उत्कृष्ठ अभिनयासह ‘जिद्द आणि संघर्षाची कथा – घूमर

एनसी देशपांडे

0

प्रस्तावना
आर. बालकृष्णन, ज्याना सगळेजण आर.बाल्की या नावाने ओळखतात. चित्रपट निर्माता, लेखक, दिग्दर्शक, पटकथा आणि जाहिरात क्षेत्रातील लिंटाज समुहाचे पूर्व अध्यक्ष अशी मोठी ओळख. शिवाय ‘चीनी कम, पा आणि पॅड मॅन’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केल्याने त्यांच्या विषयी एक विशेष आकर्षण बॉलीवूडमध्ये निर्माण झाले आहे. म्हणजेच ‘आर बाल्कींचा’ चित्रपट म्हणजे नक्कीच काहीतरी वेगळं, अफलातून वगैरे वगैरे असणार याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण होते, हेच ते महात्म्य! प्रत्येक चित्रपट निर्मितीच्या प्रक्रियेत वेगळा ‘आशय-विषय’, नवीन संकल्पना, नवीन जोडी आणि अत्यंत नवीन पद्धतीने विषयाची मांडणी, या सर्व बाबींकडे त्यांचा विशेष कल असतो. आता त्यांच्या दिग्दर्शनात सादर झालेला ‘घूमर’ हा चित्रपट म्हणजे, हीच त्यांची स्टाईल असं म्हणण्याची अजिबात सोय नाही. ‘घुमर’ बघितल्यानंतर माझे सगळे इमले कोसळले. कारण प्रत्येकवेळी बाल्किंच्या चित्रपट यशाची कारणे वेगवेगळी होती. तद्वतच ‘घूमर’च्या यशात कलाकारांचा अभिनय हे प्रमुख कारण आहे, असं खात्रीने म्हणता येईल!
आम्हा भारतीयांना ‘सिनेमा आणि क्रिकेट विश्व’ याबद्दल प्रचंड आकर्षण आहे.’बॉलीवूड स्टार आणि क्रिकेटर्स’ आज भारतामध्ये ‘सेलेब्रिटी’ मानले जातात. क्रिकेट सामन्याला बॉलीवूड स्टारची हजेरी असल्यास सामना अधिकच रंगात येतो. तसेच एखाद्या चित्रपटात जर क्रिकेट हा विषय असेल तर मग विचारूच नका! इतकं प्रेम भारतीयांच्या मनात ‘सिनेमा आणि क्रिकेट’ बद्दल सामावलेलं आहे. ‘धोनी – द अनटोल्ड स्टोरी’ आणि ‘८३’ च्या यशामागे भारतीयांचं प्रेम हेच प्रमुख कारण आहे. कदाचित हाच विचार करून दिग्दर्शक आर बाल्की यांनी ‘घूमर’ बनवला असावा.

कथासंहिता
हा चित्रपट एका कथाकल्पनेवर आधारलेला आहे. १९४८ साली एका हाताने ‘पिस्तुल शुटींग’ करून ऑलिम्पिक पदक पटकावणाऱ्या ‘कैरोली टकास’ या एका हंगेरियन क्रीडापटूची पार्श्वभूमी या चित्रपटाला लाभली आहे. किंबहुना या क्रीडापटूच्या एकुणात प्रवासाने प्रेरित होऊन या चित्रपटाचं कथानक बांधलं गेल्याचं निर्मात्यांनी नमूद केलं आहे. एखादा खेळ केंद्रस्थानी ठेऊन संघर्ष करणाऱ्या खेळाडूची यशोगाथा अनेकदा मांडली गेली आहे. ज्यामध्ये ‘मिल्खासिंग, अनन्या, मेरी कोम, मिथु’ अशी अनेक उदाहरणे दाखल्यासाठी देता येतील.
आपल्या शरीराचा एक अवयव गमावल्यानंतर, दैवकृपेने उरलेल्या प्रत्येक अवयवाचा जास्तीतजास्त उपयोग करून आपल्या आवडत्या खेळात/क्षेत्रात प्राविण्य मिळवण्याची जिद्द, त्यासाठीचा संघर्ष याचं यथार्थ चित्रण, नेहमीच प्रेरणादायी ठरलं आहे. ‘जिद्द आणि संघर्ष’ हा या कथानकाचा गाभा असून या कथानकाची नायिका ‘अनायना दीक्षित’ (सैय्यामी खेर) या क्रिकेटपटूची ही गोष्ट आहे. सोबतच तिच्या इच्छाशक्तीला बळ देणारा तिचा क्रीडा प्रशिक्षक पॅडी (अभिषेक बच्चन) याचीही ही गोष्ट आहे. लहानपणापासून आपण एक उत्तम फलंदाज बनायचं ही प्रबळ इच्छा ‘अनायना’ ने बाळगली असते आणि त्यासाठी तिचा सातत्याने पाठपुरावा सुरु असतो. आपली गुणवत्ता आणि कठोर परिश्रम याच्या बळावर, कमी वयात अनायना भारतीय महिला क्रिकेट संघात दाखल होते. इंग्लंडच्या दौऱ्यासाठी तिची निवड झालेली असते. या निवड प्रक्रियेत तिच्या आयुष्यात ‘पॅडी’ नावाचा झंझावात येतो. याचं खरं नाव ‘पद्मनाभ सोधी’, हा एकेकाळचा यशस्वी आणि नशिबाने दुर्दैवी गोलंदाज असतो.

अनायनाच्या एकुणात फलंदाजी बद्दल ‘पॅडी’ बरंच काही सुनावतो काय ….. आणि नेमकं त्याचवेळेला दौऱ्यावर निघण्यापूर्वी एका अपघातात अनायनाला आपला उजवा हात गमवावा लागतो. आपलं स्वप्न, जिद्द, कठोर परिश्रम आणि हातातोंडाशी घास आलेला असतांना, अनायनावर गुदरलेला हा प्रसंग तिला अंधारात लोटतो. खरंतर सगळं कसं जुळून आलेलं असतं, उद्याचा सूर्य आपल्या जीवनात एक नवीन पहाट आणेल, या स्वप्नरंजनात असलेल्या अनायनाला हा धक्का अजिबात सहन होत नाही. परंतु या वेळेला तिच्या मदतीला धावून येतो, तोच ‘पॅडी’ तिला एक नवीन आयुष्य घडवून देतो. उजवा हात गमावल्यामुळे फलंदाजी तर शक्यच नव्हती. म्हणून ‘पॅडी’ तिला डाव्या हाताने गोलंदाजीचं तंत्र शिकवतो. केवळ डाव्या हाताने गोलंदाजी करून पुनश्च भारतीय महिला संघात स्थान मिळवण्यात अनायना यशस्वी होते. हा तिचा एकुणात प्रवास म्हणजेच ‘घूमर’.

आव्हाने
एकतर क्रिकेट या खेळावर आधारित हा चित्रपट आणि क्रिकेटचे सर्व बारकावे समस्त भारतीयांना माहिती असल्याने क्रिकेटच्या तांत्रिक बाबी अचूकपणे मांडणे क्रमप्राप्त होते. एका हाताने गोलंदाजी करणं, ही कल्पनाच भन्नाट आहे. कारण गोलंदाजी करतांना दोन्ही हातांचा वापर हा जास्त फायदेशीर ठरतो. एका उत्तम फलंदाजाला उजवा हात गमावल्यानंतर एक गोलंदाज म्हणून तयार करणं, हेच मोठं जिकिरीचं काम. शिवाय त्यात एक हात नसल्यामुळे शारीरिक कसरती खूप कराव्या लागतात. ज्यामध्ये ‘चेंडूवरची पकड, वेग आणि फेक’ याचं एकुणात तंत्र ‘पॅडी’ अनायनाला स्टेप बाय स्टेप शिकवतो आणि ती सुद्धा मन लाऊन शिकते. यातील एकुणात तंत्रज्ञान आणि चित्रीकरण दिग्दर्शकाने अतिशय परिणामकारक सादर केलं आहे. ‘पॅडी’ हा निश्चितपणे एक उत्तम गोलंदाज असतो. परंतु अनायनाला गोलंदाज म्हणून तयार करतांना तिच्या शारीरिक अडचणी सुरुवातीला त्याच्या लक्षात येत नाहीत. परंतु मग मात्र तोच तिला मानसिक आणि शारीरिक दोन्ही आघाड्यांवर मात करण्याचं तंत्र वेगवेळ्या पद्धतीने शिकवतो.

पात्रांची स्वभाव वैशिष्ठ्ये
अनायना ही मुळात जिद्दी आणि महत्वाकांक्षी असली तरीही मनाने हळवी आहे. तिच्या घरच्यांना तिच्या एकुणात जडणघडणीची पूर्ण कल्पना असल्याने ‘आजी, वडील,भाऊ आणि प्रियकर’ सर्वांची भरभक्कम साथ तिला लाभली आहे. तिच्या तुलनेत पॅडी हा तसा सडाफटिंगच आहे.  रसिका ही त्याची मानलेली बहिण. तिने लिंगबदल करवून स्त्रीत्व पत्करलेलं असतं. दोघांचीही मानसिकता ही अत्यंत टोकाची आणि वेगवेगळी असते. त्यामुळे अनायनाला केवळ एकच हात असूनही ‘गोलंदाज’ बनवण्याची जबाबदारी स्वीकारलेल्या ‘पॅडी’ ला वडिलकीच्या नात्याने अनेक दृष्टीकोनातून अनायनाला सांभाळून घ्यावं लागतं. अनायनाची ‘शारीरिक आणि मानसिक’ तयारी करून घेतांनाच नवीन तंत्र शिकावायचं, हे फार मोठं ‘चॅलेंज’ दोघांनीही स्वीकारलेलं असतं. अनायनाला एक यशस्वी गोलंदाज म्हणून नाव कमवायचं असेल तर केवळ नवीन तंत्र अवगत करणं पुरेसं नसून, क्रिकेट विश्वातील भल्याभल्यांना विचार करायला लागेल असं तंत्रज्ञान, कौशल्य आणि जादू’ आत्मसात करावी लागेल, याची जाणीव ‘पॅडी’ला प्रकर्षाने जाणवते. त्यासाठी त्याचा एकुणात अप्रोच हा कठोर भासतो. या प्रक्रीयेदरम्यान या दोघांचा ‘सहप्रवास’ हाच या चित्रपटाचा महत्वपूर्ण  भाग ठरतो.

दिग्दर्शकीय करामत
दिग्दर्शक आर.बाल्की यांनी कथानकाच्या गरजेनुसार पात्रांची केलेली निवड एकदम सुयोग्य. ‘पॅडी’च्या भूमिकेसाठी ‘अभिषेक बच्चन’ला निवडून अर्धीअधिक लढाई जिंकली आहे. अभिषेकची ‘उंची, शरीरयष्टी आणि देहबोली’ एखाद्या क्रिकेटरला शोभेल अशीच आहे. शिवाय त्याने या भुमिकेसाठी एक वेगळाच सूर लावला आहे. ज्यामुळे एक ध्येय्यवादी आणि कठोर प्रशिक्षक साकार करण्यात अभिषेकला यश आलं आहे. अनायनाच्या भूमिकेसाठी ‘सैय्यामी खेर’ हिची केलेली निवड तिने सार्थ ठरवली आहे. क्रिकेटरची देहयष्टी, देहबोली आणि रिफ्लेक्सेस यामुळे ती शोभली आहे. आपलं व्यक्तिमत्व, अभिनय आणि क्रिकेटचा खेळ’ या सर्व आघाड्यावर तिने बाजी मारली असून या पात्राला जिवंत केलं आहे. यांच्या सोबतीला ‘शबाना आझमी, अंगद बेदी, संदेश कुलकर्णी आणि शेवटच्या काही दृश्यात अभिताभ बच्चन’ याचा समावेश करून दिग्दर्शकाने सिनेमाची सेलेब्लीटी निश्चितपणे वाढवली आहे. ही सगळी मंडळी उत्तम अभिनेते आहेत आणि त्यांनी रंगवलेली पात्रे कथानकाला पूरकच ठरतात.

सारांश
सकस कथानक, दमदार पात्रे आणि सक्षम कलाकार मंडळी असूनही या चित्रपटाचं कथानक केवळ दोनच पात्रांभोवती फिरतं. यातील बरेच प्रसंग कथानकासाठी घडवून आणल्यासारखे स्पष्टपणे जाणवतात. उदा. आजीचं खेळाचं वेड आणि त्यातली गती सतत जाणवत रहाते. परंतु त्यामागचं कारण काही लक्षातच येत नाही.‘पॅडी’आणि रसिका यांच्यामधील बंध, त्यामागचं कारण काही म्हणजे काहीच थांगपत्ता लागत नाही. क्रिकेट समितीने अनायनाचा सहजपणे केलेला स्वीकार, पचनी पडत नाही. या सगळ्या बाबी तिच्या कठोर मेहनतीच्या तुलनेत फिक्या वाटतात. तरी परंतु केवळ अभिनयाच्या आनंदासाठी हा चित्रपट किमान एकदा तरी बघायलाच हवा!

एनसी देशपांडे
९४०३४ ९९६५४

N C Deshpande
एनसी देशपांडे

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!