भावार्थ दासबोध – भाग १५८

निरुपण :पद्माकर देशपांडे

0

दशक ११ समाज ६ महंत लक्षण नाम समास 
जय जय रघुवीर समर्थ. शुद्ध नीटनेटके लिहावे. लिहून पुन्हा शुद्ध शोधावे. पुन्हा पुन्हा शोधून शुद्ध वाचावे. यात चुका करू नये. विस्कळीत झालेल्या कानामात्रा व्यवस्थित कराव्या. नाना कथांमध्ये रंग भरावे. जाणल्याशिवाय सांगता येत नाही. सांगितल्याशिवाय समजणार नाही. समजल्याशिवाय कोणास काहीच येणार नाही.   हरिकथा निरूपण, व्यवस्थित राजकारण, जीवनात कसे वागावे तेही सांगावे.  विचारणे, सांगणे, अर्थातर करणे, सगळ्यांचे समाधान राखणे, महत्त्वाच्या सूचना देणे, सावधपणे तर्क देणे, यथायोग्य निश्चय करणे, असं जो जाणतो तो बुद्धिवंत महंत. त्यापेक्षा वेगळे काही नाही. तारतम्य, उपमा अलंकार, शब्दांची बांधणी, कविता, उत्तम वचने, सभाधिटपणा ज्याच्याजवळ असते.

जो एकांतासाठी तत्पर असतो, आधी पाठांतर करतो, ग्रंथाच्या आतील अर्थ शोधतो, आधी स्वतः शिकून जो शिकवतो त्यालाच श्रेष्ठ ही पदवी मिळते. मायेत गुंतलेल्यांना विवेकाच्या बळावर सोडवतो त्याला लोक चांगले म्हणतात. अक्षर सुंदर, वाचणे सुंदर, बोलणं सुंदर, चालणं सुंदर, भक्ती ज्ञान, वैराग्य सुंदर करून दाखवतो. ज्याला प्रयत्न करणं आवडतं, नाना प्रसंगात जो धैर्याने उभा ठाकतो, धीटपणे प्रगट होतो, लपून राहणारा नको. संकट समई पुढे होऊन काम करतो आणि अलिप्तपणा असून देखील उपाधी बाळगत नाही.

सर्वांच्या ठाई राहतो पण पाहिले तर कुठेच नसतो. अंतरात्मा जसा ठाईच्या ठाई गुप्त होतो तसा तो असतो. त्याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही. पाहायला गेलं तर तो दिसत नाही. दिसला नाही तरी प्राणिमात्रांकडून वर्तन करून घेतो. तसाच हा देखील नानापरीने खूप लोकांना शहाणे करतो. नाना स्थूल, सूक्ष्म विद्यांचे विवरण करतो. आपल्या संगतीने शहाणे करून सगळ्यांना ज्ञान देतो, निती न्याय राखतो, अन्याय करत नाही आणि दुसऱ्यालाही करू देत नाही. कठीण प्रसंगी उपाय करतो, असा जो पुरुष असतो तो सगळ्या लोकांचा आधार असतो. असं सांगून हे गुण घ्यावेत असे रघुनाथांचा दास अर्थात समर्थ म्हणत आहेत. इतीश्री दासबोधे  गुरु शिष्य संवादे महंत लक्षण नाम समास समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.

दशका अकरा समास सात चंचल नदी निरूपण नाम समास 
जय जय रघुवीर समर्थ.विद्या अविद्यात्मक माया म्हणजे चंचल नदी आहे. ज्ञानमय सद्विद्या मात्र गुप्त आहे, याची प्रचिती घ्यावी, हे खोटे नाही. केवळ परब्रह्मरूपी नदी  निर्माण झाली, वर तोंड करून चालली, अखंड वहात आहे परंतु तिला कोणीही पाहिलेले नाही. वळणे, वाकणे, भवरे, उकळ्या, तरंग, झरे, लाटा हे तिच्यात ठायी ठायी दिसतात. शुष्क जळाच्या चिळकांड्या, धबधबे, कोसळणाऱ्या धारा, खळखळ धावणारे पाणी, पाण्याचे छोटे ओघ, कुठे भळभळा वाहणारे चपळ पाणी.  फेस, फुगे, हेलकावे, सैरावैरा धावणारे उदक, थेंब, अनेक तुषार अणुरेणु किती सांगावे!  वहात असताना प्रवाहात अनेक पदार्थ सापडतात. लहान मोठे धबधबे दिसतात,

लहान दगड देखील वाहून जातात. कुठे खडकाच्या बेटाला वळसा घालून पाणी वाहते. कुठे मऊ जमीनी प्रवाहामुळे खंडित झाल्या तर कुठे तुटून गेलेल्या कठीण कपारी तशाच राहिलेल्या दिसतात. सृष्टीमध्ये अशी उदंड दृश्ये दिसतात. कधीकधी पूर्ण वाहत जातं, कधी कधी वळसे घालत पाणी वाहते, कधी सापटीमुळे अडकून वर उफाळून येते. कधीकधी पाणी दगडावर आपटत जातं. या पाण्यात कधी चिरडून मरण उद्भवते, कित्येकांच्या अंगात अहंकाराचे पाणी भरून ते गर्विष्ठपणाने फुगतात. कोणी बळाचा वापर करतो, ते पोहत उगमाचे दर्शन झाल्याने पवित्र तीर्थरूप होतात. अशी ब्रह्मादिकांची भुवने,  ब्रम्हांड देवतांची स्थाने म्हणजे अशा प्रकारची लौकिक प्रवाहाच्या विरुद्ध असलेली गंगा सगळ्यांना पाहायला मिळते.

त्या पाण्यासारखे निर्मल, त्या पाण्यासारखे चंचल दुसरं काही नाही, म्हणून त्याला आपोनारायण असे म्हणतात,असं वर्णन समर्थ महामायारूपी नदीचे करीत आहेत.  हा भाग येथे जमात झाला असून पुढील कथा ऐकू या पुढील भागात. जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः) 
निरुपण : पद्माकर देशपांडे

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!