दशक १२ समास नववा यत्नशिकवण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. दुर्बळ, निराश्रीत, ओढग्रस्त, आळशी, खादाड, ऋणग्रस्त, मूर्खपणामुळे सगळे अयोग्य कृत्य करतात बाकी काही नाही. खायला नाही, जेवायला नाही, घालायला कपडे नाहीत, आंथरायला पांघरायला नाही, खोपटी नाही म्हणजे राहायला जागा नाही, असे अभागी लोक असतात. सोयरे नाही, धायरे नाही, इष्ट नाही, मित्र नाही पाहिलं तर कुठे ओळख नाही. आश्रय नसलेले परदेशी लोक त्यांनी काय कराव? कोणाला जीवाशी धराव? वाचावं की मरावं? काय करावं? असं कोणीतरी विचारलं त्याचे कोणीतरी उत्तर दिलं.
श्रोत्यांनी ते सावधपणे ऐकावं. लहान-मोठं कोणतही काम असो, ते केल्याशिवाय होत नाही. करंटा माणूस सावध राहिला तर भाग्यवान होशील! अंतरामध्ये सावधानता नसेल तर पुरेसे प्रयत्न होत नाहीत, त्यामुळे सुखसंतोषाची वार्ता तिथे कशी मिळेल? म्हणून आळस सोडावा. प्रयत्नपूर्वक विचार करावा आणि एका ठिकाणी लक्ष केंद्रित करावं. एका ठिकाणी ठाण मांडावे. प्रातःकाळी उठावे. प्रातः स्मरण करावं. नित्यनेमाने पाठांतर करावं. मागील उजळणी करावी. पुढचे पाठ करावे. नियम धरावा.
बाष्कळपणाची वटवट करू नये. शौचमुखमार्जन करावे. नंतर स्नान करावे. बाहेर जाऊन काहीतरी आणावं. रिकाम्या हाताने येऊ नये. स्वच्छ धुवून, पिळून वाळवून वस्त्रे घालावी. नंतर चरणाची पूजा करावी. देवाचे दर्शन घ्यावं, देवाची यथासांग पूजा करावी. काही फलाहार घ्यावा. पुढे व्यवसाय करावा. आपले परके लोक म्हणजे आपल्याला मदत करणारे न करणारे लोक ओळखावे. सुंदर अक्षर लिहावं. स्पष्ट आणि व्यवस्थित वाचावं. त्याचा अर्थ काय आहे तो जाणून घ्यावा. नेमके आणि थोडक्यात विचारावे. तेच विशद करून सांगावे. अनुभव नसताना बोलणं हे पाप आहे. सावधानता असावी. नीती मर्यादा राखावी. लोक मानतील असे करावे. असे केल्यास क्रिया सिद्धी प्राप्त होते. ते केल्यावर समाधान मिळतं. हरी कथेचे निरूपण करावं. प्रसंग पाहून वर्तन करीत जावं. ताल, लय, मुद्रा शुद्ध अर्थ प्रमेय, त्याचा अर्थ अन्वय शुद्ध असावा. गद्य पद्य दृष्टांत, द्यावे. शुद्ध अन्वयाचे गाणे वाजवणे, नाचणे, हावभाव करणे, समारंजक वचन सांगणे करावे. कधी छान कथा सांगावी.
लोकांचं समाधान करणारे व जास्तीत जास्त लोकांचं लोकांना आवडेल तसं बोलावं. कथेमध्ये वेगळे विषय येऊ देऊ नये. लोकांना कंटाळा येईल असे सांगू नये. लोकांचे हृदय जाणून घ्यावं आणि मग नामघोष करावा. भक्ती ज्ञान वैराग्य योग, नाना साधनांचे प्रयोग करावे. असे मनन केल्याने भव रोग नाहीसा होतो. जसं बोलतो तसं चालावं. मग महंताचे गुण अंगी बाणवता येतात. युक्ती नसलेला योग म्हणजे लोकांची निराशा. त्यामुळे सोबतचे लोक नाराज होतील. असं करायचं नाही. लोकांना त्रास होईल त्याला व्यथा होईल असं काही करायचं नाही. हृदयामध्ये समर्थ रघुनाथाची आठवण ठेवायची. उदास वृत्तीला लोक मानतात. त्यांच्यासाठी विशेष कथा निरूपण करायचं.
राम कथा ब्रम्हांड भेदून पैलपार न्यावी. जोडीला संगीत गाणं असलं तर तिथे वैभवाला काय उणे? आकाशात तारांगण असतात तसे लोक उगवतील. जिथे अक्कलवान नाही तिथे सगळे विस्कळीत असतं. बुद्धीशिवाय श्रेष्ठ दुसरे काहीही नाही. अकलेच्या सामर्थ्याने ब्रम्हांडापेक्षा श्रेष्ठ व्हावं. मग तिथे द्वाड करंटेपण येणार नाही. इथे शंका दूर झाली. बुद्धी प्रयत्नामध्ये प्रवेशली. अंतःकरणामध्ये काही एक आशा निर्माण झाली. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे यत्न शिकवण नाम समास नवम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे

मोबाइल- ९४२०६९५१२७