Nashik : राज्यपालांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक
युवक राष्ट्रवादीची राज्यपाल हटाव मोहिम : राष्ट्रपतींना लिहणार हजारो पत्रे
नाशिक – “समर्थ रामदास नसते तर शिवाजी महाराजांना कोणी विचारलं असत” अस आक्षेपार्ह वक्तव्य करत राज्यपालांनी समस्त महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे राज्यपालांना तातडीने हटवावे अशा मागणीचे ६००० पत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे नाशिक शहरातून पाठविणार आहे.
औरंगाबाद मधील कार्यक्रमावेळी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी गुरु विषयीच महत्व सांगताना महाराष्ट्र राज्याचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला. गुरुमुळे शिष्य घडत असतो असे सांगताना महाराजांचा एकेरी उल्लेख करत “समर्थ रामदास नसते तर शिवाजी महाराजांना कोणी विचारलं असत” अस वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांवर राजमाता जिजाऊनी संस्कार केले त्या आधारावर मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले. महाराजांचे गुरू राजमाता जिजाऊ, संत तुकाराम महाराज, दादाजी कोंडदेव हे होते.
प्रसिद्ध इतिहास लेखक बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुस्तकात सुद्धा समर्थ रामदास व छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट कधीच झाली नसल्याचा उल्लेख आहे. असे असताना महाराष्ट्र राज्याचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून महाराजांना कमी लेखण्याचा प्रयत्न केल्याने राज्यपालांना हटविण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस सहा विभागातून प्रत्येकी हजार याप्रमाणे सहा हजार पत्र राष्ट्रपतींना पाठविणार असल्याचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी सांगितले.