युवक राष्ट्रवादी लावणार फास्टटॅगला काळे स्टिकर
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्ग दुरुस्त करण्याचे पत्र
नाशिक – मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्ग ३ वरील खड्ड्यांच्या समस्यांचे पत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरींना पाठविले आहे. स्वातंत्र्य दिनापर्यंत रस्ते दुरुस्त न केल्यास वाहनांवरील फास्टटॅगला काळे स्टिकर लावण्याचा इशारा देखील पत्राद्वारे करण्यात आला आहे.
मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्ग ३ वर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून वाहनधारकांना कसरत करून रस्त्याचे अंतर पार करावे लागत आहे. पावसाच्या जोरदार सरीमुळे घोटी, इगतपुरी व कसारा घाटात अनेक अपघात या खड्ड्यांमुळे घडतात. कसारा घाटात अपघात झाल्यास २ दिवस वाहनाच्या लांब रांगा लागत असून १२-१२ तास वाहतूक खोळंबा पहावयास मिळत आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर एकूण ३ टोल नाके असून देखील या महामार्गाची दयनीय अवस्था पहावयास मिळते.
दरवर्षी NHAI ला आंदोलनाचा इशारा दिल्यावर रस्त्याची दुरुस्ती करण्यात येते. परंतु रस्त्याच्या कामाचा दर्जा खालावलेला असल्याने पुढील वर्षी पुन्हा रस्त्याचे दुरावस्था झालेली असते.
दिनांक १५ ऑगस्ट २०२२ स्वातंत्र्य दिनापर्यंत राष्ट्रीय महामार्ग ३ (मुंबई-नाशिक) वरील खड्डे तातडीने बुजवून दर्जेदार रस्ता करावा, अन्यथा वाहनांवरील फास्टटॅग वर काळे स्टिकर लावण्यात येईल असे पत्रात म्हटले आहे.