नाशिक,दि,१३ मार्च २०२४ –नाशिकच्या राजकीय क्षेत्रातून मोठी बातमी समोर येत असून नाशिक लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडी करून स्वामी शांतीगिरी महाराज निवडणूक लढवणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकरांसोबत महाराजांच्या भक्त परिवाराची चर्चा झाल्याचे समजते आहे.
शांतीगिरी महाराज हे महायुतीकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते.त्यासाठी त्यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेटही घेतली होती.मात्र, कालच शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी केल्याने शांतिगिरी महाराज नाराज झाले आहेत. शांतिगिरी महाराजांकडून महाविकास आघाडीचा पर्याय शोधला जात आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीकडून शांतिगिरी महाराजांना उमेदवारी दिली जाते का? हे पाहणं महत्वाचे असणार आहे.
हेमंत गोडसेंच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष
हेमंत गोडसेंच्या नावाची श्रीकांत शिंदे यांच्याकडून घोषणा होताच गोडसे समर्थकांकडून रात्री उशिरापर्यंत जल्लोष साजरा करण्यात आला.जोरदार घोषणाबाजी करत पुष्पगुच्छ देत गोडसेंचा सत्कार करण्यात केला गेला. यावेळी त्यांच्या समर्थकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच, आता कामाला लागा अशा सूचना देखील कार्यकर्त्यांना देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.