नाशिक,१९ मार्च २०२३ -कवि कुसुमाग्रजांनी स्थापन केलेल्या व शहरात सांस्कृतिक क्षेत्रात मातृसंस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकहितवादी मंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ दिग्दर्शक मुकूंद कुलकर्णी तर उपाध्यक्षपदी, लक्ष्मण सावजी, संजय करंजकर, भगवान हिरे यांची निवड झाली आहे. मावळते अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे रविवार (१९ मार्च )रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही सर्वानुमते निवड करण्यात आली.

कवी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन लोकहितवादी मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करुन ज्यांनी विविध क्षेत्रात यश संपादन केले अशांचा अभिनंदनाचा ठराव पारीत करण्यात आला. मंडळाचे सचिव सुभाष पाटील यांनी मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन केले. त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. यानंतर मागील अर्थिक वर्षाचा हिशेब सादर करण्यात येऊन पुढील अंदाजपत्रक सादर करण्यात आले. मंडळाचे खजिनदार चंद्रकांत दीक्षित यांनी हिशेब पत्रकाचे वाचन केले.
यानंतर मावळते अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी अध्यक्षपदासाठी मुकूंद कुलकर्णी यांच्या नावाची घोषणा केली.सर्वानुमते त्याला मंजुरी देण्यात आली. यावेळी मावळते अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, तात्यासाहेब शिरवाडकर यांनी मला अध्यक्षपदाची सुत्रे बहाल केली. आज बावीस वर्षानंतर मी ती मुकूंद कुलकर्णी यांच्याकडे सोपवतो आहे. मी अध्यक्ष नसलो तरही यापुढे संस्था जी काही जबाबदारी माझ्यावर सोपवेल ती स्विकारण्यास मी तयार आहे. त्यानंतर नुतन अध्यक्ष मुकूंद कुलकर्णी म्हणाले की, मी लोकहितवादी मंडळात १९७९ साली आलो. आज ४० ते ४२ वर्षानंतर मी अध्यक्षपदी विराजमान झालो आहे. यापुढे माझ्या अगोदर ज्या अध्यक्षांनी संस्था नावारुपाला आणली त्याच्या पुढे जाऊन संस्था नावारुपाला आणण्याचा मी प्रयत्न करेन. यावेळी मुकूंद कुलकर्णी यांनी नवीन कार्य कारणीची घोषणा केली.

उपाध्यक्षपदी, लक्ष्मण सावजी, संजय करंजकर, भगवान हिरे कार्याध्यक्षपदी डॉ. प्रशात पाटील, सचिव सुभाष पाटील, सहसचिव फणिंद्र मंडलिक, किरण समेळ, खजिनदार चंद्रकांत दिक्षीत, कार्यकारीणी सदस्य प्रा.डॉ.शंकर बोऱ्हाडे, अपूर्वा शौचे, सागर संत, आदित्य समेळ, विक्रम सोनवणे यांची यावेळी निवड करण्यात आली. नुतन उपाध्यक्ष लक्ष्मण सावजी म्हणाले की, या संस्थेने मला भरभरुन दिले आहे. मी पदाधिकारी नव्हतो तेव्हाही माझे कार्य सुरुच होते आज मी उपाध्यक्ष झालो असल्याने माझी जबाबदारी वाढली आहे. कार्याध्यक्ष प्रशांत पाटील म्हणाले की, येत्या काही दिवसात संस्थेच्यावतीने समाजातील सर्व घटकांसाठी कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल त्याच प्रमाणे शहराचा भौगोलिक विस्तार वाढला आहे. त्यानुसार विविध भागात कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल.
व्यासपिठावर संस्थेचे विश्वस्त दिलीप साळवेकर, उपाध्यक्ष भगवान हिरे, संजय करंजकर, यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.