पुणे,दि. ३ जुलै २०२३ –ज्येष्ठ साहित्यिक ना.धो. महानोर यांचे आज निधन झाले. पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला ते ८१ वर्षांचे होते. महाराष्ट्रात ‘रानकवी’ आणि निसर्गकवी अशी ओळख असणारे आणि अनेक पिढ्यांना रानाची सफर आपल्या शब्दांच्या मार्फत घडवणारे ज्येष्ठ कवी ना.धो. महानोर यांच्या निधना मुळे साहित्य क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
एकाहून एक सरस गीतरचनांसाठी महानोरांनी सर्वांच्या मनाचा ठाव घेतला. त्यांची अनेक गीतं आजही रसिकांच्या मनाचा ठाव घेतात. कवी, गीतकार, शेतकरी, माजी आमदार अशी त्यांची चतुरस्त्र ओळख. बालकवी आणि बहिणाबाईंचा वारसा समृद्ध कऱणारे कवी अशी त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे. असा हा हरहुन्नरी कवी आज आपल्यात नसला तरीही त्यांचे शब्द मात्र कायमच आपल्यासोबत असणार आहेत.
महानोरांचा जन्म महाराष्ट्रातल्या वर्तमान औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण पळसखेड, पिंपळगाव, शेंदुर्णी येथे झाले. त्यानंतर जळगावातील महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला; मात्र त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पहिल्या वर्षापर्यंतच झाले. महाविद्यालयीन शिक्षण सोडून शेती करायला ते आपल्या गावी परतले . मराठी साहित्यविश्वात ते ‘रानकवी’ म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कवितांवर बालकवींचा प्रभाव जाणवतो.