भावार्थ दासबोध -भाग ९९

निरुपण : पद्माकर देशपांडे

0

दशक ७ समास ७ साधन प्रतिष्ठान 

जय जय रघुवीर समर्थ. द्वैताच्या भीतीमुळे अंतरातील वस्तू हवे पाहू न शकल्याने  मनाला समाधान वाटत नाही. एखाद्या गोष्टीची सवय लावली तर सवय लागते आणि मनुष्य त्या आत्मसुखापासून दूर जातो. नित्य-अनित्य यांचा अभ्यास केला तर मग समाधान मिळते. वस्तूचे चिंतन केले तर द्वैत निर्माण होते आणि चिंतन सोडले तर काहीच उमजत नाही त्यामुळे संशय निर्माण होतो म्हणून विवेक धरावा. ज्ञानाने प्रपंच बाजूला सारावा, अहंभाव ओसरावा. पण तो कमी होत नाही. परब्रम्ह म्हणजे अद्वैत पण त्याची कल्पना केली की द्वैत उभे राहते तिथे स्वतंत्र विचार आणि दृष्टांत याचा काही उपयोग होत नाही. ते आठवल्यानंतर विसरले जाते आणि विसरल्यानंतर आठवते. जाणूनही जाणीव होत नाही असे परब्रम्ह आहे. त्याला न भेटता भेट होते,

भेट झाली की ताटातूट होते अशी मुकेपणाची नवल गोष्ट आहे. ते साध्य करायला गेलं तर होत नाही आणि सोडायचं म्हटले तर सुटत नाही त्याच्याशी जोडलेला संबंध तुटत नाही, तो निरंतर राहतो. ते कायमस्वरूपी आहे, पहायला गेले तर दूर जाते, पाहिले नाही तरी इथे तिथे प्रकाशते. जिथे उपाय तोच अपाय आणि अपाय तोच उपाय. हे अनुभवाशिवाय काही समजत नाही. वृत्ती नसताना निवृत्तिपद प्राप्त होते. त्याचे ध्यान करता येत नाही, त्याचे चिंतन करता येत नाही, ते मनामध्ये मावत नाही असं परब्रम्ह. त्याला पाण्याची उपमा द्यावी तर ते निर्मळ निश्चळ आहे. सगळे विश्व बुडाले तरी ते कोरडे असते. ते प्रकाश किंवा काळोखासारखं नाही. आता ते कसे आहे ते कसे सांगायचे? असं ब्रह्म निरंजन आहे, ते कधीही दृश्यमान होत नाही,त्याला कसे पहायचे? त्याच्या कडे लक्ष देऊ म्हटले तर काहीच सापडत नाही त्यामुळे मनात संशय निर्माण होतो.

उगीचच काय पाहायचं? कुठे जाऊन राहायचं? सत्य स्वरूप अभाव अभाव आहे. हेच सत्य आहे तर मग वेदशास्त्र कसं काय खोटं म्हणायचे आणि व्यासादिकांचे कृत्य वावगे आहे काय? म्हणून त्याला खोटं म्हणता येत नाही ज्ञानाचे खूप उपाय केले जातात, खूप काही केलं जात त्याला खोटं कसं काय म्हणायचं? अद्वैत ज्ञानाचा उपदेश गुरु गीतेमध्ये महेशाने पार्वतीला दिलेला आहे. अवधूतगीतेमध्ये गोरक्षास ज्ञानाचा मार्ग सांगितलेला आहे. विष्णूने राजहंस होऊन विधीला उपदेश केलेला आहे. चतुश्लोकी भागवतामध्ये ब्रम्हाने नारदाला उपदेश केलेला आहे. पुढे व्यासांच्या मुखातून पुष्कळसा त्याचा विस्तार झालेला आहे. वशिष्ठ ऋषींनी रघुनाथाला वशिष्ठसार  सांगितले, तर कृष्णाने सातशे श्लोकांत गीतेद्वारे अर्जुनाला उपदेश केलेला आहे. असं किती सांगायचं? अनेक ऋषींनी सांगितलेले अद्वैत ज्ञान अंतिमतः सत्यच आहे. आत्मज्ञान खोटे आहे असं म्हणणं म्हणजे आपलं पतन आहे.

बुद्धिहीन लोकांना ते समजत नाही. जिथे शेषाची प्रज्ञा मंद झाली, वेदांना मौन पडले, मी जाणतो या अभिमानाने स्वरूपाची स्थिती सांगता आली नाही ते आपल्याला समजत नाही म्हणून त्याला खोटं कसं म्हणायचं? यावर उपाय म्हणजे सद्गुरूचे पाय धरणे.  त्यामुळे मिथ्या होते ते सत्य झाले, सत्य असून मिथ्या केले. संदेहाच्या समुद्रात अकस्मात् मन बुडाले. मनाला कल्पना करण्याची सवय असते, मनाने कल्पिले ते नाहीसे होते, त्यामुळे संदेह निर्माण होतो. मीपणाचा मार्ग सोडून द्यावा मग परमात्मा जोडावा. साधूंच्या संगतीने संदेह समूळ नाहीसा करावा. असे गूढ ज्ञान समर्थ रामदास स्वामी सांगत आहेत. पुढील कथा ऐकू या पुढील भागात. जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!