मुंबई,दि,१६ जानेवारी २०२४ -वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे उत्तर भारतात तीव्र थंडीची लाट आली असून महाराष्ट्रातही थंडी सुरू होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील ४८ तासात देशातील मध्य आणि पूर्व भागात तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता. राज्यातील काही भागात १९ जानेवारीनंतर थंडीची लाट येणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे.आज नाशिकमध्ये ९.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
उत्तर भारतात दाट धुके आणि अनेक भागांत बर्फवृष्टी होताना दिसत आहे. भारतीय हवामान खात्याने पश्चिम उत्तर प्रदेशातील विविध भागात ‘रेड’ अलर्ट जारी केला आहे. त्याशिवाय हरियाणातील काही जिल्ह्यांमध्ये ‘ऑरेंज’ अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील काही दिवस थंडीची लाट आणि दाट धुक्याचा इशारा आयएमडीकडून देण्यात आला आहे.
पुढील ४८ तासात लखनौसह उत्तर प्रदेशातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता आहे, असं आयएमडीने आपल्या अंदाजात म्हटलं आहे. तसेच पश्चिम उत्तर प्रदेशातील जिल्ह्यांमध्ये दाट धुके पडण्याची शक्यता आहे. दिल्लीतही तापमानाचा पारा घसरला असून सोमवारी सकाळी दिल्लीत या मोसमातील सर्वात कमी तापमान ३.३ अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं,शहरातील बहुतेक भागांमध्ये दाट धुकं पाहायला मिळालं. दिल्लीत आज थंडीची लाट येण्याचा शक्यता असून आयएमडीने थंडी आणि धुक्याचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. उत्तरेकडील थंडीची लाट आणि धुके २० जानेवारीपर्यंत कायम राहण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.
दाट धुक्यामुळे रेल्वेला फटका : प्रवाशांचे हाल
थंडीचा कडाका वाढल्यामुळे असून त्याचा थेट फटका रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाडय़ांना बसू लागला आहे. मध्यरात्रीपासून सकाळी उशिरापर्यंत महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरयाणा, दिल्ली परिसरात धुक्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाडय़ांना फटका बसत आहेत. रेल्वे ट्रकमधील दृश्यमानता कमालीची कमी होत असल्याने लोको पायलटला समोरील सिग्नल दिसत नाहीत. त्याचा १८ एक्सप्रेस गाडय़ांना फटका बसला असून अनेक गाडय़ा चार-पाच तास विलंब झाल्याने प्रवाशांचे प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.
लोणावळा आणि कसारा घाटातही धुके
धुक्याचा परिणाम पहाटेच्या सुमारास मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मेल एक्सप्रेस गाडय़ांना बसत आहे. लोणावळा आणि कसारा घाटात असलेल्या धुक्यामुळे पहाटे ताशी 40-50 किलोमीटर वेगाने गाडय़ा चालवल्या जातात. त्यामुळे मुंबईत येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाडय़ा विलंबाने दाखल होतात. त्यामुळे लोकलच्या वाहतुकीवरही परिणाम होत असल्याचे समोर आले आहे.