कांद्याला प्रती क्विंटल ३०० रुपये अनुदान: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किमान ५०० रुपये अनुदान द्या ; छगन भुजबळ यांची सभागृहात आग्रही मागणी
मुंबई ,१३ मार्च २०२३ – गेल्या काही दिवसांपासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मोठी परवड सुरू आहे. कांद्याला भाव मिळत नाही म्हणून कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. अशातच कांद्याला अनुदान द्या आणि हमीभाव द्या अशी मागणी केली जात होती.शेतकऱ्यांनी त्यासाठी विविध स्वरूपाचे आंदोलन केले आहे. कांद्याचे लिलावही बंद पाडले होते.त्यामुळे विधीमंडळात गोंधळ झाला यावर बोलताना कांदा उत्पादकांना ३०० रुपये प्रतिक्विंटल सानुग्रह अनुदान मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.परंतु कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किमान ५०० रुपये अनुदान द्या अशी मागणी विरोधकानी केली. तसेच अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळत नसल्याने त्यांनी सभागृहातून वॉक आऊट करत सरकारचा निषेध नोंदवला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, खरीप हंगामातील लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर आहे. देशातील इतर राज्यातील कांद्याचे उत्पादन वाढल्याने पुरवठ्याच्या प्रमाणात मागणी कमी आहे. त्यामुळे कांद्याच्या दरामध्ये घसरण झाली आहे. कांदा नाशवंत पीक असल्याने त्याला किमान आधारभूत किंमत लागू करता येत नाही. कांदा हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नगदी पीक असून त्याला मिळणारा भाव कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील जिव्हाळ्याचा भाग आहे.
महाराष्ट्रातील कांदा महत्त्वाचे नगदी पीक असून त्याला मिळणारा भाव कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आणि जिव्हाळ्याचा भाग आहे आणि म्हणून देशातील कांदा उत्पादन त्याची देशांतर्गत मागणी आणि देशातून होणारी निर्यात इत्यादी सर्व बाबींचा परिणाम जो आहे बाजारपेठेतील कांद्याच्या दरावर होतो आणि झालेला आहे.
म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी आपण एक समिती नेमली होती आणि त्या समितीमध्ये सर्वंकष विचार झाल्यानंतर त्यांनी दोनशे रुपये आणि तीनशे रुपये प्रतिक्विंटल शिफारस केली होती, परंतु सरकार देखील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार सरकार असून सानुग्रह अनुदान म्हणून तीनशे रुपये प्रतिक्विंटल देण्याचा निर्णय घेत आहोत.
पूर्वी सानुग्रह अनुदान हे २०१६-१७ मध्ये आपण शंभर रुपये दिले होते. २०१७-१८ मध्ये दोनशे रुपये दिले होते. आपण आता तीनशे रुपये करतोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल आणि आता कांदा खरेदी देखील सुरू झालेळी आहे आणि त्यात देखील साडेसहा रुपयापर्यंत दर मिळतोय असं एकनाथ शिंदे यांनी म्हंटलं आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याच्या भावात मोठी घसरण होत असून कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.या विरोधात राज्यातील शेतकऱ्यांकडून अनेक ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. तर नाशिकमधून किसान मोर्चा मुंबईकडे रवाना झाला आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किमान ५०० रुपये अनुदान द्या ; छगन भुजबळ यांची सभागृहात आग्रही मागणी
राज्यात अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले असतांना शासनाकडून अद्याप मदतीची घोषणा करण्यात आलेली नाही. सभागृहात वारंवार मागणी करून देखील सरकारकडून तोडाला पाने पुसली जात आहे. तसेच राज्यात शेतकरी आत्महत्या होत असतांना राज्याच्या कृषी मंत्र्याकडून संवेदनाहीन वक्तव्य केली जात आहे. याचा निषेध व्यक्त करत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किमान ५०० रुपये अनुदान द्या अशी मागणी केली. तसेच अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळत नसल्याने त्यांनी सभागृहातून वॉक आउट करत सकारचा निषेध नोंदविला.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सभागृहात नियम ५७ अन्वये प्रस्ताव मांडला. तो चर्चिला गेला नसल्याने त्यांनी सभागृहाचे या गंभीर प्रश्नाकडे त्यांनी शासनाचे लक्ष वेधले. यावेळी ते म्हणाले की, राज्यात अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र शासनाकडून अद्याप कुठलीही मदत शेतकऱ्यांना घोषित करण्यात आलेली नाही. सरकारकडून तोंडाला पाने पुसली जात आहे. शेतकरी अडचणीत असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यावर राज्याचे कृषी मंत्र्यांनी संवेदनाहीन अशी टिपणी केली. ही बाब अतिशय दुर्दैवी असून या वक्तव्याचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
ते म्हणाले की, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा पिकासाठी १२०० रुपये खर्च येत आहे. मात्र कांद्याला आज ५०० रुपये तर जास्तीत जास्त ७०० रुपये भाव मिळत ही सद्याची परिस्थिती आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने केवळ ३०० रुपये मदत जाहीर केली आहे. ही मदत तुटपुंजी असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किमान ५०० रुपये अनुदान देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली. तसेच या गंभीर बाबीकडे लक्ष वेधत सभागृहातून वॉक आउट करत सकारचा निषेध नोंदविला.