टीका करायला नाही तर माफी मागण्यासाठी आलो आहे : शरद पवार 

येवल्याच्या सभेत शरद पवारांची नागरिकांना भावनिक साद 

0

येवला दि.८ जुलै २०२३ – (हरिभाऊ सोनवणे) येवल्यात पाणी-उद्योगधंद्यांचा प्रश्न गंभीर आहे.काही लोकांना आम्ही विश्वासावर हा मतदारसंघ दिला होता. एका काळात चुकीच्या गोष्टी घडल्या. आता चुकीच्या गोष्टी दुरुस्त करायला हव्यात. आता आमच्यावर अधिक जबाबदारी आहे.अशी खंत रा. काँग्रेसचे राष्ट्रिय अध्यक्ष शरद पवार यांनी येवला येथील सभेत व्यक्त केली.राज्यातील राजकीय घडामोडी नंतर ना.शरद पवार यांनी प्रथमच येवला येथे जाहीर सभा घेतली.ते पुढे म्हणाले,मी कधीही स्वाभिमान सोडणार नाही. काही लोक म्हणतात माझं वय झालं. वय ८३ असलं तरी गडी पाहिला? कुठेय, वयाचा उल्लेख केला तर महागात पडेल, असा इशारा शरद पवार यांनी दिला.

त्या बद्दल माफी…
शरद पवार यांनी येवल्याच्या नागरिकांची जाहीरपणे माफी मागितली. “आज मी या ठिकाणी टीका करायला नाही तर माफी मागण्यासाठी आलो आहे. मी माफी यासाठी मागतोय कारण माझा अंदाज कधी फारसा चुकत नाही. पण इथे माझा अंदाज  चुकला”, असं शरद पवार आपल्या भाषणात म्हणाले. आज बऱ्याच काळानंतर येवल्यात आलो आहे. येथे आमचे अनेक सहकारी होते. काही सहकाऱ्यांनी आमची साथ सोडली. राजकारणात अनेक चढ-उतार आले. अलीकडे आमच्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. अनेक वर्ष पुरोगामी विचारांना आम्ही साथ दिली. सामान्य जनतेने आमची साथ कधीही सोडली नाही. पवारांनी नाव दिले त्यांना जनतेने निवडून आणले. मी दिलेल्या नेत्याचे नाव कधीच चुकले नाही. माझ्या विचारावर निवडून आले. मात्र येवल्यात माझा अंदाज चुकला, असा टोला शरद पवारांनी छगन भुजबळांना लगावला.

ते पुढे म्हणाले की, मी इथे कुणावर टीका करायला आलो नाही. येवल्यात पाणी-उद्योगधंद्यांचा प्रश्न गंभीर आहे. काही लोकांना आम्ही विश्वासावर हा मतदारसंघ दिला होता. एका काळात चुकीच्या गोष्टी घडल्या. आता चुकीच्या गोष्टी दुरुस्त करायला हव्यात.आता आमच्यावर अधिक जबाबदारी आहे.

स्वाभिमान सोडणार नाही.मी कधीही स्वाभिमान सोडणार नाही. काही लोक म्हणता माझं वय झालं. वय ८३ असलं तरी गडी पाहिला कुठेय, वयाचा उल्लेख केला तर महागात पडेल, असा इशारा शरद पवार यांनी दिला.

पवार यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील चॅलेंज दिलं आहे. शरद पवार यांनी आज खूप कमी शब्दांत म्हणणं मांडलं. यावेळी त्यांनी येवल्याच्या नागरिकांना भावनिक साद घातली.

सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकारण करायचं. ही भूमिका घेऊन राजकारण करण्याचा विचार आम्ही सगळ्यांनी केला. आम्ही सगळ्यांनी एका मोठ्या नेत्याचं मार्गदर्शन घेतलं. या मतदारसंघाचा इतिहास हा मोठा आहे. स्वातंत्र्याच्या संघर्षामध्ये परकियांच्या विरुद्ध लढण्यासाठी तात्या टोपेंनी ऐतिहासिक काम केलं. त्यांची ही भूमी आहे. या भूमीतील लोकांवर अडचणी असतील, संकटे असतील, दुष्काळ असेल, पण ते स्वाभिमान कधी सोडणार नाहीत. या स्वाभिमानी लोकांना पुन्हा शक्ती देण्याची गरज आहे. त्यासाठी आज आम्हा लोकांना अधिक जबाबदारी घ्यावी लागेल”, असं शरद पवार म्हणाले.

“एक काळ असा होता की त्या काळात चुकीच्या काही गोष्टी घडल्या असतील तर त्या दुरुस्त केल्या पाहिजेत. मध्यंतरी दहा-बारा दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केलं. त्या भाषणात त्यांनी काँग्रेसवर आरोप केले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरही आरोप केले”,असं पवार म्हणाले.

मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून सांगतो, त्यांनी जे आरोप केले ते वेगवेगळ्या प्रकारचे असतील, त्या आरोपांमध्ये त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले, माझं जाहीरपणे पंतप्रधानांना सांगणं आहे, आमच्यापैकी कुणी भ्रष्टाचारात सहभागी झाला असं तुम्हाला वाटत असेल तर तुमची असेल नसेल तेवढी सगळी सत्ता वापरा. तपास करा. सखोल चौकशी करा आणि ज्याने भ्रष्टाचार केलाय असं निष्पन्न झालं तर त्याला पाहिजे ती शिक्षा द्या. त्यासाठी आम्हा सगळ्यांचा तुम्हाला पाठिंबा राहील”,  असं चॅलेंज शरद पवारांनी दिलं.राजकारणात अनेक चढउतार आले. राजकारणात अनेक संकट येतात. पण अनेक संकटात लोकांनी माझी साथ सोडली नाही”, असंदेखील शरद पवार यावेळी म्हणाले.

कांद्याचा वांधा:सुप्रिया सुळे 
माझं केंद्र सरकार आणि भाजपसोबत कांद्याच्या भावावरुन भांडण झालं आहे. जगात कांदा कमी आहे आणि भारतात जास्त कांदा पिकला. मी पार्लमेंटमध्ये आणि ट्विटरच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना पन्नास  वेळा सांगितलं की परदेशात कांदा जाऊद्या. पण भाजपने ते जाऊ दिलं नाही. शेतकऱ्यांचं भाव न मिळाल्याने कंबरडं मोडलं असेल तर भाजप जबाबदार आहे. शहरात टमाटरला भाव किती आहे माहिती आहे का? तुम्हाला भाव देत नाही तिकडे शहरात सर्वसामान्यांना परवत नाही. मग मधला पैसा जातो कुठे?”, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.

“मी तुम्हाला दुधाचं उदाहरण देते. परदेशातून दूध येणार होतं पण शरद पवार यांनी विरोध केल्यानंतर सरकारने परदेशातून दूध घेणार नाही, असा निर्णय घेतला”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. “आज ते गेले आहेत सगळे भाजपमध्ये, त्यांचा तो अधिकार आहे. आज महागाईची काय परिस्थिती आहे. सिलेंडरचा भाव परवडतोय का? राष्ट्रवादीचं सरकार असताना सिलेंडरचा भाव ३५० रुपये इतका होता”, असंही सुळे म्हणाल्या.

येवल्यात गेल्या १५ वर्षात किती नव्या फॅक्ट्री आल्या का? मी तुम्हाला शब्द देते. शरद पवार यांचा विचारांचा आणि निष्ठा ठेवेल, त्यांच्या चौकटीतील शाहू, फुले, आंबेडकर, छत्रपतींचा विचार करेल, असा आमदार निवडून द्या. तुमच्या कांद्याला भाव देऊ. तसेच इंडस्ट्रीसुद्धा आणू”, असं मोठं वचन सुप्रिया सुळे यांनी दिलं.“आमच्या आमदारांना निवडून आणलं तर मांझरपाडाचा कॅनलचा प्रश्न आम्ही पूर्ण करणार म्हणजे करणार”, असं तिसरं वचन सुप्रिया सुळे यांनी येवल्याच्या नागरिकांना दिलं.

‘जो डर गया वह मर गया’“सर्वसामान्य मायबाप प्रत्येकजण सांगत आहेत की, ताई तू लढ, घाबरु नको. अरे मी घाबरतच नाही. घाबरत असते तर गेले नसते का? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. शोले बघितलाय ना? जो डर गया वह मर गया. मला एकाने विचारलं असं कसं झालं? तुम्हाला आईसचा अर्थ समजतो का? बर्फ, त्याची स्पेलिंग म्हणजे ICE, इनकम टॅक्स, ईडी, आणि सीबीआय. जो विरोध करेल तेव्हा त्याची चौकशी. विरोध करणाऱ्याला सोबत घ्यायचं आणि वॉशिंग पावडरमध्ये टाकून धुवून काढायचं”, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

‘महाराष्ट्र दिल्लीसमोर कधी झुकला नाही’
“महाराष्ट्र दिल्लीसमोर कधी झुकला नाही आणि झुकणार नाही. मला  पत्रकारांनी विचारलं की, तुमच्यावर असे आरोप होत आहेत. मी इतके वर्ष काम करतेय. फक्त लोकसभेची एक जागा मिळाली. माझा विचारांशी निष्ठा आहे. मी पद मागितलं नाही. पदं येतात जातात. केंद्रात ७० मंत्री आहेत. देशाच्या शेती मंत्र्यांचं नाव काय?”, असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.

एक षडयंत्र महाराष्ट्राच्या विरोधात सुरु आहे.बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष सोडला, आज शरद पवार यांचा पक्ष फोडला. शरद पवार यांच्याविरोधात षडयंत्र सुरु आहे. महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्याचं षडयंत्र आहे. महाराष्ट्रातील सर्व विकास प्रकल्प दुसरं राज्यात पाठवत आहेत. हे सगळं षडयंत्र दिल्लीचा अदृश्य हात करतोय. पण आम्ही घाबरत नाही. २४ तास काम करु. तुम्हाला न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. मी कुणावरही विरोधात बोलणार नाही. कारण माझ्यावर मराठी संस्कार आहेत”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!