भावार्थ दासबोध – भाग १५४

निरुपण : पद्माकर देशपांडे

0

दशक अकरा समास २ चत्वार देव निरूपण नाम समास 
जय जय रघुवीर समर्थ. एक निश्चल, एक चंचल, चंचलामध्ये सगळे गुंतलेले आहेत पण निश्चल मात्र जसेच्या तसे आहे. निश्चयाचा विचार पाहतो तो लाखात एक असतो. निश्चला सारखा निश्चयात्मक तो निश्चलच असतो. लोक निश्चळाच्या गोष्टी सांगतात आणि पुन्हा चंचलाकडे धावतात चंचलाच्या चक्रामध्ये न जाता बाहेर येतात असे थोडेच आहेत. चंचलामुळे चंचल जन्मले, चंचलामध्येच वाढले आणि जन्मभर सगळे चंचलच मनावरती बिंबले. सर्वसृष्टी चंचलाकडे धावते, सगळे करणे असते ते चंचलपणाने घडते, चंचल सोडून निश्चलाचे पोवाडे गातो असं कसं होईल? चंचल काही निश्चल होत नाही, निश्चल कधीही चळत नाही, लोकांना नित्य-अनित्य  विवेक नसल्याने काही समजत नाही. काही उमजलं तरी उमजत नाही समजलं तरी समजत नाही..  कधीकधी थोडं फार समजत, तरी समजत नाही. संदेह, अनुमान आणि भ्रम असा चंचलामध्ये श्रम होतात.

निश्चलामध्ये तसे श्रम होत नाही, त्याचे गुपित समजले पाहिजे. जे सर्व चंचल आहे ती सगळी माया आहे माया ही नष्ट होणारी आहे तिथे लहान थोर म्हणायचं काहीच कारण नाही. सगळी माया विस्तारली, अष्टधा प्रकृती फोफावली, नाना रुपे घेऊन चित्र विकारले. नाना उत्पत्ती, नाना विकार, नाना लहानथोर प्राणी, नाना प्रकार, नाना रूपे.  विकारवंत विकारले, सूक्ष्म होते ते जड झाले आणि काहीच्या बाही अमर्याद दिसायला लागले. मग नाना शरीरे निर्माण झाली. नाना नामाभिधाने ठेवली भाषेनुसार ती काही काही घेतली जाऊ लागली. मग नाना रीती, नाना दंडक,  एकापेक्षा एक नाना आचार विचार तयार झाले. सगळे लोक काही परंपरा घेऊन जगायला लागले. अष्टधा प्रकृतीची लहान मोठी शरीरं निर्माण झाली. पुढे आपापल्या प्रकाराने ती वर्तन करायला लागली.

नाना मते निर्माण झाली. नाना पाखंड वाढली. नाना बंडे उठली. जसा रुढीचा प्रवाह निर्माण झाला तसे लोक चालायला लागले. कोण कोणाशी कसे वागेल सांगता येत नाही. पृथ्वीवर सगळा गोंधळ झाला. एकापेक्षा एक मोठा. कोण खरा आणि कोण खोटा? कोण जाणणार? नाना प्रकारचा आचार निर्माण झाला. पोटासाठी कित्येक त्यात बुडाले. दंभ, अभिमान वाढला. उदंड देव झाले. देवांचे बंड माजले. भुतादेवतांचे थोतांड बळावले. मुख्य देव कळेना, कशाला काही मिळेना आणि कोणी कोणाचे ऐकेना. अशाप्रकारे विचार नासला. सारासार कोण पाहतो? लहान थोर कोण काही समजेना. शास्त्रांचा बाजार भरला. देवांचा गलबला झाला.

लोक कामनेच्या व्रतासाठी झुंबड करायला लागले. सगळे नासले, सत्य-असत्य हरपले, सगळे निर्नायक झाले. मता-मतांचा गलबला झाला. कोणी कोणाला विचारेना. ज्याच्या बुद्धीला जे काही सापडलं तेच त्याला थोर वाटायला लागलं. असंत्याच्या अभिमानामुळे लोकांचे पतन झाले म्हणून ज्ञानी माणसं सत्य शोधतात. सगळे लोक जे वागतात ते ज्ञात्या माणसाच्या हातचा मळ. म्हणून केवळ विवेकी लोकांनी ऐकावे.  लोक कोणत्या पंथाला जातात आणि कोणत्या देवास भजतात याची रोकडी प्रचिती सावधपणे ऐका. माती, धातू, पाषाण अशा अनेक प्रतिमा पूजणे हा अनेक लोकांचा रूढ मार्ग. नाना देवांचे अवतार त्यांचे चरित्र काही लोक ऐकतात. निरंतर जप ध्यान आणि पूजा करतात अशी माहिती समर्थ देत आहेत. पुढील माहिती ऐकूया पुढील भागात.जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः) 
निरुपण : पद्माकर देशपांडे

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!