Maratha Reservation : मनोज जरांगे आज दुपारी दोन वाजता निर्णय घेणार ?
मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी उपोषणाला बसलेल्या महिलेची तब्येत खालावली
जालना,दि.१२ सप्टेंबर २०२३ –मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर १५ दिवसापासून उपोषणास बसलेले जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावातील मनोज जरांगे पाटील यांनी तपासणी करण्यास आणि वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला होता. पण गावकऱ्यांनी हट्ट केल्याने अखेर त्यांनी सलाईन घेतली.
सर्वपक्षीय बैठकीनंतर मनोज जरांगे यांनी सरकारला वेळ कशासाठी हवा आहे अशी विचारणा केली आहे. त्यातच आज दुपारी मराठा समाज आंदोलकांची बैठक पार पडणार आहे. यानंतर मनोज जरांगे पुढील भूमिका जाहीर करु शकतात.अशी माहिती मिळाली आहे.
दरम्यान,पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे यांनी जोवर लोकांच्या हातात आरक्षणाचं पत्र पडत नाही तोवर मी आंदोलन मागे घेणार नाही अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे. तुम्ही फक्त आरक्षणावर लक्ष्य केंद्रीत करा,”असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे.
“आज एक शिष्टमंडळ येणार आहे,पण त्याच्यात कोण आहेत त्यांची नावं कळलेली नाहीत.चर्चा केल्याशिवाय मार्ग निघणार नाही. चर्चेचे सर्व दरवाजे खुले आहेत. पण आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत. असं मनोज जरांगे यांनी सांगितलं आहे.”मी याआधीही त्यांना वेळ दिला होता. मी वेळ देतोय पण मागे हटणार नाही. अजिबात संभ्रमात राहायचं नाही. महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या हातात पत्र पडल्याशिवाय मी आंदोलन बंद करत नाही.
मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी उपोषणाला बसलेल्या महिलेची तब्येत खालावली
मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून अखिल भारतीय छावा संघटनेचे बार्शीत उपोषण सुरू आहे. दरम्यान उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी महिला उपोषणकर्त्या वैशाली आवारे यांची प्रकृती खालावली आहे. यानंतर वैद्यकीय टीम, तहसीलदार, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.उपोषणकर्त्या वैशाली आवारे यांना सलाईन लावण्यात आली असून त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत. येथे उपोषणकर्त्यांचा अन्नत्याग सुरू असून, जोपर्यंत शासन निर्णय होत नाही तोपर्यंत उपोषणावर ठाम असल्याचा निर्णय घेण्यात आलाय.