दशक दहा समास नऊ प्रचित निरूपण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. वैद्य पाहिला पण कच्चा त्यामुळे पोराचा प्राण गेला, यावर दुसऱ्याचा उपाय कसा काय चालणार? दुःखाने मनामध्ये झुरतो आणि वैद्याने माहिती विचारल्यावर लाजतो, मग त्याला आत्महत्यारा म्हणणेच योग्य ठरेल. जाणतेपणामुळे गर्व केला आणि नेणत्याच्या संगतीमुळे बुडाला. इथे कोणाचा घात झाला पहा बरं… पाप संपुष्टात आले, जन्माची यातना चुकली इथे स्वतःला प्रचिती आली म्हणजे बरे! परमेश्वराला ओळखले आपण कोण ते कळले.
आत्मनिवेदन झाले म्हणजे बरे. ब्रम्हांड कोणी केले? कशापासून उभारले? मुख्य कर्त्याला ओळखले म्हणजे बरे. इथे अनुमान करीत राहिले तर केलेला परमार्थ वाया गेला. प्रचिती नसल्यामुळे प्राणी संशयात बुडाला. हे परमार्थाचे गुपित आहे खोटे बोलेल तो अधम. खोटे मानील तो अधमातील अधम. असं जाणावं. इथे बोलण्याचे सीमा झाली. नेत्याला परमात्मा कळत नाही, हे असत्य नाही. हे सर्वोत्तमा तूच जाणतो! माझ्या ज्ञान सांगावे ही माझ्या उपासनेची थोरवी. खोटे बोलले तर श्रीरामाचे दास खोटे बोलतात असे होईल म्हणून खरेच सांगितले.
कर्त्याला ओळखले पाहिजे.आत्मस्वरूपाचे,मायेमुळे झालेल्या अंतरात्म्याचे मूळ शोधले पाहिजे. तेच पुढे निरुपण बोलत आहे.श्रोत्यांनी अंत:करण सावध करून ऐकावे. सूक्ष्म निरूपण सांगितले तिथे बोललेलेच पुन्हा उदाहरण देऊन बोलत आहे.श्रोत्यांनी ते लक्षात घ्यावे म्हणून हे सांगत आहे. स्पष्ट अनुभव पाहिल्यावर रुढी उडून जातात म्हणून ही खटपट करावी लागत नाही. नुसत्या रूढीनुसार बोललं तर त्यामुळे अनुभवाचे समाधान मिळत नाही.अनुभवाचे समाधान मिळाले तर रूढी पाळण्याची गरज नाही.
अशी दोन्हीकडे अवस्था आहे म्हणून बोललेले पुन्हा बोलावे लागते. या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन हे कोडे उलगडून दाखवतो. रुढी आणि अनुभवाचे प्रमाण दोन्हीचे निरूपण स्पष्ट करीत आहे. श्रोते हे अत्यंत हुशार आहेत, आता मी पुढे विवरण करतो.इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे प्रचित निरूपण नाम समास अष्टम समाप्त.
दशक दहा समास नऊ पुरुष प्रकृती नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. आकाशातून वायू निर्माण झाला तशी ब्रह्मातून मूळ माया निर्माण झाली. त्या वायूमध्ये त्रिगुण आणि पंचभुते आहेत. वडाच्या बीमध्ये मोठे झाड असते पण बीज फोडून पाहिले तर ते दिसत नाही. नाना वृक्षांचे समूह बिजापासून तयार होतात. तशी मूळ माया ही बिजरूप आहे. विस्तार झाला तिथून तिचं स्वरूप शोधून पाहावे. तिथे दोन भेद दिसतात. विवेकाने त्याची प्रचिती पहावी. निश्चल असतानाची चंचल स्थिती म्हणजे वायू. त्याच्यामध्ये जाणीव असते. जगतज्योतीचा जिव्हाळा म्हणजे सातत्याने अस्तित्व असते. वायू आणि जाणीव एकत्र झाले की त्याला मूळमाया म्हणतात. नदी म्हणजे बायको असं म्हटलं तरी तिथे पाहिले तर पाणीच असते.
त्याप्रमाणे विवेकाने मूळमायेला जाणून घ्यावे. वायूची जाणीव म्हणजे जगतज्योती. त्याला मूळमाया म्हणतात. पुरुष-प्रकृती, शिवशक्ती ही त्याचीच नावे आहेत. वायूला प्रकृती म्हणतात आणि पुरुषाला जगतज्योती म्हणतात. पुरुष प्रकृती शिवशक्ती हे त्याचंच नाव आहे. वायूमध्ये जाणीव विशेष असते, तीच प्रकृतीमध्ये पुरुषाची जाणीव असते या गोष्टींचा विश्वास धरायला हवा. वायू शक्ती आणि विश्वास जाणीवमय आहे, यालाच अर्धनारी नटेश्वर असं लोक म्हणतात. वायूमध्ये जाणीवेचा गुण असतो तेच ईश्वराचे लक्षण आहे. त्याच्यापासून पुढे त्रिगुण निर्माण झाले. त्या गुणांमध्ये सत्वगुण म्हणजे निखळ जाणीवलक्षण. त्याचा देहधारी विष्णू झालेला आहे. त्याच्या अंशाने जग चालते असं भगवद्गीता सांगते. पेरले तेच उगवले हे यातून आपल्या लक्षात येतं. अशा प्रकारची जाणीव ही प्राणिमात्रांमध्ये विभागली आहे. ती जाणून सर्वत्र काया वाचवली जाते. असं समर्थ सांगत आहेत. पुढील कथा ऐकू या पुढील भागात. जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे

मोबाइल- ९४२०६९५१२७