दशक नऊ समास सात विकल्प निरसन नाम समास
श्रोता प्रश्न विचारत आहे, अंत:करण पंचकाच्या वृत्ती सांगितल्यानंतर हे सगळे जाणिवेचे यंत्र आहे,असे लक्षात येते. जाणीव म्हणजे स्मरण त्या स्मरणास जन्माचे सूत्र कसे गवसते? देह हा पंचमहाभूतांचा आहे. वायु हा त्याचा चालक आहे. जाणणे हा मनाचा मनोभाव आहे. असं हे सहज घडलं. तत्वांची गुंतागुंत झाली त्यामुळे कोणी कोणाला जन्मास घातले? आणि कशाप्रकारे? हे पाहिले तरी दिसत नाही, त्यामुळे जन्म झाला तरी उपजलेला प्राणी पुन्हा जन्माला येत नाही.
कोणालाच जन्म नाही, मग संतसंग कशासाठी करायचा? असा प्रश्न श्रोत्यांनी विचारलेला आहे. पूर्वी विस्मरण किंवा स्मरण काहीच नसते, मध्येच स्मरण येते. अंत:करण आतमध्ये असते ते या कळा जाणते. सावध असेल तर स्मरण, विकल होता विस्मरण, विस्मरण होताच प्राणी मरण पावतात. स्मरण- विस्मरण राहूनगेले, मग देहाला मरण आले तर पुढे कोणी कोणास जन्माला घातले? म्हणून जन्मच नाही आणि यातनाही दिसत नाही. हे व्यर्थच आहे अशी कल्पना बळावली. म्हणून कोणालाही जन्मच नाही अशी श्रोत्यांची शंका आहे. जे मरून गेले ते पुन्हा जन्माला येत नाहीत. वाळलेले लाकूड पुन्हा हिरवे होत नाही. पडलेले फळ पुन्हा चिकटवता येत नाही, तसं पडलेलं शरीर पुन्हा जन्माला येत नाही.
अवचितपणे मडकं फुटलं, तर फुटून गेलं ते पुन्हा काही जोडता येणार नाही. तसंच माणसाचं आहे. इथे अज्ञान आणि सज्ञान हे सारखेच झाले आहेत त्यामुळे श्रोत्यांनी अशी शंका उपस्थित केली. त्यावर वक्ता म्हणाला नास्तिकपणा करू नका. तुमचा अंदाज असला तरी जरा विचार करावा. प्रयत्नाविना कार्य झाले, जेवण केल्याशिवाय पोट भरले, ज्ञानाशिवाय मुक्त झाले हे घडत नाही. स्वतः आपण जेवला त्याला लोक तृप्त झाले असे वाटते, परंतु हे सगळ्यांना वाटलं पाहिजे! पोहणे शिकलेला आहे तो तरेल. पोहणे येत नाही तो बुडेल. इथेही अंदाज करील असा कोण असेल? त्याप्रमाणे ज्याला ज्ञान झाले, तेच तरले. त्यांचं बंधन तुटलं. ते मुक्त झाले. जे मोकळे झाले त्यालाच बंधन नाही असे म्हणतात. आणि हे प्रत्यक्ष बंधनात पडलेले आहेत त्यांच्या समाधान कसं करायचं ते तुमचे तुम्ही पहा. दुसऱ्याची तळमळ जाणत नाही तो मनुष्य परदुःख शीतल तसाच हा अनुभव. ज्याला आत्मज्ञान झाले, तत्त्वाने तत्व शोधले, त्यांना खुण गवसली, समाधान मिळाले.
ज्ञानामुळे जन्म मरण चुकते.सरसकट बोलणे अप्रमाण आहे. मग वेद आणि पुराण कशासाठी आहेत? वेदशास्त्र, विचारांचे बोलणे, महाअनुभवी मंडळी, भूमंडळावरील सगळे लोक हे मानत नाहीत. सगळे अप्रमाण मानायचे झाले तर आपलंच काय प्रमाण? म्हणून जिथे आत्मज्ञान झालं तो मुक्त होतो. सगळेच मुक्त झाले हा तर ज्ञान झाल्यावरचा उद्गार आहे. ज्ञानाविना उद्धार होणार नाही. आत्मज्ञान झाले म्हणून दृश्य खोटे ठरले पण अज्ञानी लोकांना त्याने वेढा घातलेला आहेच. आता हा प्रश्न फिटला. ज्ञानी माणूस ज्ञानामुळे मुक्त झाला. अज्ञानी माणूस त्याच्या कल्पनेने बांधला गेला. वृत्तीशून्य विज्ञान आणि नेणतेपणाचे अज्ञान, कर्तेपणाचा त्याग केलेला मुक्त आव आळसाने काहीच न करणारा बध्द आणि स्वानुभवाने जन्म मृत्यू नसल्याचा निश्चय व तर्काने जन्म मृत्यू न मानण्याचे अज्ञ व्यक्तींचे अनुमान हे बरोबरीचे मानू नये.
बंधन म्हणजे काहीच नाही पण सगळ्यांनी वेढा घातलेला आहे, याला कळण्याशिवाय उपाय नाही.काहीच नाही आणि बाधते, याचेही नवल पहा खोट्या जाणिवेमुळे बंधन असल्यामुळे तो बध्द असतो अशी माहिती समर्थ देत आहेत.पुढील माहिती ऐकूया पुढील भागात. जय जय रघुवीर समर्थ. (क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे

मोबाइल- ९४२०६९५१२७