दशक आठ समाज एक देव दर्शन नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. काही लोक ब्रह्माला आपल्या इच्छेने सृष्टीचे निर्माण करणारा म्हणतात त्याच्याशिवाय सृष्टि निर्माण करणारे दुसरे कोण आहे? अशी अनेकदा चर्चा केली जाते. मात्र सर्व माया कुठून आली ती सांगितली पाहिजे असं श्रोत्यांनी स्वामिना विचारले. यावर वक्ता म्हणतो, सावधान वा पुढील समासामध्ये मी त्याचे निरूपण करील. ब्रह्मापासून माया कशी झाली ते पुढे सांगत आहे, ते ऐकावे त्यामुळे आपले समाधान होईल. इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे देवदर्शन नाम समास प्रथम समाप्त.
समास दुसरा सूक्ष्म आशंका नाम समास जय जय रघुवीर समर्थ. मागे श्रोत्यांनी प्रश्न विचारला होता की काही नसताना चराचर कसे निर्माण झाले ते आता सांगतो. ब्रह्म हे सनातन आहे. तिथे माया पाण्यातील भोवऱ्याप्रमाणे म्हणजे नसून दिसणारी कल्पनामय अशी आहे. परब्रम्ह हे नित्यमुक्त अक्रीय अस्पष्ट अव्यक्त आहे. ब्रह्म निराकार आहे. तिथे अव्यक्त सूक्ष्म मूळमाया आहे. तिथे माया माया ही कुठून आली? ब्रह्म या अखंड निर्गुण आहे तिथे इच्छा धरणारे कोण आहे? सगुणाशिवाय इच्छा निर्माण होऊ शकत नाही. मुळातच सगुण नाही त्यामुळे त्याचे नाव निर्गुण आहे, तिथे सगुण कसे झाले? जर निर्गुणच गुण घेऊन आले असा अर्थ घेतला तरी ते मुर्खपणाच आहे. काही जण म्हणतात की देऊन देव अवयवरहित आहे. तो करूनही अकर्ता असून त्याच्या लीला बापडा माणूस जाणू शकत नाही. असा उगाच महिमा सांगून शास्त्राचा अर्थ झाकून टाकतात आणि निर्गुणाला बळेच अकर्ता असून कर्ता म्हणतात.
ज्याला कर्तव्यच नाही तिथे कर्ता अकर्ता असे बोलणे पूर्णपणे खोटे आहे. मुळात निर्गुण आहे तेथे कसले कर्तेपण? तर मग सृष्टी रचण्याची इच्छा कोण धरत? ही परमेश्वराची इच्छा आहे, असा युक्तिवाद बहुतेक लोक करतात. पण त्या निर्गुणास इच्छा कशी ते समजत नाही.तेव्हा हे कोणी उभारलं? किंवा आपण कसे झालो? देव नसताना सगळं कसं झालं? मग देव आहेच कोठे.. देवाचा अभावच दिसतो. देवाला सृष्टीकर्ता म्हटलं तरी त्याला सगुणपण द्यावा लागतो. मग निर्गुणपणाची गोष्ट बुडाली. देव निर्गुण आहे मग या सृष्टीचा कर्ता कोण? कर्तृत्व सगुण असतानाच संभवते. आणि सगुण तर नाशिवंत आहे. मग हे चराचर कसे निर्माण झाले असा विचार पडतो.
माया ही स्वतंत्र असं म्हणलं तरी ते विपरीत दिसतं.माया कोणीच निर्माण केली नाही, ती आपोआप विस्तारली असं म्हटलं तर मग देव कुठे आला ते पण समजत नाही. देव निर्गुण स्वतःसिद्ध आहे तर मायेशी त्याचा काय संबंध? असं बोलण्यामध्ये विरोधाभास दिसतो. म्हणजे सगळं कर्तृत्व जे आहे ते मायेच्या कडे आले.मग सर्व भक्ताला भक्तांचा उद्धार करणारा देव नाही का? देव नसून नुसती माया असेल तर भक्तांचा सांभाळ करण्यास कोणीच नाही? म्हणून माया स्वतंत्र असा विचार होऊ शकत नाही.मायेची निर्मिती करणारा सर्वेश्वर तो एकच आहे. तर तो ईश्वर कसा आहे, मायेचा विचार कसा आहे हे आता सविस्तर सांगतो.श्रोत्यांनी मन एकाग्र करून सावधानपणे ऐकावे. असं समर्थ सांगत आहेत. हा भाग इथेच समाप्त झाला. पुढील कथा ऐकू या पुढील भागात. जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे

मोबाइल- ९४२०६९५१२७