भावार्थ दासबोध -भाग १३०

निरुपण : पद्माकर देशपांडे

0

दशक नववा, समास तीन निसंदेह निरूपण नाम समास 
जय जय रघुवीर समर्थ. त्याला समजून घेण्यासाठी अंतर शोधावे तर तो नित्य निरंतर आहे.त्याला शोधले असता विचार तो परमात्मा असल्याने त्याला मायेचा मळ चिटकत नाही. त्याला इच्छा रुपी द्वैताचा विटाळ झालाच नाही. असा जो योगीराज तो सहजी सहज आत्मा आहे. तो पूर्णब्रह्म आहे.वेदाचे मूळ आहे तो देहाकारात समजत नाही. देहासारखा देह दिसतो, पण अंतर मोठे असते. त्याला शोधले तर जन्म मरण रहात नाही. ज्याला जन्म मरण असते तो मी नाहीच. नाही तर तो कुठून येईल? निर्गुणाला जन्म कल्पीला किंवा निर्गुण उडवला आणि त्याच्या तोच उडाला आणि जन्मला. मध्यान्ही सूर्यावर थुंकले तर थुंका आपल्या अंगावरच पडतो.

दुसऱ्याच्या बाबतीत विचार करतो पण आपल्याला भोगावे लागते. समर्थ राजाचे महिमान जाणल्यावर समाधान होते पण भुंकायला लागलं तर ते श्वानच म्हणायचं. ज्ञानी हा सत्य स्वरूप असतो, मनुष्यरूप अज्ञान पाहतो. भाव तसा देव. देव निराकार निर्गुण आहे आणि लोक पाषाणाची पूजा करतात. पाषाण फुटतो, निर्गुण कसा काय फुटेल? देव एकच आहे. लोकांनी त्याला अनेक नावे, रूपे दिली पण म्हणून अनेक देव झाले असं होत नाही. तसा साधू हा आत्मज्ञानी असतो.

बोधामुळे पूर्ण समाधानी झालेला असतो. विचारपूर्वक आत्मसमर्पण केल्यामुळे तो आत्मरूप झालेला असतो. जळायला लागला की अग्नी हा लाकडाच्या आकारासारखा दिसतो पण त्याचे पुन्हा लाकूड होईल का? बोलूच नये. कापूर जळताना दिसतो तसा ज्ञान्याचा देह भासतो. जळत असलेला कापराचा खडा पुन्हा कर्पूरकर्दळीतून उत्पन्न होत नसतो, तसा ज्ञान्याचा देह एकदा नष्ट झाला की परत जन्माला येत नाही. भाजलेले बीज उगवत नाही. जळालेले वस्त्र उलगडता येत नाही. गंगेमध्ये मिसळलेले दुसऱ्या ओघाचे पाणी वेगळे करता येत नाही, पण गंगा एकच असते. साधू भासत नाही आणि आत्मा सर्वत्र असतो. सुवर्ण म्हणजे लोखंड नाही साधूला जन्म हे थोतांड आहे.

अज्ञानी प्राणी मूर्ख आहे, त्याला ते समजत नाही. अंधाला काही दिसत नाही, पण इतर लोक अंध असतात का? सन्निपात ज्वरामध्ये माणूस बरळतो. स्वप्नामध्ये एक जण घाबरला आणि स्वप्नामध्ये ओरडू लागला ते भय जागे असलेल्यास कसे वाटेल? सर्पाच्या आकाराची मुळी पाहिली एक घाबरला एकाने ओळखली. दोघांची अवस्था सारखी कशी होईल? एकाच्या हाताला धरलं तरी डसणार नाही आणि एकाला त्याची भीती वाटेल. त्याची कल्पना बाधक ठरते. विंचू,साप डसल्याने व्याकुळ झाला पण त्याच्यामुळे इतर लोक कसे कासावीस होतील?

आता अशा प्रकारचे हनुमान करणं हे योग्य नाही. ज्ञान हे ज्ञानी माणसालाच होते अज्ञानी माणसाला जन्म मरण चुकत नाही. ज्ञान नसल्यामुळे जाणण्यासाठी लोक वेगवेगळे प्रयास करतात आणि अज्ञानामुळे जन्ममृत्यू बघून कष्टी होतात. तीच कथा पुढे मी वर्णन करून सांगत आहे. सावधान व्हावे असे वक्ता म्हणतो. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे आह निःसंदेह निरूपण नाम समास तृतीय समाप्त.जय जय रघुवीर समर्थ.

दशक नऊ समास चार जाणपण निरूपण नाम समास 
जय जय रघुवीर समर्थ. पृथ्वीवर विविध प्रकारचे लोक राहतात. काही संपन्न असतात, काही दुर्बळ असतात. काही निर्मळ असतात, काही ओंगळ असतात. किती एक राजे असतात, काही दरिद्री असतात. कीत्येकांची स्थिती उत्तम असते, कित्येक अधमातील अधम असतात. हे कशामुळे झाले हे मला सांगितले पाहिजे. याचे उत्तर श्रोत्यांनी ऐकायला पाहिजे. हे सर्व गुणांमुळे होते. सद्गुणी लोकाना भाग्य भोगांयला मिळते, अवगुणी लोकांना दारिद्र्यप्राप्ती होते, याविषयी संशय नाही.  जो जो जिथे उपजला तो तो त्याच्या सामर्थ्यानुसार त्याला समजलं त्याला लोक कार्यकर्ता म्हणतात. जाणणारा माणूस कार्य करतो, न जाणणारा माणूस काहीच करत नाही. जाणता माणूस पोट भरतो, न येणारा  भीक मागतो. अशी माहिती समर्थ देत आहेत. याची पुढील माहिती ऐकू या पुढील भागात. जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः) 
निरुपण : पद्माकर देशपांडे

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!