मुंबई,दि,७ फेब्रुवारी २०२४ – काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव व पक्षाचं चिन्ह म्हणजेच घड्याळ केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला दिल्यानंतर आता सोशल मीडियावर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. शरद पवार गटाने अजित पवार गटावर हल्लाबोल केला असून, राज्यभरात त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात बॅनरबाजी केली आहे. यादरम्याने जुने व्हिडीओ, पोस्टही दोन्ही गटाकडून शेअर करत निशाणा साधला जात आहे. त्यात मनसेने एक व्हिडिओ ट्विट केल्यानंतर त्याची चर्चा आता सर्वत्र सुरु आहे.
निवडणूक आयोगाने निर्णय दिल्यानंतर दोन्ही गटाच्या नेत्यांकडून एकमेकांवर टीका केली जात असताना अजित पवारांचा एक जुना व्हिडीओ चर्चेत आहे. मनसेने अजित पवारांचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अजित पवार निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेंच्या बाजूने निर्णय दिल्यावर टीका करताना दिसत आहेत. या व्हिडीओच्या माध्यमातून मनसेने अजित पवारांना त्यांच्यात टीकेची आणि सध्याच्या परिस्थितीची आठवण करुन दिली आहे.
हा व्हिडीओ पोस्ट करताना ‘भुजां’मध्ये कितीही ‘बळ’ आहे असं म्हटलं तरी नीतिमत्तेचे ‘तट’ फोडून सत्तेसाठी घातलेला हा ‘वळसा’ महाराष्ट्राला ‘पटेल’ का? अशी विचारणा केली आहे.
व्हिडीओ मध्ये अजित पवार काय म्हणाले !”ज्याच्या वडिलांनी पक्ष काढला, वाढवला, महाराष्ट्रात सर्व दूरपर्यंत नेला त्यांचाच पक्ष, चिन्ह काढून घेतलं. जरी निवडणूक आयोगाने दिलं असलं तरी जनतेला पटल आहे का याचाही विचार करायला हवा. तुमच्यात धमक होती तर काढा ना पक्ष, कोणी अडवलं होतं?,” असं अजित पवार या व्हिडीओत बोलताना ऐकू येत आहे. निवडणूक आयोगाने खरी शिवसेना एकनाथ शिंदेंची असल्याचा निर्णय दिल्यानंतर ही टीका करण्यात आली होती.
'भुजां'मध्ये कितीही 'बळ' आहे असं म्हटलं तरी नीतिमत्तेचे 'तट' फोडून सत्तेसाठी घातलेला हा 'वळसा' महाराष्ट्राला 'पटेल' का?
वाह रे पट्ठ्या…! 🤨 pic.twitter.com/ZXcOk6y6oy
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) February 7, 2024
दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनीही पत्रकार परिषदेत हा व्हिडीओ दाखवला होता. आम्हीही महा पत्रकार परिषद घेणार आहोत. आमच्याकडेही व्हिडीओ आहेत. सगळं पुराव्यानिशी दाखवणार आहोत. आजपासून आम्ही जनतेत जाणार आहोत. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय आहे हे सगळ्यांना माहीत आहे असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. निवडणूक आयोगाने कट रचून शरद पवारांना संपवण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी अजित पवार आणि गँग कारणीभूत आहे असा आरोप त्यांनी केला.
काका – पुतण्यांमधला ओलावा… 🧡काही मूक संवादांमध्ये प्रचंड अर्थ दडलेले असतात ! #बाळासाहेबठाकरे #राजसाहेबठाकरे pic.twitter.com/3cKWxoVCPB
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) February 7, 2024