ज्येष्ठ पत्रकार, नाटककार, लेखक जयंत पवार यांचे निधन

0

मुंबई – ज्येष्ठ पत्रकार, नाटककार, लेखक जयंत पवार यांचे निधन झालं. ते ६१ वर्षांचे होते. शनिवारी मध्यरात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

जयंत पवार हे पत्रकार, मराठी नाटककार आणि नाट्यसमीक्षक होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने घेतलेल्या नाट्यलेखन स्पर्धेत ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या नाटकासाठी जयंत पवार यांना सर्वोत्कृष्ट लेखनाचे प्रथम पारितोषिक मिळाले. २०१४ साली महाड येथे झालेल्या १५ व्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद जयंत पवार यांनी भूषवले होते. ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ या कथासंग्रहासाठी २०१२ साली साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते.

जयंत पवार यांनी लिहिलेली नाटके

अधांतर

काय डेंजर वारा सुटलाय

टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन (दीर्घांक)

दरवेशी (एकांकिका)

पाऊलखुणा (वंश या नाटकाचे व्यावसायिक रूप)

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर (कथासंग्रह)

बहुजन संस्कृतिवाद आणि लेखक (भा़ाषाविषयक)

माझे घरवरनभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा (कथासंग्रह)

वंश

शेवटच्या बीभत्साचे गाणे (दीर्घांक)

होड्या (एकांकिका)

 

प्रतिक्रिया 

‘संवेदनशील लेखक, नाटककार गमावला’मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांना श्रध्दांजली

ज्येष्ठ पत्रकार, नाटककार, लेखक जयंत पवार यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

मराठी नाट्य क्षेत्रातील साक्षेपी आणि पत्रकारिता, साहित्य अशा क्षेत्रात निखळ तितकाच संवेदनशील विहार करणारे व्यक्तीमत्व गमावले आहे. मुंबईतील नजरेआड गेलेल्या गिरण्या, कष्टकरी त्यांची गिरणगाव संस्कृती पवार यांच्यामुळे शब्दरूपाने जीवंत आहे. परखड आणि निखळ नाटककार म्हणून त्यांनी आपला असा ठसा उमटवला. या क्षेत्राला त्यांची निश्चितच उणीव भासत राहील, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

__________________

 

ज्येष्ठ पत्रकार, नाटककार जयंत पवार यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

 साहित्य अकादमी’ पुरस्कारविजेते साहित्यिक, ज्येष्ठ नाटककार, पत्रकार जयंत पवार यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले असून प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड करणारा, दुर्बल-वंचितांचं जगणं नाटकातून, साहित्यातून जिवंत करणारा सिद्धहस्त लेखक, पुरोगामी, विद्रोही व्यक्तिमत्वं काळाच्या पडद्याआड गेलं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, सामाजिक विषयांची आशयघन मांडणी करुन ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांनी नाट्यक्षेत्र समृद्ध केलं. पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक विषय समर्थपणे हाताळले. समाजातील वंचित, दुर्बल घटकांना न्याय देण्यासाठी लेखणीतून  प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारलं. जयंत पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या नाट्य, साहित्य, पत्रकारिता क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

_______________

संवेदनशील, साक्षेपी लेखक आणि नाटककार गमावला – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक, नाटककार जयंत पवार यांच्या निधनामुळे आपण संवेदनशील आणि  साक्षेपी लेखक आणि नाटककार गमावला असल्याची भावना संस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

श्री. देशमुख आपल्या शोकसंदेशात म्हणाले, साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेले श्री. पवार यांनी मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविलेले होते. श्री. जयंत पवार यांनी नेहमीच रंगभूमीवर काहीतरी वेगळे आणण्याचा प्रयत्न केला. अधांतर, काय डेंजर वारा सुटलाय, टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन (दीर्घांक), दरवेशी (एकांकिका), पाऊलखुणा (वंश या नाटकाचे व्यावसायिक रूप), फिनिक्सच्या राखेतून उठला मोर (कथासंग्रह), बहुजन संस्कृतिवाद आणि लेखक (भाषाविषयक), माझे घर, वरनभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा (कथासंग्रह), वंश, शेवटच्या बीभत्साचे गाणे (दीर्घांक) होड्या (एकांकिका) या त्यांच्या कलाकृती सर्वांच्या स्मरणात राहतील.

श्री. पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना श्री. देशमुख यांनी आपण त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे म्हटले आहे.

_______________

जयंत पवार , एक बहुआयामी व्यक्तिमत्व .प्रखर पत्रकार , संवेदशील साहित्यिक , नाटककार आणि प्रभावी वक्ते अश्या सर्वच क्षेत्रात आपल्या वेगळ्यापणाचा ठसा उमटविणारे जयंत पवार आज आपल्यात नाही यावर विश्वास बसत नाही . ते त्यांच्या लिखाणातून कायम आपल्यासोबत राहतील .२०१८ साली त्यांना नाट्य परिषद नाशिक शाखेचा वि वा शिरवाडकर लेखन पुरस्कार प्रदान करण्यात आला तेंव्हा त्याच्याशी अगदी जवळून संवाद साधण्याचा योग आला होता .

नाट्य परिषद नाशिक शाखेच्यावतीने त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली .

प्रा रवीन्द्र कदम , अध्यक्ष 

अ भा म ना प नाशिक शाखा .

_____________

 मराठी नाटक आणि साहित्यपरंपरेला खडबडून जागे करणारा, प्रचलित वाटा उसवून काढत नवा विलक्षण समाजसंवादी, परखड वास्तववादी प्रवाह निर्माण करणारा उत्तुंग लेखक नि तितकाच उत्तुंग माणूस महाराष्ट्रानं आज गमावला आहे… घरातलं माणूस जावं तसं आज झालंय… माझ्यासारख्या लिहिणाऱ्या कितीतरी वर्तमानकालिन लेखकांना जयंत पवार यांनी पाठीवर हात ठेवून उभारी दिलीये. गेली दहाबारा वर्ष सतत एखाद्या थोरल्या भावाचं असावं तसं काळजीयुक्त लक्ष त्यांनी माझ्यावर ठेवलं… कमालीच्या वेदनांमधून जातानाही त्या स्वत:शी ठेवत ते अगदी परवा परवापर्यंत निर्मितीवर, निर्मितीच्या शक्यतांवर बोलत राहिले, आमची पुढील वाटचाल सुकर करत राहिले… 

जयंत सर, आम्ही तुमच्या ऋणात राहू सतत…

 – दत्ता पाटील , नाटककार

______________

 नाटककार व लेखक  म्हणून जयंतजींनी अवीट अशी छाप देशभर पाडली आहे, नाट्यपरिषद नाशिक शाखेने त्यांना कै.श्री.वि.वा. शिरवाडकर लेखन पुरस्कार प्रदान करून गौरविले होते. त्यांच्या जाण्याने रंगभूमीचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे.

 सुनील ढगे

कार्यवाह,अ भा म ना प नाशिक शाखा .

_____________

 जयंत पवारसर रंगभूमीचा आरसा होते, आता हा माणूस आपल्यात नाही याचं खूप मोठं नुकसान रंगभूमीला सोसावे लागणार. सच्चा माणूस, हवंहवंसं व्यक्तिमत्व, त्यांनी लिहिलेल्या एका लेखाचं नाटक मी आणि प्राजक्त करणार होतो, सरांना आवर्जून तो प्रयोग दाखवायचा होता, सर नाटक करताना तुम्ही सतत त्या प्रेक्षागृहात दिसत रहाल…तुमच्या समीक्षेची अजूनही वाट बघणार..आणि तुम्ही सांगितलेल्या सुचविलेल्या रंगसुचना पुढेही आम्ही तंतोतंत पाळणार, जो पर्यंत मराठी रंगभूमी आहे तो पर्यंत तुमच्यातच आम्हाला तीच प्रतिबिंब पहायला मिळणार तुम्ही सतत असाल, तुमची आदरयुक्त भीती आमची पाठ सोडणार नाही कधीच.

 – सचिन शिंदे,नाट्य दिग्दर्शक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.