मुंबई,दि.२४ जुलै २०२३ – मराठी नाट्य चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेते ९८ मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर यांचे निधन झाले आहे. ते ८८ वर्षांचे होते.अनेक मराठी नाटके तसेच १०० हुन अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या होत्या.
३ मे १९३६ रोजी जन्मलेले जयंत सावरकर यांनी वयाच्या विसाव्या वर्षी, म्हणजे १९५५ रंगभूमीवर पाऊल ठेवले रंगभूमीवर वावरायचे या एकाच प्रेरणेने ते झपाटले होते. त्यामुळे त्यांनी रंगभूमीवर जशी संधी मिळेल त्याचा लाभ घ्यायचे धोरण ठेवले. सुरुवातीची बरीच वर्षे ते ‘बॅक स्टेज आर्टिस्ट’ म्हणून काम करत होते. प्रारंभी हौशी नाट्यसंस्थांमधून त्यांनी लहानसहान कामे केली आणि नंतर साहित्य संघाच्या नाट्यशाखेत कार्यरत असताना त्यांनी नाटकांत काम करण्याची मिळालेली संधी सोडली नाही.
‘एकच प्याला’तील तळीराम,‘तुझे आहे तुजपाशी’ मधील आचार्य, ‘व्यक्ती आणि वल्ली’तील अंतू बर्वा आणि हरितात्या या भूमिका त्यांनी संस्मरणीय केल्या. रंगभूमीवरील कलावंतांसाठी आजही दंतकथा असलेले केशवराव दाते, मा. दत्ताराम, मामा पेंडसे यांच्याबरोबर काम करण्याचे भाग्य सावरकर यांना लाभले. आजच्या आघाडीच्या चंद्रकांत कुलकर्णी, मंगेश कदम आदींच्या दिग्दर्शनाखालीही सावरकरांना रंगमंचावर वावरण्याची संधी मिळाली. सौजन्याची ऐशीतैशी, सूर्यास्त, टिळक आगरकर, ययाति आणि देवयानी, याही नाटकांमधून सावरकरांनी छाप पाडली.
सहजता हा त्यांच्या अभिनयाचा स्थायीभाव आहे आणि यातूनच त्यांनी आपल्या भूमिका आसपास वावरणाऱ्या माणसांसारख्या ओळखीच्या केल्या. रसिकांना आपल्या भूमिकेत गुंतवून ठेवण्याची किमया सावरकरांना गेल्या सहा दशकांच्या रंगभूमीवरील सातत्याच्या वावरातून आणि निरीक्षणातून साधली असावी. तसेच आधीपासून लाभलेला अनेक थोरामोठ्यांचा सहवास आणि आजही तरुण कलावंत, तंत्रज्ञांशी असलेला चर्चासंवाद त्यासाठी लाभदायक ठरला आहे.
हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व….. अखेरचा सलाम … भावपूर्ण श्रद्धांजली