भावार्थ दासबोध -भाग १९२

निरुपण : पद्माकर देशपांडे

0

दशक १४ समास सात युगधर्म निरूपण नाम समास 
जय जय रघुवीर समर्थ. इतरांच्या अनुभवाचा विचार करणारा असा जो योगेश्वर असतो तो प्राणिमात्रांचे अंतर्मन ओळखतो. अशा प्रकारची वृत्ती असते तिला उदासीन म्हणतात. त्याच्याही पुढचं म्हणजे आत्मज्ञान आहे. त्या आत्मज्ञानी माणसाच्या केवळ दर्शनाने लोक समाधानी होतात. अनेक उपाय करतो पण तो लोकांच्या वाट्याला येत नाही त्याचे हृदय भगवंताशी एकरूप झालेलं असत. उपासना मूर्तीचे ध्यान किंवा आत्मानुसंधान त्याचे नित्य चालू असते आणि ते नसेल तर श्रवण आणि मनन निरंतर सुरू असते. पूर्वजांचा पुण्यसंग्रह गाठीला असेक तरच अशा लोकांची लोकांशी भेट होते.

प्रचितीशिवाय जे ज्ञान आहे ते केवळ अनुमान आहे. त्यामुळे लोकांना परलोकांचे साधन मिळणार नाही. त्यामुळे मुख्य प्रत्यय आहे. प्रचितीशिवाय उपयोग नाही. ते लक्षात घेतलं नाही तर उपाय म्हणून अपाय होईल हे शहाणे लोक जाणतात. वेडे लोक संसार सोडून गेले. ते कष्ट करून करूनच मरण पावले. त्यांना इहलोकही मिळाला नाही आणि परलोकही. रागारागाने निघून गेला आणि भांडून भांडून मेला. अनेक लोकांना कष्ट दिले, दुःखी केलं आणि आपणही दुःखी झाला निघून गेला, पण त्याचे ते अज्ञान होतं. त्याच्या संगतीने लोक लागले आणि गुरु आणि शिष्य दोन्हीपण अज्ञानी झाले. आशाबुध्दी असलेला अनाचारी  देश सोडून गेला आणि तिकडे गेला तरी तो लोकांमध्ये जाऊन अनाचारच करतो. घरामध्ये अन्नावाचून कष्ट करतात आणि कष्ट होऊन निघून जातात त्याची चोरी उघडकीस येताच मारतात.

तेव्हा संसार मिथ्या असं समजलं ज्ञान मिळवण्यासाठी निघून गेला, त्याने आपल्यासारखं लोकांना पावन केलं. एक प्रकारच्या संगतीने माणूस तरतो आणि एक प्रकारच्या संगतीने बुडतो म्हणून चांगली संगत असेल असं पाहावं. जिथे विवेक परीक्षण नसेल तिथे दीक्षा कशी असेल? मग घरोघरी मागितली तरी भिक्षा कुठेही मिळणार नाही. जो दुसऱ्याचं मन जाणतो, देश काळ प्रसंग जाणतो त्या पुरुषाला भूमंडळावर काहीही कमी पडत नाही. नीच प्राणी गुरुत्व पदवीला पोहोचला त्यामुळे आचरणाला महत्त्व राहिले नाही, मग वेद शास्त्र,ब्राह्मणाला कोण विचारतो? ब्रह्मज्ञानाच्या विचाराचा अधिकार ब्राह्मणाला आहे वर्णानां ब्राह्मणो गुरु: हो असं वचन आहे. ब्राह्मण बुद्धीपासून दूर गेले, आचारभ्रष्ट झाले. त्यांनी गुरुत्व सोडून दिलं.कित्येक दावलमलकाला जातात, कित्येक ब्राम्हण पिराला भजतात, किती एक स्वतःच्या इच्छेने तुर्क होतात, धर्म बदलतात. असा कलियुगाचा आचार आहे.

कुठेही विचार राहिलेला नाही. पुढे वर्णसंकर होणार आहे.  नीच व्यक्तीला गुरुत्व आले, महंत मोठ्या प्रमाणावर वाढले त्यामुळे लोकांनी ब्राह्मणांचा आचार बुडवला. हे ब्राह्मणाला कळत नाही त्याची वृत्ती वळत नाही त्याचा मूर्खपणाचा खोटा अभिमान कमी होत नाही. म्लेन्छांनी राज्य नेले, गुरुत्व चुकीच्या माणसाकडे गेले आपण इकडचे राहिलो नाही तिकडचे राहिलो नाही. काहीच नाही. ब्राह्मणांना अनाचाराने, आंधळ्या धार्मिकतेने बुडवले. ज्या विष्णूने राजेपद मिरविले त्याच विष्णूला परशुरामाने शाप दिला. आम्ही तेच ब्राह्मण आहोत. दुःखाने हे वचन बोलत आहोत. वडिलांनी आम्हाला बहिष्कृत केलं आताच्या ब्राह्मणांनी काय केलं? अन्न मिळणं अशक्य झालं. असं तुमच्या सगळ्यांच्या अनुभवाला आले आहे की नाही? बर वडिलांना काय म्हणायचं? ब्राह्मणांचं भविष्य जाणले पाहिजे प्रसंगानुसार बोललो आहे, त्याबद्दल क्षमा करावी. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे युग धर्म निरूपण नाम समास सप्तम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. (क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!