नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे गोदावरीची पाणीपातळी वाढली

छोटी-मोठी मंदिरं पाण्याखाली,नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

0

नाशिक, दि. १९ जून २०२५ — Nashik rain update नाशिक शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही तासांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली असून, गोदावरी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. परिणामी, रामकुंड व गोदा घाट परिसरात काही लहान-मोठी मंदिरं पाण्याखाली गेल्याची माहिती समोर आली आहे.

हवामान खात्याने नाशिकसाठी ‘यलो अलर्ट’जारी केला असून, पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहणार आहे. शहरातील रस्ते, वाहतूक आणि शाळा-कार्यालयांच्या दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम जाणवत आहे. दरम्यान, त्र्यंबकेश्वरमध्येही मुसळधार पावसामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

पालखेड व दारणा धरणातून विसर्ग शक्य;नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पालखेड धरण परिसरात संततधार पावसामुळे धामण व कोलवण नद्या दुथडी भरून वाहत आहेत. धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत असून, कादवा नदीत विसर्ग करण्याची शक्यता आहे.

गोदावरी नदीत कार अडकली; नाशिकमध्ये पावसाचा जोर कायम, रामसेतू पुलाचा रस्ता बंद
नाशिकमध्ये संततधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे. या अचानक वाढलेल्या पाण्यामुळे गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर पार्क करण्यात आलेली एक कार थेट पाण्यात अडकली आहे. सध्या ही कार बाहेर काढण्यासाठी प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत.

रामकुंड परिसरात नदीच्या दोन्ही किनाऱ्यांवरील टपऱ्या आणि हातगाडी व्यावसायिकांचे सामान हलवण्याचे काम सुरु झाले आहे. वाढत्या पुरामुळे रामसेतू पुलावर जाणारा रस्ता नागरिकांसाठी तात्पुरता बंद करण्यात आला आहे.

गोदा काठावरील रहिवाशांना विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, कोणीही नदीपात्राच्या जवळ जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हवामान खात्याने दिलेल्या यलो अलर्टनुसार पुढील काही तासांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असून, जिल्हा प्रशासनाकडून सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

महत्त्वाच्या सूचना:
नदीकाठावरील नागरिकांनी तत्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे
वाहनं नदीजवळ पार्क करू नयेत
प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे

नागरिकांना आवाहन –(Nashik rain update)
कोणीही नदीपात्रात जाऊ नये. पशुधन, शेतमाल, पंप मोटार्स सुरक्षित स्थळी हलवाव्यात.

दारणा धरण, इगतपुरी तालुका:
दारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे नदी-नाले भरून वाहत आहेत. लवकरच दारणा नदीत विसर्ग सुरू होण्याची शक्यता आहे.

नागरिकांना आवाहन –
दारणा नदीकाठी कोणताही व्यक्ती जाऊ नये.परिसरात आवश्यक खबरदारी घेण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

प्रशासनाची खबरदारी व आवाहन:
नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे
वाहतुकीस अडथळा येणार नाही याची काळजी घ्यावी
नदीपात्र व सखल भाग टाळावेत
शासकीय यंत्रणांनी तत्परता दाखवावी

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!