मुंबई,२ सप्टेंबर २०२२- आज भारतीय नौदलाला एक नवीन चिन्ह म्हणजेच बोधचिन्ह मिळाले आहे. त्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यादरम्यान पंतप्रधानांनी देशाची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका INS विक्रांत नौदलाला समर्पित केली. एकूणच, आजचा दिवस भारतीय नौदलासाठी मोठ्या बदलाचा दिवस आहे. सागरी सुरक्षा आणि नौदलाची प्रथम निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या दूरदृष्टीने केली होती, याचाच उल्लेख आणि स्मरण करत नौदलाचा नवा झेंडा छत्रपती शिवरायांना समर्पित करण्याची घोषणा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. शिवरायांपासूनच प्रेरणा घेत नौदलाच्या झेंड्यावरुन सेंट जॉर्जेस क्रॉस हटवून आता त्याजागी तिरंगा आणि नौदलाचं बोधचिन्ह दिसणार आहे”, असं सांगतानाच पंतप्रधान मोदींनी छत्रपती शिवरायांचा उल्लेख नौदलाचे प्रणेते असा केला.
तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेल्या भारतासारख्या देशात १७ व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी नौदल सामर्थ्यावर दिलेला भर हा या संरक्षण रणनीतीचा पाया होता. यामुळेच छत्रपती शिवाजींना आधुनिक नौदलाचे जनक म्हणून संबोधले जाते.नौदलाच्या आधीच्या ध्वजावर पूर्वीच्या दोन लाल रेषा होत्या. त्या लाल रेषा आता काढून टाकण्यात आल्या आहेत. त्यांना सेंट जॉर्जेस क्रॉस म्हटलं जायचं. ज्या ब्रिटिशांच्या राजवटीपासून तशाच राहिल्याचं सांगितलं जातं. आता मात्र नव्या झेंड्यावर एका बाजूला भारताचा तिरंगा दिसणार आहे, तर त्याच्या बाजूला नौदलाचं बोधचिन्ह असणार आहे.
कोकण किनार्यावर ब्रिटिश, पोर्तुगीज आणि डच यांचाही प्रभाव होता आणि नौदलाला आर्थिक प्रोत्साहनाऐवजी राजकीय प्रोत्साहन होतं. परकीय आक्रमकांना रोखण्यासाठी आणि मायदेशातून शत्रूंचा पाडाव करण्यासाठी नौदल आवश्यक होते. त्यामुळेच मराठा नौदलाची स्थापना झाली. स्वराज्य आणि मराठा सम्राज्याचा विस्तार होत असताना शिवरायांनी सागरी सीमांचं रक्षण करण्यासाठी शक्तीशाली आरमार उभं केलं.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नौदलात त्यावेळी ५ हजार सैनिक होते. एकदा मराठ्यांनी कोकणात प्रवेश केल्यावर त्यांची थेट लढाई युरोपीयांशी, प्रामुख्याने पोर्तुगीजांशी झाली. पण तरीही छत्रपती शिवाजींनी कान्होजी आंग्रे यांच्या मदतीने पोर्तुगीजांविरुद्ध केलेल्या शूर मोहिमेने सागरी लढाईत देखील आपलं कौशल्य दाखवून दिलं.
आयएनएस विक्रांतचे जलावतरण हे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
संपूर्ण भारतीय बनावटीची विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतचे जलावतरण हे भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयएनएस विक्रांतचे जलावतरण आणि नौसेनेला नवीन ध्वज प्रदान सोहळ्याचे स्वागत आणि भारतीय नौदलाचे अभिनंदन केले आहे.
मुख्यमंत्री या संदेशात म्हणतात, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विक्रांत युद्धनौका आणि भारतीय नौदलास नवीन ध्वज प्रदान करणे हा भारतीय संरक्षण क्षेत्रातील ऐतिहासिक आणि स्वर्णीम असा क्षण आहे. थल-जल आणि आकाश या तिन्ही आघाड्यांवर भारतीय लष्कराचे सामर्थ्य आणखी दुणावले आहे. बलशाली, आत्मनिर्भर भारतासाठी हे महत्वपूर्ण पाऊल आहे. त्यासाठी भारतीय सेनेच्या सर्व दलांचे अभिनंदन आणि भारतमातेच्या रक्षणासाठी छातीचा कोट करून उभ्या ठाकलेल्या सर्व शूरवीरांना मानाचा मुजरा आणि शुभेच्छा मुख्यमंत्री शिंदे यांनी संदेशाद्वारे दिल्या आहेत.