अलौकिक राही’ लिखीत,’अशोक नंदा’ दिग्दर्शित ‘वन डे जस्टीस डिलिव्हर्ड’ हा थ्रिलर चित्रपट असून ‘कमलेशसिंग कुशवाह, केतन पटेल आणि स्वाती सिंग’ या त्रिकुटाने याची निर्मिती केलीय. यातील मुख्य भूमिका ‘अनुपम खेर, कुमुद मिश्रा आणि अनुस्मृति सरकार’ यांनी केल्यात.या चित्रपटाचा ‘साऊंडट्रॅक विक्रांत-पारिजात, जॉय अंजन आणि सिंग यांनी संगीतबद्ध केलेत.
‘रांची’स्थित त्यागी (अनुपम खेर) हे सेवानिवृत्त न्यायाधीश असून आपल्या परिवारासह निवृत्ती पश्चात जीवन व्यतीत करत असतात. त्यांच्या मुलीच्या लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी, दोन हाय प्रोफाइल डॉक्टर, अजय(मुरली शर्मा) आणि डॉ.रीना(दीपशिखा) बेपत्ता होतात. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक शर्मा(कुमुद मिश्रा) करत असतात. परंतु या दोघांच्या गायप होण्याचा कोणताही धागा-दोरा त्यांना लागत नाही. एकुणात शोध मोहिमेदरम्यान पंकज सिंग (राजेश शर्मा) ही अजून एक श्रीमंत व्यक्ती (हॉटेल व्यावसायिक) कोलकताहून परत येत असताना बेपत्ता होतो. एकीकडे निरीक्षक शर्मा या प्रकरणाचा छडा लावण्यास असमर्थ ठरतात तर दुसरीकडे शहरातील राजकारणी धेंडं आणि प्रसार माध्यमांच्या दबाव वाढत जातो. त्यामुळे साहजिकपणे या प्रकरणांचा तपास गुन्हे शाखेकडे सुपूर्त केला जातो आणि अधिकारी राठी (ईशा गुप्ता) यांची खास नेमणूक केली जाते.
सोबतच खासदार रावत (झाकीर हुसेन) यांचा एक माणूस ‘दिलावर’ आणि एक मेकॅनिक ‘अफझल’ असे आणखी दोघेजण बेपत्ता होतात आणि या एकुणात प्रकरणाला अतिशय गंभीर स्वरूप प्राप्त होतं.
गुन्हे-शाखेच्या अधिकारी ‘राठी’ यांच्या तपासात एक बाब प्रामुख्याने समोर येते की ही सर्व गायप झालेली तमाम मंडळी कुठे ना कुठे आणि कशी ना कशी एकमेकांशी जुळलेली असतात. पुढील तपासत असे दिसून येते की ‘दिलावरच्या सूचनेनुसार भाजी मार्केटमध्ये ‘अफझलने’ जरी बॉम्ब ठेवला होता, तरीही त्याचा कर्ता-करविता ‘दिलावर’ होता. प्रत्यक्षदर्शी असलेले ‘अब्दुल’ जिवंत होते. पंकज सिंग यांनी हे पैसे चॅरिटी फ्रंटवर दिले होते. पक्षाच्या अल्पसंख्यांक नेत्याने एक मुद्दा उपस्थित केला. सत्य उघड करण्यापासून अब्दुलला परावृत्त करणे कठीण होते. मग त्यांच्यावर उपचार करणार्या डॉ. अजय आणि डॉ. रीना यांना लाच दिली गेली. म्हणजे त्यांचा मृत्यू नैसर्गिक दिसावा. ‘पंकज सिंग’च्या हॉटेलमध्ये हनीमूनसाठी वास्तव्यास असलेले दाम्पत्य, त्यांच्या मोबाईलवरील एमएमएस, तो मुस्लिम नेत्याचा मुलगा, कुटूंबाचा अपमान करण्यासाठी उघड केला जातो. त्यामुळे शेवटी त्याच्या जावयाचा मृत्यू होतो. या सर्व घटनाक्रमांचा अभ्यास केल्यानंतर, ‘खासदार रावत’ यांच्याकडे संशयाची सुई फिरते.
ही तमाम मंडळी न्यायाधीश त्यागींच्या मुलीच्या लग्नात जातीने निमंत्रित केली होती आणि हजरही होती, ही बाब राठीच्या तपासत प्रकर्षाने पुढे येते आणि त्यागींच्या हालचालींवर पाळत ठेवण्यात येते. कारण या सर्वांना त्यागींनीच जामीन दिलेला असतो. या सर्वांच्या सोबतीने गायब होआरी पुढील व्यक्ती कोण असेल याचा थोडाफार अंदाज राठीला आलेला असतो आणि त्यादृष्टीने कारवाई सुरु असतेच. त्या व्यक्तीच्या जीवाला अपेक्षितपणे होणारा धोका टाळण्याचे पूर्ण प्रयत्न केले जातात. शेवटी खासदार रावत बेपत्ता होतात आणि या सर्वांच्या गायब होण्यामागे निरीक्षक शर्मा असल्याचे निष्पन्न पुढे येते. ती शर्माचा पाठलाग करत करत जंगलातील एका जागेवर पोहोचते तिथे गायब झालेली व्यक्ती तर असतेच शिवाय त्याच्याकडून कबुली-जबाब घेतलेले त्यागीही असतात. राठीला आश्चर्य वाटते आणि ती त्यागींना जेव्हा या सर्व गुन्ह्यांचा तपशील विचारते तेव्हा त्यागी तिला सत्य उलगडून सांगतात:
ही सर्व मंडळी दोषी तर होतीच, परंतु कायद्यानुसार मला या सर्वांना जामीन द्यावाच लागला होता. आम्ही यापैकी एकालाही ठार मारलेले नाही. किंबहुना या सगळ्यांकडून त्यांच्या गुन्ह्याचा कबुली-जबाब व्हिडीओवर रेकोर्ड केला असून एका प्रकारे कायद्याची मदतच केली आहे. शेवटी त्यागी तेथून निघून जातांना एवढंच म्हणतात की मी आजवर केवळ कायद्याच्या अंतर्गतच निकाल दिले आहेत. या सर्वांनी कायद्याच्या परिघात राहून गुन्हे केले आणि स्वत:चा बचाव देखील. खासदार रावत हा माझा शेवटचा मोहरा होता. पिडीत स्त्रीने मला कानसुलात लगावली आणि माझी झोप उडाली आणि मी या सर्वांना कबुली जबाब देण्यास भाग पाडले. या सर्वांच्या कबुली जबाबाचे व्हिडीओ देतांना त्यागी म्हणतात की मी गुन्हेगार आहे. माझी एवढीच विनंती आहे की या गुन्ह्यातून निरीक्षक शर्माला अभय द्यावे कारण अशा अधिकाऱ्यांमुळेच गुन्हेगारांवर वचक रहातो. त्यागी आणि शर्मा तिथून निघून गेल्यावर राठी या सर्व सहाही बंदींना ठार मारते आणि माध्यमांना जबाब देते की तपासा अंतर्गत मला या सर्वांचे मृतदेह आणि त्यांचा कबुली-जबाब असेलेले व्हिडीओ सापडले, पुढील तपास सुरु आहे.
सारांशबहुतांशी सरकारी अधिकारी, न्यायाधीश आणि इतर संबंधितांवर समाज नेहमीच ताशेरे ओढतो की ही तमाम मंडळी भ्रष्टाचारी असून गुन्हेगारांना अभय देतात. परंतु समाजाला सत्य परिस्थितीची सुतराम कल्पना नसते. कायदा सर्वांसाठी समान आहे. पोलीस अधिकारी आणि न्यायाधीश ही देखील तुमच्या-आमच्या सारखी माणसेच असतात, त्यांनाही भाव-भावना ह्या असतातच. परंतु त्यांना राजकीय, सरकारी आणि सामाजिक दबावापुढे नमतं व्हावं लागतं. त्यामुळे गुन्ह्याची सत्यता जाणून देखील त्यांच्याकडून पिडीतांना अन्याय्य वागणूक दिली जाते. परंतु त्यात त्यांचा नाईलाज असतो. या चित्रपटाच्या माध्यमाने निर्मात्यांनी अशाच एका विषयावर उजेड पाडलाय. त्यासाठी एक सेवानिवृत्त न्यायाधिश आणि सेवेत असलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या माध्यमातून दिग्दर्शकाने या कथानकाला सादर केलंय. ज्यामध्ये त्यागी शपथ घेतात आणि गुन्हे करून मोकाट फिरणाऱ्या बड्या धेंडांना पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने एका निर्जन ठिकाणी नेऊन ठेवतात आणि त्यांनी केलेल्या गुन्ह्यांचा कबुली-जबाब मिळवतात.
तसं बघायला गेलं तर न्यायाधीश त्यागींनी देखील एका प्रकारे गुन्हाच केलेला असतो आणि त्यासाठीची शिक्षा भोगायलाही ते तयार असतात. परंतु गुन्हे-शाखेची वरिष्ठ अधिकारी राठी एकुणात शहरात घडलेल्या गुन्ह्यांची मालिका आणि त्यागींचा ‘मोटिव्ह’ लक्षात घेऊन त्यांना अभय देते. असंही घडत असेल कुठेतरी, असं निश्चितपणे वाटून जातं. किंबहुना असंच घडायला पाहिजे, असंच जास्त वाटतं. ‘अ वेन्सडे’ या चित्रपटातील ‘कॉमन मॅन’ला जसं समाजाचं समर्थन लाभलं, तसंच समर्थन त्यागींना लाभावं……
एनसी देशपांडे
९४०३४ ९९६५४
