दशक दहा समास ४ बीजलक्षणाम समास
जय जय रघुवीर समर्थ. नाना अवतार धारण करणे, दृष्टांचा संहार करणे, धर्म स्थापन करणे याच्यासाठी विष्णूचा जन्म झाला. म्हणून धर्म स्थापना करणारे नर असतात ते विष्णूचे अवतार असतात. या बरोबर अभक्त हे दुर्जन, निशाचर असतात हे सहजपणे आपल्या लक्षात येतं. आता जे प्राणी जन्माला आले ते नकळतपणे संहारले गेले. नेणीवरुपाने, अज्ञानामुळे त्याचा संहार होत असतो.
संहारकाळात शरीरातील रुद्र खवळला तर तो जीवसृष्टीचा संहार करतो आणि सगळे ब्रह्मांड जळून जाते. अशा प्रकारे उत्पत्ती स्थिती संहार यांचा विचार आहे. श्रोत्यांनी तत्पर होऊन लक्ष द्यावे. कल्पान्त झाल्यावर संहार घडेल. ती माहिती पुढे सांगतो. पंचप्रलय ओळखेल तोच ज्ञानी. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे बीज लक्षण नाम समास चतुर्थ समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.
दशक दहा समास पाच पंचप्रलय निरूपण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. प्रलयाचे लक्षण ऐका. पिंडामध्ये दोन प्रलय असतात. एक निद्रा, एक देहांतकाळ किंवा मरण. देहधारकांमध्ये तीन मूर्ती ब्रह्मा विष्णू महेश असतात. जेव्हा निद्रा संपादन करतात तो निद्राप्रलय ब्रम्हांडीचा श्रोत्यांनी जाणावा. या तीन मूर्तींचा अंत होतो तेव्हा ब्रह्मांडामध्ये कल्पांत ओढवतो. तेव्हा ब्रह्मप्रलय झाला असे जाणावे. ब्रम्हा विष्णू महेश हे पिंडी आणि ब्रह्मांडी दोन्हीमध्येही आहेत. ते सृष्टीमध्ये आहेत आणि पाचवा महत्वाचा प्रलय आहे तो विवेकाचा आहे. अशा प्रकारचे पाच प्रलय आहेत त्याची माहिती दिली,
आता ते अनुभवाला येईल असं करूया. जेव्हा निद्रा किंवा झोप येते तेव्हा जागृतीचा व्यापार संपतो. अकस्मात सुषुप्ती किंवा स्वप्न पडू लागते. याला निद्राप्रलय म्हणतात. त्यात जागृतीचा क्षय होतो. आता देहांत समय ऐका. त्याला मृत्युप्रलय म्हणतात. देहामध्ये रोग बळावतात, कठीण प्रसंग येतो तेव्हा पंचप्राण आपले व्यवहार थांबवितात.वासनायुक्त प्राण निघून जातो आणि नुसता शरीर राहत हा दुसरा प्रलय सांगता येईल. तिसरा जो ब्रह्म आहे तो झोपलेला असतो, तेव्हा मृत्यूलोक गोळा झालेला असतो तिथे सर्व प्राणीमात्रांचा व्यापार खुंटलेला असतो. त्या प्राण्यांचे सूक्ष्म अंश वायूच्या चक्रामध्ये वास करतात आणि बराच काळ झाल्यानंतर ब्रह्म्याला जागृती येते, मग तो पुन्हा सृष्टी रचतो. विस्कळीत झालेले जीव पुन्हा मांडतो आणि आयुष्याची सीमा झाली की ब्रम्हप्रलय मांडतो.
शंभर वर्षे मेघ दिसत नाहीत त्यामुळे प्राणी मृत्यू पावतात. असंभाव्य असे फाटे फुटतात त्यामुळे हानी होते. बाराही महिन्यातील बारा आदित्यांचा ताप एकत्र होऊन पृथ्वीची होळी होते. अग्नी पाताळामध्ये जाऊन शेषाचे विष ओकून टाकतो. आकाशामध्ये सूर्याच्या ज्वाला पाताळामध्ये शेषाचे विषाचे गरळ. दोन्ही कडून भूगोल जळायला लागल्यावर काय उरणार? सूर्य अधिक उग्र होतो, सगळीकडे हलकल्लोळ माजतो, डोंगराचे कडे घडघडा कोसळायला लागतात.
अमरावती, सत्यलोक, वैकुंठ, कैलास आणि याच्यापेक्षा वेगळे लोक यांचे भस्म होऊन जाते. डोंगर घसरून जातो तिथला महिमा संपतो. देव समुदाय वायूचक्रामध्ये सापडतो. धरित्रीचे भस्म होते. पुन्हा पाऊस पडायला लागतो. पृथ्वीही पाण्यामध्ये विरून जाते. धरित्रीचे भस्म झाल्यावर हत्तीच्या सोंडेप्रमाणे धारा कोसळतात, क्षणात जलप्रलय होतो. पुढे नुसते पाणी उरतं मग त्या पाण्याला अग्नी शोषून घेतो. पुढे खूप ज्वाला अमर्याद पसरतात.
समुद्रामधला वडवानल, शिवनेत्रीचा नेत्रानल, सप्तकंचुकीचा अवर्णानल सूर्य आणि विद्युतलता अशा सगळ्या ज्वाला एकवटतात. त्यामुळे देव सुद्धा देह सोडून जातात आणि पूर्वरूपामध्ये मिळून जातात ते वायूमध्ये शिरतात. शेवटी तो वारा वैश्वराला धडकतो त्यामुळे वन्ही विझायला लागतो. मग वायू परब्रह्माकडे सैरावैरा धावतो. आकाशामध्ये धूर वितळायला लागतो त्याप्रमाणे वारा पसरतो आणि सगळ्यांचा नाश व्हायला लागतो. पुढील कथा ऐकू या पुढील भागात.जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे

मोबाइल- ९४२०६९५१२७