विश्वास ग्रुपतर्फे रविवारी पं अविराज तायडे यांचे गायन

0

नाशिक (प्रतिनिधी) : नव्या पिढीतील कलाकारांच्या अविष्काराला हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी सूर विश्वास या अनोख्या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. मैफिलीचे हे चौदावे पुष्प असून रविवार दि. ८ मे २०२२ रोजी सकाळी ६:०० वाजता पं. अविराज तायडे यांच्या गायनाचे आयोजन करण्यात आले आहे. नितीन वारे (तबला), दिगंबर सोनवणे (पखवाज), भक्ती बोरसे (संवादिनी) व अमित भालेराव (तालवाद्य) हे साथसंगत करणार आहेत. विश्वास ग्रुपचे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर व ऋचिता ठाकूर हे या उपक्रमाचे आयोजक असून संकल्पना विनायक रानडे यांची आहे.

विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. उदयोन्मुख कलावंताच्या प्रयोगशीलेचा अविष्कार रसिकांना दर महिन्याला अनुभवण्यास मिळणार आहे.

पं.अविराज तायडे यांचा भारतीय शास्त्रीय संगीतात नावलौकिक आहे. त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे श्री. राम माटे यांच्याकडून घेतले. गायनास योग्य आवाज, बुद्धीमत्ता, जिद्द या त्यांच्या गुणांनी ते या क्षेत्रात उंचीवर पोहचले. भारतरत्न पं. भीमसेन जोशी, पं. सी.आर. व्यास, श्री. देवरावजी भालेराव यांचे मार्गदर्शन पं. तायडे यांना मिळाले आहे. सध्या ते एस.एम.आर.के. महिला महाविद्यालयात संगीत विभागाचे प्रमुख आहेत. गायनातील प्रयोगशीलता, सादरीकरण यामुळे पं. तायडे यांच्या मैफिली भारतभर होत असतात. त्यात नादब्रह्म कला अकादमी, हैदराबाद, ऑल इंडिया रेडिओ, पतंजली संगीत समारोह, तामिळनाडू विष्णू कृष्ण जोशी संगीत महोत्सव, छत्तीसगढ, बिर्ला मंदिर, दिल्ली, श्यामरंग संगीत समारोह, दादर माटुंगा कल्चरल सेंटर, मुंबई आदी महोत्सवांचा समावेश आहे.

याबरोबर संगीताच्या माध्यमातून मानवी मनाशी थेट संवाद विविध कार्यक्रमातून सादर करतात त्यात म्युझिक थेरपी, संगीतसफर, रिलॅक्सेशन थ्रु रागास फॉर प्रोफेशनल्स. त्यांना संगीत सेवेबद्दल पं. भीमसेन जोशी कला गंधर्व पुरस्कार, पं. गजानन अनंत जोशी सन्मान, राष्ट्रीय शास्त्रीय गायक सन्मान, आदर्श शिक्षक पुरस्कार, पं. मनोहर पोतदार स्मृती पुरस्कार, रंगकर्मी पुरस्कार आदी पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रम विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, विश्वास गार्डन व ग्रंथ तुमच्या दारी यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे.तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वास ठाकूर, ऋचिता ठाकूर व विनायक रानडे यांनी केले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!