दशक सातवे समास ९ श्रवण निरूपण
जय जय रघुवीर समर्थ. परमार्थी माणसाला परमार्थ हवा असतो, स्वार्थी माणसाला स्वार्थ हवा असतो,कंजूष माणसाला मनापासून पैसा हवा असतो. योगी लोकांना योग पाहिजे, भोगी लोकांना भोग पाहिजे, रोगी लोकांना रोग पाहिजे. कवीला काव्य पाहिजे, तार्किक व्यक्तीला तर्कवाद पाहिजे तर भाविकाला सुखसंवाद गोड वाटतो. पंडिताला व्युत्पत्ती-भाषाशास्त्र आवडते, विद्वानाला अध्ययन प्रीति असते, कलावंताला नाना कला आवडतात. हरिदासाला कीर्तन आवडते, शुश्चीष्मंत व्यक्तीला संध्या स्नान आवडते तर कर्मनिष्ठ व्यक्तीला कर्मकांड पाहिजे असते.
प्रेमळाला करुणा, तर विचक्षण व्यक्तीला दक्षता हवी असते. शहाणा माणूस चातुर्याकडे आदराने पाहतो. भक्ताला मूर्तीचे ध्यान करायला आवडते, संगीतकाराला तालाचे ज्ञान आवडते, रागाचे ज्ञान असलेल्याला गायनातील विविध स्वर उच्चार आवडतात. योगाभ्यासीला पिंड ज्ञान, तत्वज्ञाला तत्वज्ञान, नाडी ज्ञात्याला विविध आजारांचे ज्ञान हवे असते. कामुक व्यक्तीला कोकशास्त्र, चेटूक करणाऱ्या व्यक्तीला चेटक मंत्र, यांत्रिक माणसाला नाना यंत्र पाहावेसे वाटतात. टवाळखोर लोकांना विनोद आवडतात, उन्मत्त लोकांना नाना छंद असतात आणि तामस व्यक्तींना अमर्याद मस्ती, प्रमाद गोड वाटतात.
मूर्ख लोक नादावर लुब्ध होतात, निंदक लोक काय कमी आहे त्याची संधी शोधत असतात, पापी लोकांची पाप बुद्धी वेगळच काही पाहत असते. एखाद्याला रसाळ पाहिजे असते, एखाद्याला पाल्हाळ पाहिजे असते, तांत्रिक लोकांना तंत्र आवडतात, शूर लोकांना युद्ध पाहिजे असते तर काही लोकांना त्यांच्या इच्छेसारखे धर्म आवडतात. मुक्त लोक मुक्तलीला करतात. सर्वज्ञ लोक सर्व कला पाहतात. ज्योतिषी लोक भविष्य, पिंगळा यांचे वर्णन पाहतात. असं किती सांगायचं?
आवडीप्रमाणे लोक नाना पुस्तके ऐकतात, वाचतात. परंतु परत्र साधनेशिवाय जे श्रवण आहे त्याच्याशिवाय दुसरे श्रवण उपयोगाचे नाही. जिथे आत्मज्ञान नाही तेथे नुसती करमणूक, वेळ घालवणे आहे. गोडी नसताना गोडपणा, चांगले नाक नसेल तर त्याला सुलक्षण आणि ज्ञान नसेल तर त्याला निरूपण असे म्हणू नये. अशा अनेक गोष्टी सांगता येतील, म्हणून परमार्थ ग्रंथ ऐकावा परमार्थ ग्रंथाच्या शिवाय इतर सगळं ऐकणे हे व्यर्थ आहे. अशा तऱ्हेने नेहमी कसं वागावं
याच्याबद्दल सांगणारा, पैलपार पोहोचवणारा ग्रंथ असतो तोच ग्रंथ श्रेष्ठ होय. इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे श्रवण निरूपण नाम नवम समास समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.
दशक ७ समास १० देहान्त निरूपण
श्रीराम. खोटे तेच झाले खरे, खरे ते झाले खोटे,असं मायावी प्रेमाचं कृत्य आहे.ब्रह्मस्वरूप कळण्यासाठी विविध रुपं बोलली, तरी मनावरील असत्याचे धरणे उठत नाही. मनावर असत्य बिम्बले आहे ते न सांगता दृढ झाले आणि सत्य असूनही ते जिथल्या तिथे हरपले. वेदशास्त्र, पुराणे सांगतात, सत्याचा धांडोळा देतात, तरीसुद्धा सत्य स्वरूप असलेली आत्मप्रचिती येत नाही. ही सत्य असून देखील तिला मायेने आच्छादन घातले आहे.
मिथ्या नसून सुद्धा सत्य झालेले आहे असं विपरीत वर्तन दिसते, ही मायेची करणी आहे.ही मायेची करणी संतसंगाच्या निरूपणाचा विचार केला तेव्हा समजली.मागे आपण ऐकलेल्या निरुपणातून परमार्थाची खुण अंगी बाणली. त्यामुळे चित्त चैतन्याचा विचारासाठी प्रवृत्त झाले व समाधान झाले आणि आपण वस्तू स्वतःला स्वरूप आहोत हे ओळखले. बोधामुळे संदेह फिटला, देह प्रारब्धावर विसंबित केला, आता आपण राहो किंवा जावो.
शरीर मिथ्या आहे,या विचाराने ज्ञानी लोकाना जिवंतपणीच ते विकाररहित, जड, मेल्यासारखे वाटते.असे हे मिथ्या शरीर जेथे पडेल तीच पुण्यभूमी. साधूच्या दर्शनामुळे मन पवित्र होते त्यामुळे त्याचे चित्त पवित्र होते, त्याचे मनोरथ पूर्ण होतात. साधू नसती तर त्या पुण्यक्षेत्राचे जीवन व्यर्थ आहे. पुण्यक्षेत्री, नदीच्या तीरावर शरीर पडावे हा इतर लोकांचा विचार आहे. साधू मात्र नित्यमुक्त असतो. असं समर्थ सांगत आहेत.आता पुढील कथा ऐकूया पुढील भागात. जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे

मोबाइल- ९४२०६९५१२७