दशक चौथे,समास आठवा,सख्य भक्ती
मागे आपण सातवे भक्तीचे लक्षण पाहिले आता आठवी भक्ती सावधानपणे ऐका. देवाशी परम सख्य करावे, देवाला प्रीतीने बांधावे हे या भक्तीचे लक्षण आहे. देवावर अत्यंत प्रीत्ती असते त्यामुळे कायम देवाच्या सोबत राहतो त्याला देवाचा नित्य संहवास प्राप्त होतो. भक्तिभावाने भजन निरूपण आणि कथा कीर्तन, प्रेमळ भक्तांचे गायन देवाला आवडते. आपणही तसेच वर्तन करावं. आपल्यालाही ते आवडावं. आपल्या मनाला आवडू लागले तर देवाची सख्य भक्ती घडते. देवाच्या भक्तीसाठी स्वतःच्या सुखावर पाणी सोडावे, अनन्यभावाने जीव, प्राण, शरीर देखील अर्पण करावे.
संसारातील व्यथा दूर ठेवाव्या आणि देवाची चिंता करावी. निरूपण, कीर्तन, कथा, वार्ता देवाच्याच सांगाव्या. देवाच्या सख्यत्वासाठी जिवलग लोकांचा वियोग झाला तरी चालेल. सर्व अर्पण करावे सर्वात शेवटी प्राण देखील परमेश्वराला अर्पण करावा. आपलं सगळंच गेलं तरी चालेल पण देवाचे सख्य हवे. अशा प्रकारची सख्य भक्ती आहे. देव म्हणजे आपला प्राणाचा वियोग सहन होणार नाही हे परमप्रीतीचे लक्षण आहे. असं जेव्हा भक्त करतो तेव्हा देवाला भक्तांची चिंता वाटते. लाक्षागृहांमध्ये पांडव जळत होते परंतु त्यांना विवराद्वारे देवाने बाहेर काढले. आपण जसे बोलावे तसाच आपल्याला प्रतिसाद मिळतो म्हणून आपण देखील अनन्यभक्ती ठेवली तर देव तात्काळ आपल्यासाठी धावून येतो. आपण त्रास घेतला तर देवही आपल्यासाठी त्रास घेतो.
ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्याहम
जस ज्याचे भजन तसा देवही त्याचा म्हणून हे आपल्यापाशीच सगळं आहे. एखादी गोष्ट आपल्या मनासारखी घडली नाही त्यामुळे आपली निष्ठा सोडली तरी ती गोष्ट आपल्याकडेच येते. मेघ चातका वर कृपा करीत नाही तरीही चातक पक्षी त्याच्या जीवनात बदल करतो का? चंद्र वेळेस उगवला नाही तरी चकोर दुसरा उपाय शोधतो का? असं सख्य असाव. विवेकाने धैर्य धरावे. भगवंतावरची प्रीती सोडू नये. देवाला सखा मानावं. माता, पिता, नातेवाईक, विद्या, लक्ष्मी, धन, वित्त सर्व परमात्मा आहे. लोक देवाशिवाय काही नाही असे सांगतात मात्र त्यांची निष्ठा काही वेगळीच असते म्हणून तसं करायचं नाही खरोखर सख्य करावं.
परमेश्वराला मनामध्ये पक्के धरावे.आपल्या इच्छेसाठी देवावर राग करणे हे सख्य भक्तीचे लक्षण नाही. देवाचे मनोगत तेच आपले मनोगत.आपल्या इच्छेसाठी भगवंतापासून दूर होऊ नये. देवाच्या इच्छेने वागायचे. देव करील ते प्रमाण मानायचे. मग सहजपणे देव कृपा करतो. देवाच्या कृपेपुढे मातेची कृपा कितीशी? वाईट काळ आला तर माता देखील बालकाला मारू शकते. मात्र देवाने भक्ताला मारले असे कधी ऐकण्यात आले आहे का? शरणागतास देव संरक्षक आहे. देव भक्तांचा कैवारी आहे. देव पतीताना तारणारा आहे.देव अनाथांचा पक्ष घेणार आहे नाना संकटांपासून रक्षण करणारा आहे.
गजेंद्रसाठी देव धावला होता,देव कृपेचा सागर आहे, देव करुणेचा साठा आहे.देवाला कधीही भक्ताचा विसर पडणार नाही.देवाची प्रीती करणे जाणतो.देवाशी मैत्री करावी.ऐन वेळी आपले जिवलग जरी असले तरी ते कामाला येत नाही,देव येतो. देवाचे सख्य कमी होत नाही. देवाची प्रीती कमी होत नाही. देव शरणागताची निराशा कधी करत नाही.म्हणून नेहमी देवाशी मैत्री करावी. त्याला आपलं हितगुज सांगवे. हे आठव्या भक्तीचे लक्षण आहे.जसा देव तसा गुरु,असं शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे म्हणून सख्ख्यत्वाचा प्रकार सद्गुरुशी असावा.
इतिश्री दासबोधे गुरुशिष्यसंवादे सख्य भक्ती निरूपण नाम समास अष्टम समाप्त.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे

मोबाइल- ९४२०६९५१२७