नाशिकमध्ये पावसाचा कहर;दारणा धरणातून ११०० तर गंगापूर धरणातून १००० क्युसेकने विसर्ग
गोदा काठी भांडी बाजारात शिरले पाणी,दुकानदारांची तारांबळ,प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
नाशिक,दि. १९ जून २०२५ — Nashik rain flood update नाशिक शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून, त्याचे गंभीर परिणाम आता दिसू लागले आहेत. गोदावरी नदीच्या पात्रात कमालीची वाढ झाल्याने दुतोंड्या मारुतीच्या मूर्तीपर्यंत पाणी पोहोचले असून, पातळेश्वर मंदिर अर्धवट पाण्यात गेले आहे.
भांडी बाजार, रामकुंड, गोदा घाट परिसरात पुराचे पाणी शिरले आहे, त्यामुळे फळ-भाजी विक्रेते आणि दुकानदाऱ्यांनी आपले सामान सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे. अनेक दुकाने अर्धवट बंद करण्यात आली असून व्यापाऱ्यांमध्ये मोठी तारांबळ उडाली आहे.
गंगापूर धरणातून १००० क्युसेक आणि दारणा धरणातून ११०० क्युसेक वेगाने विसर्ग(Nashik rain flood update)
गंगापूर धरण क्षेत्रात दोन दिवसांपासून संततधार सुरू आहे. त्यामुळे २० जून रोजी सकाळी ६ वाजता ५०० क्युसेक आणि ९ वाजता १००० क्युसेक वेगाने विसर्ग सोडण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. पाणी साठा वाढल्यास विसर्गात टप्प्याटप्याने वाढ होणार आहे.
दारणा धरणही ५० टक्के क्षमतेने भरले असून,आज दुपारी ३ वाजता दारणा पॉवर हाऊस मधून ११०० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला गेला आहे.
कार पाण्यात अडकली,रस्ते जलमय
गोदावरी नदीच्या काठावर रस्त्यावर पार्क करण्यात आलेली एक कार अचानक वाढलेल्या पाण्यात अडकली आहे. स्थानीय नागरिक व आपत्कालीन यंत्रणा गाडी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. काही मिनिटांतच पाणी इतकं वाढलं की वाहने आणि पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
त्र्यंबकेश्वर भागातही जोरदार पाऊस पडत असून कुशावर्त तीर्थ व मंदिर परिसरात गुडघाभर पाणी साचले आहे. शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी तुंबल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.
प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे
नदीपात्रात जाऊ नये, वाहनं दूर ठेवा
पशुधन, शेतमाल सुरक्षित ठिकाणी हलवावा
व्यापाऱ्यांनी दुकाने तातडीने रिकामी करावीत
प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्णतः सज्ज