‘सही रे सही’ची खास नोंद गिनीज बूकमध्ये व्हावी – ना.नितीन गडकरी
नागपूर येथे ४४०० व्या प्रयोगाला रसिकांची अलोट गर्दी
नागपूर,दि.३१ डिसेंबर २०२३-सही रे सही नाटकाचे हजारो प्रयोग व्हावेत आणि गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या नाटकाची खास नोंद व्हावी,असे गौरावोद्गार केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी काढले.
भरत जाधव यांची प्रमुख भूमिका असलेल्या सही रे सही या नाटकाचा ४४०० वा प्रयोग नागपूर येथील वसंतराव देशपांडे सभागृहात रसिकांच्या अलोट गर्दीत संपन्न झाला.त्यावेळी आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ना.गडकरी बोलत होते.
महाराष्ट्रातील दर्दी आणि चोखंदळ रसिकांमुळेच नाटक, लोककला,लावणी,तमाशा,संगीत आदी कला आजही टिकून आहेत.या कला या पुढेही अशाच टिकून राहाव्यात असे वाटत असेल तर महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्ह्यात 1000 प्रेक्षक क्षमतेचे नाट्यगृह उभारावे आणि आणि किमान एक हजार रुपये भाड्याने ते उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.वृत्तपत्र व अन्य प्रसार माध्यमांनी नाटक व लोककलांच्या जाहिराती नाममात्र दराने प्रसिद्ध कराव्यात.तसेच खर्चात बचत व्हावी असे वाटत असेल तर नाट्य निर्मात्यांनी डिझेल अथवा पेट्रोलवर चालणाऱ्या बसेसएवजी इलेक्ट्रिकल बसेसची कास धरणे गरजेचे आहे,असेही ना.गडकरी पुढे म्हणाले.गडकरी यांनी आपल्या भाषणात भरत जाधव यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. आजच्या तणावपूर्ण वातावरणात प्रेक्षकांना खळखळून हसविण्याचे तसेच त्यांना तणावापासून दूर नेण्याचे कार्य भरत जाधव सही रे सही या नाटकाच्या माध्यमातून करीत आहेत ही बाब निश्चितच वाखाण्याजोगी आहे,असेही गडकरी यांनी आपल्या भाषणात सांगितले.
पूर्वी आम्ही एक नाटक झाल्यानंतर दुसरा नाटकाचा प्रयोग असेल तर त्यासाठी अडीचशे किलोमीटर पर्यंतचे अंतर निश्चित करायचो. कारण तेथे पोहोचण्यास भरपूर वेळ लागायचा.परंतु ना.गडकरी यांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभर रस्त्यांचे व्यापक जाळे विणल्याने आता आम्ही दुसरा प्रयोग पाचशे ते सातशे किलोमीटरपर्यंत असेल तरी त्यासाठी जाऊ शकतो.कारण तेथे पोहोचणे चांगल्या रस्त्यांमुळे सहज शक्य होते.ना. गडकरी यांनीही किमया करून दाखविल्यामुळे केवळ भारतीयांनाच नव्हे तर जगभरातील सर्वांनाच त्यांचा अभिमान वाटतो,अशा शब्दात भरत जाधव यांनी ना.गडकरी यांच्या कार्याचे कौतुक केले.कार्यसम्राट आणि हास्यसम्राट एकाच मांचावर एकत्र आले हा एक प्रकारे दुग्धशर्करा योगच आहे,असे जयंत जातेगावकर यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. एकेकाळी प्रभाकर पणशीकर हे गावोगावी फिरून नाट्यकलेचा प्रचार आणि प्रसार करीत असत. आज सही रे सही या नाटकाच्या निमित्ताने भरत जाधव यांचे नाव सुद्धा राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे.
तमाम रसिकांना त्यांचा सार्थ अभिमान वाटतो.नाट्य व्यवसाय तोट्यात असतो असे गडकरी यांनी आपल्या भाषणात सांगितले असले तरी विदर्भातील नाट्यरसिकांनी नाट्यकलेवर भरभरून प्रेम केल्याची आठवण करून देत 1976 पासून मी नाट्य व्यवसायात आहे मात्र विदर्भात एकाही नाटकाचा प्रयोग तोट्यात गेला नाही असे जातेगावकर यांनी निदर्शनास आणताच टाळ्यांचा एकच कडकडाट झाला होता.2002मध्ये या नाटकाचा पहिला प्रयोग झाला आणि पहिल्या वर्षातच त्याचे 565 प्रयोग झालेत आणि 22 वर्षात 4400वा प्रयोग ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे,असेही जातेगावकर पुढे म्हणाले.यावेळी ना.गडकरी आणि सौ कांचनताई गडकरी यांच्या हस्ते सही रे सही नाटकाच्या कलावंतांचा सत्कार करण्यात आला.
या नाटकाचा प्रयोग 1 जानेवारी रात्री 9:30 वाजता छत्रपती संभाजी राजे नाट्य मंदिर, जळगाव येथे तसेच 2 जानेवारी रात्री 9:30 कालिदास कलामंदिर नाशिक येथे होत आहे.