मुंबई,८ सप्टेंबर २०२२ – विजेच्या कडकडासह ठाणे, मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस सुरु असून आहे. संध्याकाळी अचानक आलेल्या पावसाने कार्यालयातून घरी जाणाऱ्या नोकरदार वर्गाची चांगली तारांबळ उडाली आहे. ठाणे शहराला तर पावसाने चांगलेच झोडपले आहे. संध्याकाळी साडे पाच ते साडे सहा या एक तासात ७१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जोरदार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने स सीएसएमटी ते ठाणे आणि दिवा, डोंबिवली, कल्याण या सेक्शन मध्ये लोकल ट्रेन्स उशिराने धावत आहेत.
टिटवाळा आणि आंबिवली दरम्यान मालगाडीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने कल्याण ते कसारा वाहतूक अर्धा तास बंद होती.त्यामुळे रेल्वे वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. मुंब्रा कळवा भागात झालेल्या प्रचंड पावसामुळे पारसिक डोंगरावरून पाण्याचे मोठे प्रवाह थेट रेल्वे ट्रॅक वर आले. मध्य रेल्वेच्या ट्रॅक बाजूलाच पारसिकचा डोंगर असल्याने हे पाणी थेट ट्रॅकवर येत होते. पावसाचा जोर जसा कमी झाला तसे पाणी देखील कमी झाले. मात्र यामुळे मध्य रेल्वेच्या तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅक वरील वाहतूक १५ ते २० मिनिटे बंद ठेवण्यात आली होती. पाणी ओसरल्याने ही वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आली आहे.