी २०२४ –आगामी लोकसभा निवडणुकीत नाशिकसह जिल्ह्यात महाविकास आघाडीला जिल्ह्यात दैदीप्यमान यश मिळेल आणि शिवसेना ठाकरे गट नाशिकची जागा कायम राखेल,असा विश्वास व्यक्त करतांनाच नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर आणि महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्या अनुभवाचा आम्हाला निश्चितच फायदा होईल,असे शिवसेनेचे उपनेते सुनील बागुल यांनी सांगितलं.

शिवसेनेचे नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर,महानगरप्रमुख विलास शिंदे आणि नाशिक लोकसभा संघटक विजय करंजकर यांचा पदग्रहण सोहळा तसेच सत्काराचा कार्यक्रम शालिमार कार्यालयात आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बागूल बोलत होते.

व्यासपीठावर माजी महापौर विनायक पांडे,माजी आमदार वंसत गिते,माजी नगरसेवक डी.जी.सूर्यवशी,महिला आघाडी उत्तर महाराष्ट्र संघटक रंजना नेवाळकर,मनाली चौकीदार निवृत्ती जाधव,जगन आगळे,देवानंद बिरारी,महेश बडवे,सचिन मराठे, राहुल ताजनपुरे बाळकृष्ण शिरसाठ सुभाष गायधनी,शैलेश सूर्यवंशी,बाळासाहेब कोकणे,राहुल दराडे,सचिन बांडे,देवा जाधव,संतोष गायकवाड,नितीन चिडे,मसूद जिलानी,ऋषी वर्मा सुनील जाधव,राजू नाठे,विलास आहेर तसेच पदाधिकारी, लोकप्रतिनीधी,आंगीकृत संघटनांचे प्रमुख व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्धवजींच्या पाठीत खंजीर खुपसून बाहेर पडलेल्या गद्दारांना तसेच भाजपाला धडा शिकवण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी कंबर कसली असून आगामी निवडणुकीत या सर्वांचा पराभव करायचाच हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवूनच शिवसैनिकांनी मैदानात उतरावे. संघटना बांधणीचा अनुभव असलेले अभ्यासू नेतृत्व असे ज्यांचे वर्णन केले जाते अशा सुधाकर बडगुजर यांच्याकडे जिल्ह्याच्या तसेच कुशल प्रशासक म्हणून ओळखले जाणारे सर्वांचे लाडके विलास शिंदे यांच्याकडे महानगराच्या नेतृत्वाची धुरा आल्याने आता दिल्ली दूर नाही.लोकसभा निवडणुकीत शिवसेनाप्रणित महाविकास आघाडीच्या पदरात सर्व जागा पडतील,असे सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड आपल्या भाषणात म्हणाले.

पक्षाचे काम निष्ठेने केले तर पक्ष नेतृत्व त्याची दखल घेते हे मी स्वतः अनुभवले असून पक्षाने माझ्या पदरात पदांचे भरभरून दान दिले आहे.आता माझ्यावर जिल्हाप्रमुखपदाची जी जबाबदारी सोपविली आहे त्याला पुरेपूर न्याय देण्याचा मी प्रयत्न करेल.आगामी लोकसभा निवडणुका जिंकायच्यात हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून  व्यूहरचना आखण्यावर आमचा भर राहील.कुणी कितीही आदळआपट केली तरी नाशिकची जागा शिवसेना ठाकरे गटाकडेच कायम राहील.पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना जनताच धडा शिकवेल,असेनवनिर्वाचित जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सांगितले. महानगर तसेच जिल्ह्यात पक्षाची सक्षम बांधणी झाली असून कोणत्याही आव्हानांना सामोरे जाण्यास पक्षाचे मावळे सज्ज असल्याचा विश्वास व्यक्त करतांनाच उद्धवजी यांनी आमच्यावरची जबाबदारी सोपवली ती आम्ही निश्चितच पार पडू आणि विजयाची गुढी उभारु,असेही बडगुजर आपल्या मनोगतात पुढे म्हणाले.

नाशिक महानगरात शिवसेना ठाकरे गटाचे प्राबल्य असून गेल्या दोन सलग निवडणुकांमध्ये नाशिकच्या जनतेने लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्याच उमेदवाराला निवडून देऊन उद्धवजींवर विश्वास व्यक्त केला आहे. या निवडणुकीतही त्याचीच पुनरावृत्ती होईल, असा ठाम विश्वास नूतन महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी सत्कारास उत्तर देताना व्यक्त केला. सर्व घटकांना विश्वासात घेऊन महानगरात पक्षबांधणी अधिक बळकट करणार व उद्धवजींनी माझ्यावर जी जबाबदारी सोपवली आहे ती सार्थ करण्याचा मध्ये प्रयत्न करणार असेही शिंदे यांनी पुढे नमूद केले.

नाशिक जिल्ह्यात तसेच महानगरात शिवसेना ठाकरे गटाची मोठ्या प्रमाणात संघटना बांधणी झाली आहे. उद्धवजींना मानणारा मोठा वर्ग तसेच निष्ठावंत शिवसैनिकांची जिल्ह्यात असलेली फौज हीच आमची खरी संपत्ती असल्याने नाशिकसह जिल्ह्यातील लोकसभेच्या सर्व जागा आम्ही मित्र पक्षांच्या मदतीने सहजगत्या काबीज करू. नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचाच उमेदवार निवडून येईल ही काळ्या दगडावरची रेघ आहे. पक्षाने मोठे केलेल्या अनेकांनी पक्षाची गद्दारी केली. परंतु या निवडणुकीत अशा लोकांना डिपॉझिट वाचविणेसुद्धा कठीण जाईल असा हल्लाबोल नवनिर्वाचित लोकसभा संघटक विजय करंजकर यांनी व्यक्त केला.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!