महापत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंकडून चिरफाड,राहुल नार्वेकरांवर हल्लाबोल
पक्ष घटनेचा व्हिडीओ सादर करत उद्धव ठाकरेंनी जनते समोर सादर केले पुरावे
मुंबई,दि,१६ जानेवारी २०२४ – शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज महापत्रकार परिषद घेऊन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आमदार अपात्रता प्रकरणात दिलेला निकाल कसा चुकीचा होता याबाबतचा पक्ष घटनेचा व्हिडीओ सादर करत महापत्रकार परिषदेत पुरावे सादर केले. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी कशा प्रकारे चुकीचा निर्णय दिला, त्यामध्ये नेमकं काय काय घडलं, नार्वेकरांनी कशा प्रकारे भाजपला योग्य असा निर्णय दिला याचा दावा आज उद्धव ठाकरे यांनी केला.यावेळी त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे प्रमुख नेते आणि कायदेतज्ज्ञ असिम सरोदे आणि सर्वोच्च न्यायालयाचे वकील रोहित शर्मा हे उपस्थित होते.
राहुल नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन न करता त्याचा विश्वासघात केला,नार्वेकरांनी अन्यायाचं नाव हे न्याय ठेवलं आणि निकाल दिला असा घणाघाती आरोप अॅड. असिम सरोदे यांनी केला. विधीमंडळ पक्ष हा पाच वर्षांसाठी असतो, त्यामुळे मूळ पक्ष हाच महत्त्वाचा आहे असं सर्वोच्च न्यायालयाने सांगूनही नार्वेकरांनी त्याचे पालन केलं नाही आणि बहुमताच्या आधारे निर्णय दिल्याचं सांगितलं. त्यामुळे नार्वेकरांचा निकाल हा लोकशाहीला मारक असल्याचंही अॅड सरोदे म्हणाले.
राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी शिवसेना असल्याचा निकाल देत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला होता. आजच्या महापत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले शिवसेनेबाबतच्या निकालानंतर महाराष्ट्रात संतापाचं वातावरण झालं आहे. गेल्या आठवड्यात लबाडाने नव्हे तर लवादाने जो निकाल दिला त्याच्याविरोधात आपण सुप्रीम कोर्टात गेलो आहोत. सुप्रीम कोर्टाकडून आशा आहे. पण आम्ही आज जनतेच्या न्यायालयात आलो आहोत. कारण देशात मतदार सरकार ठरवत असतो. म्हणजे सरकार कोणाचंही असलं तरी सत्ता जनतेचीच असते,”असं उद्धव ठाकरे म्हणाले.
अनिल पराबांकडून पुरावे सादर
१९९९ च्या नंतर आमच्याकडे रेकॉर्डवर शिवसेनेची कोणतीही घटना नाही. त्यामुळे १९९९ ची घटना तुमची शेवटची घटना आहे. त्या घटनेत सर्वोच्च अधिकार शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना होते. त्यानंतर अधिकार कुणाला दिल्याची नोंद आमच्याकडे नाही. आता बाळासाहेब ठाकरे नसल्यामुळे विधिमंडळाचा पक्ष हाच मूळ पक्ष आहे, असे सांगत पक्ष आणि चिन्ह काढून घेतलं. निवडणूक आयोगाच्या निकालाची पुनरावृत्ती नार्वेकरांनी आपल्या निकालात केली आहे.