एसटी बसेसमध्ये आता बसणार ,जीपीएस,सीसीटीव्ही कॅमेरे आणि पॅनिक बटन
एस टी कर्मचाऱ्यांचा रखडलेला उर्वरित पगार मंगळवारी होणार.!
मुंबई ,दि, १४ एप्रिल २०२५ –महिलांच्या सुरक्षेसाठी राज्यात परिवहन मंडळाने आता मोठा निर्णय घेतला आहे.स्वारगेटच्या घटनेनंतर एसटीकडून सध्याच्या १२ हजार बसेस मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि जीपीएस बसवण्यात येणार आहे.याशिवाय एसटी महामंडळाने नव्या अडीच हजार गाड्यांमध्ये जीपीएस, पॅनिक बटण आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे महामंडळाच्या बसेस मध्ये सुधारणा करण्याचे काम सुरु जरी असले तरी महामंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच कर्मचाऱ्यांना मार्चचा पगार ५६ टक्के देण्यात आल्याने कर्मचायांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. आता उर्वरित पगार येत्या मंगळवारी होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
एसटी महामंडळाकडे सध्या उपलब्ध असलेल्या १५ हजार बसेसपैकी ३००० बस पुढील वर्षभरात आता स्क्रॅप मध्ये जाणार आहेत. सुस्थितीतील असलेल्या १२ हजार बस टप्प्याटप्प्याने सेवेत दाखल होणार आहे आहेत. या बसेसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेची अधिक काळजी घेण्यात येणार आहे. यासाठी एसटीच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या बसेसमध्ये दोन महिन्यांत प्रत्येकी ४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहे. तसेच त्याचे मॉनिटरिंग गाडीतच असणार आहे. महामंडळाच्या सर्व बसेसना जीपीएस प्रणाली देखील बसवली जाणार आहे.
त्यामुळे बसेसचे नेमके लोकेशन समजायला मदत होणार आहे. यामुळे प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन करण्यास मदत होणार आहे. यासाठी केंद्र सरकारकडून देखील निधी मागण्यात आला असून मे महिन्यात निविदा प्रक्रिया राबवण्याचे नियोजन केले जात आहे. एसटी महामंडळाने याआधी कोट्यवधी रुपये खर्च करून १४ हजार बसेसमध्ये जीपीएस यंत्रणा बसवली होती.मात्र त्यातील ६००० गाड्यांमधील यंत्रणा निकामी झाली आहे. पडताळणी केल्यानंतर फक्त ८००० बसेसमधील जीपीएस यंत्रणा सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आता ६००० बसगाड्यांमध्ये पुन्हा नव्याने जीपीएस मशिन बसवावे लागणार आहेत
एस टी कर्मचाऱ्यांचा उर्वरित पगार मंगळवारी होणार.!
एसटी कर्मचाऱ्यांना गेल्या महिन्याचे फक्त ५६टक्के वेतन मिळाले होते. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची नाराजी होती. मेहनत करुन ही हक्काचा पगार मिळाला नाही. त्यामुळे महिन्याचं बजेट पूर्ण कोलमडलं. कुणाचे बँकेच हाफ्ते चुकले, तर कुणाची आर्थिक कोंडी झाली. इतर सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत आणि पूर्ण होता. मग एसटी कर्मचाऱ्यांनी काय घोडं मारलं अशी प्रतिक्रीया उमटत होत्या. शेवटी सरकारने आता त्यावर तोडगा काढला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीन तोडगा काढण्यात आला आहे.
पूर्ण पगार न झाल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती. गुरूवारी सांगोला तालुक्याच्या दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री शिंदे यांची काही एसटी कर्मचाऱ्यांनी भेट घेतली. त्यांनी पगार झाला नाही ही बाब एकनाथ शिंदे यांच्या कानावर घातली. आपले उर्वरित वेतन लवकरच द्यावे, अशी मागणी केली होती. या मागणीची तत्काळ दखल शिंदे यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी राज्याचे वित्त सचिव ओमप्रकाश गुप्ता यांच्याशी फोनवरून चर्चा केली.
या चर्चेअंती एसटी कर्मचाऱ्यांचे या महिन्याचे उर्वरित ४४ टक्के वेतन येत्या मंगळवारपर्यंत देण्यात येईल असे गुप्ता यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या पुढाकाराने एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कर्मचाऱ्यांवरिल वेतन कपातीचे संकट दूर होण्यास मदत झाली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित ४४ टक्के पगार येत्या मंगळवार पर्यंत देण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी पुढाकार घेऊन वित्त सचिवांशी केलेल्या चर्चेअंती एसटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन लवकरच अदा करण्याची त्यांनी तयारी दर्शवली आहे.
राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटी महामंडळ तोट्यात असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे एसटीवर मोठ्या प्रमाणात आर्थिक ताण पडत आहे. खर्च जास्त आणि उत्पन्न कमी. त्यामुळे महामंडळाला राज्य सरकारच्या मदतीवर अवलंबून राहावं लागत आहे. राज्य सरकार कडून मदत आल्यानंतरच पुढील प्रक्रिया होतात. अनेक वेळा पगार उशिरा होतात. तर कधी होतच नाही अशी स्थिती निर्माण झालेली आहे.