भावार्थ दासबोध -भाग १४४

निरुपण : पद्माकर देशपांडे

0

दशक दहा समास ४ बीजलक्षणाम समास 
जय जय रघुवीर समर्थ. ब्रह्म ही कल्पना केली तरी तो शब्द वाया गेला कारण आत्मा हा निर्गुण आणि शब्दातीत आहे. आत्मा निर्गुण वस्तू, ब्रह्म नाममात्र तितकाच भ्रम. कल्पना करून संभ्रम केला तरी त्याचे अर्थ लागणार नाहीत. तरी आग्रह केला तर आकाशाला दगड मारल्यासारखं होईल. आकाशाला मारलं तरी ते काही तुटणार नाही. तसं ब्रह्म निर्विकार आहे. निर्विकाराला विकार लावले जात नाहीत, विकार नष्ट होतात निर्विकार जसच्या तसं राहतं. आता अनुभव ऐका मग निश्चय करा, तर अनुभवाचाच जय होईल.

माया-ब्रह्मामध्ये असलेला समीर, त्यामध्ये जाणणारा तो ईश्वर, ईश्वर आणि सर्वेश्वर त्यालाच म्हणतात. त्या ईश्वराने गुणस्वरूप धारण केले. त्याच्यामध्ये ती त्रिगुण भेद झाला आणि ब्रम्हा विष्णू महेश त्याच्यातून निर्माण झाले. सत्व, रज आणि तम हे त्रिगुण मागे सांगितले, त्याचा क्रम सांगितलेला आहे.  विष्णू जाणता, जाणता नेणता असतो तो चतुरानन म्हणजे ब्रह्मदेव आणि नेणणारा असतो तो महेश. तो अत्यंत भोळा असतो. त्रिगुणात त्रिगुण कालवले, ते कसे वेगळे होतील? पण विशेष न्यून आहे ते बोलावे लागेल. वायूमध्ये विष्णू होता तो वायुरूप निराकारच होता. पुढे त्याने देह धारण करणारा चतुर्भुज झाला. त्याप्रमाणेच ब्रह्मा आणि महेश देह धारण करतात,  गुप्त आणि प्रकट होतात, हे करण्याला त्यांना काही वेळ लागत नाही.

आता याची रोकडे प्रचिती येते. माणसे गुप्त होतात प्रकटतात त्या देवाच्याच सामर्थ्यवंत मूर्ती आहेत. देवदेवता, भुते, दैवते यांचे सामर्थ्य वाढते आहे त्याचप्रमाणे सामर्थ्यवान राक्षस झोटिंग हे वायुस्वरूप आहेत. अकस्मात झोटिंग खूळ खूळ आवाज करीत चालतात, खोबरं खारका टाकून देतात. आपले अनुभव जसे असतात तसे आपण जाणतो. मनुष्य नाना शरीरे वेश धारण करतात, नाना प्रकारे परकायेमध्ये प्रवेश करतात, मग परमात्मा जगदीश का धरणार नाहीत? म्हणून वायु स्वरूपामध्ये देह धारण केले तेच ब्रह्मा विष्णू महेश  झाले. पुढे त्यांचा पुत्र पौत्रांमध्ये विस्तार झालेला आहे. मनामध्ये स्त्रियांची कल्पना केली ती कल्पना करताच त्या निर्माण झाल्या पण त्यांच्यापासून कधीही प्रजा निर्माण होत नाही. कल्पना करून पुत्र निर्माण केले ते प्रसंगी निर्माण झाले अशाप्रकारे हरिहर अवतरले.

पुढे ब्रम्ह्याने सृष्टी कल्पिली, त्याच्या इच्छेप्रमाणे सृष्टी झाली म्हणून ब्रह्मदेवाने जीवसृष्टी निर्माण केली असे म्हणतात. नाना प्रकारचे प्राणी कल्पिले, ते इच्छेसारखे निर्माण झाले. त्याच्यामध्ये अंडज, जारज सगळ्या जोड्या उदयास अळ्या. काही पाण्यातून निर्माण होतात त्यांना जलस्वेदज म्हणतात, काही वायूने निर्माण केले त्यांना उद्वीज म्हणतात. ते वृक्षाची जमीन फोडून उगविणारे असतात. माणसांची विद्या असते त्याला गौडविद्या म्हणतात, राक्षसांची असते ती वोडंबरी विद्या आणि ब्रम्ह्याची असते ती सृष्टीविद्या. काही प्रमाणात माणसांची, त्याच्यापेक्षा जास्ती राक्षसांची आणि त्याच्यापेक्षाही विशेष म्हणजे ब्रह्मयाची ही सृष्टी विद्या आहे.

ब्रह्म्याने अशाप्रकारे जाणते देणते प्राणी निर्माण केले. वेद सांगून मार्ग दाखविला. मग शरीरापासून शरीर निर्माण होत गेली, सृष्टी वाढत गेली, विकार वाढत गेले. अशाप्रकारे निर्माण झालेली शंका फिटली आहे. सगळी सृष्टी विस्तारली आहे आणि विचार पाहता तिचा अनुभव आलेला आहे. अशी सृष्टी निर्माण केली, पुढे विष्णूने तिचे प्रतिपालन केले हेही श्रोत्यांनी लक्षात घेतले पाहिजे.  सगळे प्राणी निर्माण झाले त्यांच्यामध्ये जाणीव ही मुख्य आहे. चतुर्भुजादि स्थूल रूपाने दैत्याचा संहार केला आहे. असे समर्थ सांगतात. पुढील कथा ऐकुया पुढील भागात. जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः) 
निरुपण : पद्माकर देशपांडे

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!