चेन्नई,दि. २८ सप्टेंबर २०२३ – भारताच्या पहिल्या हरित क्रांतीचे जनक डॉ.एम. एस. स्वामीनाथन यांचे आज गुरुवारी (दि.२८) रोजी चेन्नई येथे सकाळी ११.१५ वाजता निधन झाले. चेन्नई येथील निवासस्थांनी त्यांनी वयाच्या ९८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
भारतातील कृषी क्षेत्रात त्यांचं मोठं योगदान आहे. त्यांच्या योगदानाबद्दल भारत सरकारनं त्यांना विविध पुरस्कारानं देखील सन्मानीत केलं आहे. त्यांच्या निधनानंतर सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त होतेय.
भारतीय गरीब शेतकऱ्यांच्या शेतात गव्हाचे आणि तांदळाचे उच्च उत्पन्न देणारे वाण पेरुन त्यांनी हरितक्रांती घडवून आणली. याचे सर्व श्रेय स्वामीनाथन यांनाच जाते.त्यांच्या या प्रयत्नांमुळेच गहू आणि तांदूळ यांच्या उत्पादनांत भारत स्वयंपूर्ण होऊ शकला.
डॉ. एम.एस. स्वामिनाथन यांचा जन्म तामिळनाडूतील कुंभकोणम याठिकाणी 7 ऑगस्ट 1925 रोजी झाला होता. डॉ. मोणकोंबू सांबशिवन स्वामीनाथन असे त्यांचे पूर्ण नाव होते. भारतात हरितक्रांती घडवून आणण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.त्यांनी कृषी क्षेत्रातील संशोधनासाठी ‘एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाऊंडेशन’ची स्थापना केली होती. भारत सरकारने स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली स्वामीनाथन आयोगाची स्थापन केली होती. स्वामीनाथन यांचे वडील डॉक्टर होते. ते गांधीवादी आणि स्वदेशीचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या विचारांचा स्वामीनाथन यांच्यावर चांगला प्रभाव पडला. वडिलांप्रमाणे तेही डॉक्टरी शिक्षणाकडे वळले. पण १९४३ मधील बंगालच्या दुष्काळामुळे त्यांनी ते शिक्षण अर्धवट सोडून दिले. ते शेतकी विषयाचे शिक्षण घेऊ लागले. केरळमधील महाराजस कॉलेजमधून त्यांनी कृषीक्षेत्रातली पदवी घेतली होती.
कृषीक्षेत्रात काम करायचे नक्की झाल्यावर स्वामीनाथन यांनी मद्रास कृषी महाविद्यालयातून आणखी एक पदवी घेतली. १९४७ साली ते दिल्लीच्या इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी रवाना झाले. १९४९ मध्ये विशेष प्रावीण्यासह त्यांनी ती पदवी प्राप्त केली. युनियन पब्लिक सर्व्हिसची परीक्षा देऊन ते भारतीय पोलीस सेवेसाठी पात्र ठरले. मात्र त्यांनी पोलीस ऑफिसर न होता कृषी क्षेत्रात संशोधन करायचे ठरवले.
नेदरलॅंडमध्ये बटाटाच्या अनुवांशिक शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्यांना मिळालेल्या शिष्यवृत्तीतून त्यांनी १९५२ मध्ये पीएच.डी. केली. परदेशांत विविध संधी असतानाही ते भारतात परतले. जगभरांतील कृषी विद्यार्थ्यांबरोबर त्यांनी कृषिसंशोधनाबरोबर वनस्पतींची पैदास आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन या विषयांवर काम केले आहे.स्वामीनाथन यांच्या पश्चात त्यांची पत्नी मीना आणि तीन मुली सौम्या स्वामीनाथन, मधुरा स्वामीनाथन आणि नित्या स्वामीनाथन असा परिवार आहे. अधिकचं उत्पादन देणाऱ्या धानाच्या जाती विकसित करण्यात त्यांचं मोठं योगदान होतं.
स्वामीनाथन यांच्या पश्चात त्यांची पत्नी मीना आणि तीन मुली सौम्या स्वामीनाथन, मधुरा स्वामीनाथन आणि नित्या स्वामीनाथन असा परिवार आहे.अधिकचं उत्पादन देणाऱ्या धानाच्या जाती विकसित करण्यात त्यांचं मोठं योगदान होतं.
श्रध्दांजली!
भारतीय हरितक्रांतीचे जनक, पद्मविभूषण डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! देशाला कृषीक्षेत्रात स्वयंपूर्ण करण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. कृषी क्षेत्राचा विकास हाच ध्यास घेऊन आणि देशासह शेतकरी हित हेच ध्येय मानून त्यांनी केलेले कार्य कायम स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो व मृतात्म्यास सद्गती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
भावपूर्ण श्रद्धांजली!
छगन भुजबळ,
मंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्र राज्य.