
नाशिक, दि. २ डिसेंबर २०२५ –Save Tapovan Movement तपोवनातील हजारो वर्षांची आध्यात्मिक परंपरा, हिरवाईची समृद्धी आणि निसर्गदत्त शांतता जपण्यासाठी नाशिकच्या कलावंतांनी अनोख्या पद्धतीने आवाज उठवला आहे. अंदाजे 1,800 पेक्षा अधिक वृक्षतोडीचे नियोजन झाल्याने नाशिककरांमध्ये राग व चिंता वाढली असताना, शहरातील कलाकारांनी आपापल्या कलेच्या माध्यमातून तपोवन वाचवण्याचा संदेश दिला. राजकीय घोषणांऐवजी, मोर्चाऐवजी, आंदोलनाऐवजी—“कलेच्या माध्यमातून पर्यावरण रक्षण” हा अभिनव उपक्रम जनस्थान ग्रुपने राबवला.
कला, शब्द आणि संगीताने सजला ‘तपोवन संवेदना’(Save Tapovan Movement)
तपोवनाच्या पवित्र भूमीत चित्र, कविता, संगीत, नृत्य आणि नाट्यकलेतून कलाकारांनी निसर्गाविषयीची आर्त भावना मांडली.तपोवन हा नाशिकच्या धार्मिक वारशाचा अविभाज्य भाग. प्रभू श्रीरामांचे वास्तव्य, ऋषी-मुनींची तपश्चर्या, तसेच नाशिककरांसाठी हा संपूर्ण परिसर शहराचा ‘ऑक्सिजन झोन’. इथे सुरू असलेल्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणीय संतुलन, गोदावरी नदीचा प्रवाह आणि संपूर्ण पर्यावरणधोरणे धोक्यात येऊ शकतात, असा इशारा कलाकारांनी दिला.
कलावंतांचा स्पष्ट मराठी आवाज – “तपोवन वाचलं पाहिजे!
”सिने अभिनेत्री अनिता दाते म्हणाल्या,“नाशिकमध्ये ४ कुंभमेळ्यांचा अनुभव घेतला आहे. तेव्हा तपोवन हिरवाईने नटलेलं असे. आता मात्र हिरवाई झपाट्याने नष्ट होतेय.
तपोवन नाशिकचे फुफ्फुस आहे—हे कापलं तर भविष्यात मोकळा श्वासही मिळणार नाही. कलावंत म्हणून आम्ही या वृक्षतोडीला ठाम विरोध करतो.”अभिनेते चिन्मय उदगीरकर म्हणाले,
“अविरल गोदा हा नाशिकचा संकल्प आहे. पण तपोवनातील वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर झाली तर गोदावरी नदीवर आणि हवामानावर गंभीर परिणाम होतील. त्यामुळे तपोवन वाचवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.”

कलेची बहुरंगी मैफल
लेखक दत्ता पाटील — निसर्गवरील हृदयस्पर्शी कविता
मोहन उपासनी — बासरीचे नितळ सूर, शांततेतून चेतना
चित्रकार धनंजय गोवर्धने — तपोवनाची वेदना कॅनव्हासवर
नमामी गोदा फाउंडेशनचे राजेश पंडित, श्वानप्रेमी भारती जाधव, पर्यावरण कार्यकर्ते रोहन देशपांडे, रोशन केदार यांनीही तपोवनातील विद्यमान परिस्थितीची माहिती देत जनजागृती केली. तपोवन वाचवण्यासाठी कलात्मक क्रांती!नाशिककरांसमोर कलाकारांनी ठेवलेला संदेश स्पष्ट—“ही लढाई राजकीय नाही, ही लढाई पर्यावरणाची, संस्कृतीची, भावी पिढ्यांच्या श्वासाची आहे.” नागरिकांचा सहभाग – पर्यावरणाचे भान जागवणारा क्षण
या प्रसंगी जनस्थान ग्रुपचे प्रमुख अभय ओझरकर, दिग्दर्शक सुहास भोसले, लेखक दत्ता पाटील, दिग्दर्शक सचिन शिंदे, दिग्दर्शक योगेश गायकवाड, चित्रकार धनंजय गोवर्धने, चित्रकार अतुल भालेराव, दिग्दर्शक श्याम लोंढे, बासरी वादक मोहन उपासनी, जाहिरातकार नंदन दीक्षित, संगीतकार संजय पुणतांबेकर, कास्टिंग डायरेक्टर पल्लवी कदम, अनघा धोडपकर ,नाट्य कलावंत दिगंबर काकड, मुकेश काळे, आनंद गांगुर्डे, लक्ष्मण कोकणे, गणेश शिंदे, समाधान मुर्तडक, सनी धात्रक, संदीप पाचंगे यांच्यासह नाट्य व चित्रपट कलावंत या तपोवन वृक्षतोडे विरोधात उपस्थित होते. कलावंतांबरोबरच तपोवन वृक्षतोड विरोधातील माहिती देण्यासाठी नमामी गोदा फाउंडेशनचे राजेश पंडित पंडित, श्वानप्रेमी भारती जाधव, पर्यावरण प्रेमी रोहन देशपांडे, पर्यावरण प्रेमी रोशन केदार यांच्यासह निसर्गप्रेमी उपस्थित होते.



