दशक १५ समास ४ शाश्वत ब्रम्ह निरूपण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. परब्रम्ह हे प्रचितीने जाणावे. विचाराद्वारे ओळखावे. विचार नसताना त्रास करून घेणे म्हणजे मूर्खपणा आहे. ज्ञानी माणूस भिडेने दडपला गेला तर त्याला निश्चल ब्रह्म मिळणार नाही. तो उगाचच मायेमध्ये गलबला करीत राहील. माया निशे:ष नष्ट झाली तर पुढे स्थिती कशी उरेल त्याचं विवरण स्वतः चातुर्यपूर्वक केलं पाहिजे. निशेष असं मायेचा निरसन झालं की मग आत्मसमर्पण, आत्मनिवेदन होतं. यातील वाच्यांश नाही तर विज्ञान जाणावे. लोकांच्या बोलण्यावरती ज्याने विश्वास ठेवला लागला तो अंदाज करूनच बुडाला म्हणून अनुभव घेतलाच पाहिजे. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे शाश्वत ब्रह्म निरूपण नाम समास चतुर्थ समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.
दशक १५ समास ५ चंचल लक्षण निरूपण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. वायु व जाणीव प्रकृतीपुरुष या दोघांच्या प्रेरणेने सत्वरजतम हे त्रिगुण-त्रिदेव या अगुण गुणातीत अशा ब्रह्मात वागत असतात. ज्याप्रमाणे उंदीर-मांजर व फणी -सर्प एकमेकांना टपून असतात त्याप्रमाणे ही चंचल सूक्ष्म अष्टधा प्रकृती अध जड पंचभौतिकाला व ऊर्ध्व निश्चल स्वरूपाला सोडून मध्यभागी खेळ करीत असते. तात्पर्य चंचल अंतरात्मा पूर्णपणे जडत्व व निश्चलत्वही पावत नसून या दोघांच्या मध्यभागीच वावरत असतो. वायु अग्नी आप व पृथ्वी म्हणजे पणजा, आजा बाप व मूल या चार महाभूतांची लीला सांगितली आहे. देव देवालयामध्ये लपलेला आहे, देवळाची पूजा केली असता ती त्याला मिळते.
सृष्टीमध्ये देखील असेच आहे. इथे देवालय म्हणजे देह आणि देव म्हणजे अंतरात्मा. प्रकृती आणि पुरुष ही दोन्ही नावे एकालाच दिलेली आहेत. ही लोकांनी कल्पिलेली आहेत. विवेकपूर्वक अनुभव घेतला तर ते एकच नाव असल्याचं लक्षात येतं. तिथे नावानुसार लिंगभेद नाही. तो पुरुष नाही किंवा स्त्री नाही. ही एक कल्पना आहे. याचा शोध घेतला असता काहीही सापडत नाही. स्त्री नदी पुरुष खळाळ किंवा ओढा असे लोक बोलतात परंतु विचार केला असता पाण्याला स्त्री किंवा पुरुषाचा देह नाही. आपल्याला आपण पाहायला गेलो तर समजत नाही. पाहायला गेलो तर आकलन होत नाही. कशाला काहीही मिळत नाही. आपण एकटेच उदंड आहोत, एकटाच भरपूर आहोत, आपल्याला आपलाच जो गलबला असतो तो सोसवत नाही. एक असतो पण फुट पडते, फूट असूनही एकटा असतो, त्याप्रमाणे प्रत्येकामध्ये भिन्नत्व दिसत असले तरी अंतरस्थिती अंतरात्मा एकच आहे. अशी विचित्र कळा प्राणीमात्रांमध्ये पसरली आहे. वृक्षवल्लीमध्ये जल संचारलेले असते पण हात लावला की कोरडे लागते. ओल नसल्यास झाडे जगतील का? झाडांमध्ये आळी असते, झाडे वर धावताना दिसतात, झाडावरील पक्षी अंतराळात उडून जातात. भूमीपासून वेगळी झाली तरी ती झाडे वाळत नाहीत. उलट वाढतानाच दिसतात.
त्याप्रमाणे अंतरात्मा आहे म्हणून देह जगतो. त्याप्रमाणे देवासाठी झाडे जगतात देव नसला तर झाडांची लाकडं होतील. हे काही मोठे कोडे नाही. झाडांपासून झाड तयार होतात तीही आकाशात जातात. देहरूपी झाडांच्या मुळ्या जमिनीत मुळीच जात नाहीत. झाडाला झाडाने खतपाणी घालून दिवसेंदिवस वाढवावी लागतात. बोलकी झाडे शब्द मंथनामधून विचार घेतात. होणार तितके आधीच झालं, मग जे झालेलं आहे त्याचं विवेचन आपल्या कल्पनेप्रमाणे शास्त्रकारांनी केलं आहे. ज्ञानी माणसाला हे सगळं समजलेलं आहे. समजलं तरी उमजत नाही. उमजलं तरी समजत नाही. अनुभव असल्याशिवाय काहीही समजत नाही.
सगळ्यांचा वडील म्हणजे अंतरात्मा हीच ओळख केली पाहिजे. आपल्याला आपण भेटणे म्हणजेच अंतरात्म्याला भेटणे. अंतर्निष्ठाचे स्थान उच्च कोटीचे आहे. बाहेर जे केवळ वेशधारी आहेत त्यांची संगत खोटी आहे. मूर्खाला या गोष्टी समजणार नाहीत. शहाण्यांना मात्र माहिती होतात. लोकांची मने राखली तर ते राजी होतात, मन राखले नाही तर भाजीसारखा किरकोळ पदार्थ देखील मिळणार नाही, असं प्रत्यक्ष दिसतं. म्हणून अलक्षाकडे लक्ष लावावं. दक्षला दक्ष भेटला म्हणजे समाधान होतं.
गुरुशिष्यांचा ऐक्यभाव झाल्याने झाल्याने परब्रह्म म्हणजे निरंजन सापडते. मायेचा मी पणाचा उपद्व्याप उल्लंघून पलीकडे जाता येते. एकदा जाऊन पाहून आलं की मग शेजारी, जेथे पाहिलं तेथे पाहायला मिळतं. चर्मचक्षुद्वारे ते पाहिले जात नाही. ते सांगता येत नाही. नाना शरीरामध्ये चंचल अखंडपणे वळवळ करते, असे ते परब्रम्ह सर्वांच्या ठायी आहे. चंचळ एकीकडे धावते दुसरीकडे ओस पडते. चंचल सर्व ठिकाणी एकाच वेळी पुरे पडत नाही. असं चंचल लक्षण समर्थ सांगत असून पुढील निरूपण ऐकूया पुढील भागात.जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

मोबाइल- ९४२०६९५१२७